गोग्रासवाडी (डोंबिवली) १४
लहानपणचा श्रावण
खरतर श्रावण म्हटलं की बऱ्याच आठवणी आहेत.उत्साह सणवार खायची प्यायची रेलचेल अश्या अनेक आठवणींचा खजिना म्हणजे लहानपणीचा श्रावण. पूर्वी म्हणजे अगदी १९८०, १९८५ पर्यंत मला आठवतय कि, श्रावण सुरु झाला कि रोज कहाणी वाचायची , सोमवार, गुरुवार आणि शनिवार पत्री घेऊन यायची. पत्री आणायला आम्ही मुलं मुलंच जात होतो. गोग्रासवाडीत मोकळी,शेजमिनीची जागा मुबलक असल्यामुळे रान आणि झाडं भरपूर होतं . आघाडा, तेरडा, तगर, जास्वंद यांची भरपूर झाडं होती. त्याशिवाय आंबा, चिंच, वड, पिंपळ, बोरं, करवंद यांचीसुद्धा कित्येक झाडं होती. सोमवार आणि शानिवार एक बटू म्हणजेच मुंज झालेला साधारण ८ ते १२ वर्ष वयाचा मुलगा जेवायला बोलवायचा. बहुतेक आमच्या मित्रांपैकीच कोणीतरी असायचा. आम्ही गोग्रासवाडीत राहायचो. विरळ वस्ती होती. लांब लांब चाळी होत्या. बहुतेक बटू वाडीतच मिळायचा. चाळीत राहत होतो. ७, ८ बिर्हाडं होती. दोन्ही दारं उघडी असल्यामुळे कोणत्याही घरात मुक्त वावर होता. (त्यावेळी बैठ्या घरांना दोन दारं असायची) .त्यामुळे कोणत्याही घरातील काकू कोणत्याही मुलाला सहज कामं सांगत असत.
श्रावण म्हटलं अजून एक आकर्षण म्हणजे सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी संध्याकाळी लवकर स्वैपाक व्हायचा आणि सुग्रास भोजन, गोडधोड असायचं. उत्साहात केलेलं असल्यामुळे चविष्ट असायचं, बटू , सवाष्ण, मेहूण यांची रेलचेल असायची. आम्हालादेखील बटू म्हणून बऱ्याच ठिकाणी बोलावलं जायचं. पानाभोवती महिरप व रांगोळी आणि उदबत्तीच्या सुगंधात जेवणाचा थाट वेगळा असायचा. मुख्य म्हणजे चार आठ आणे दक्षिण मिळायची आणि यजमान व यजमानीण नमस्कार करायचे. अगदी मित्र असेल तरी त्या दिवशी त्याची आई नमस्कार करायला लावायची. त्याचा आनंद वेगळाच होता. बहुतेक काकू बोलवायला यायच्या त्यावेळीच आवडता गोड़ पदार्थ विचारून जायच्या. त्यामुळे तो जेवणात असायचा त्याचा आनंद औरच होता.
श्रावण म्हटलं कि, व्रत वैकल्य असायचीच पण सणांची सुरवातदेखील श्रावणात व्हायची. त्यामुळे संपूर्ण वाडीत उत्साह असायचा. श्रावणातच गणपतीचे पण वेध लागायचे. तो ठरवून येण्याचं काम आम्हाला बरोबर घेऊन बाबा करायचे. पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. त्यावेळी गारुडी नाग घेऊन यायचे त्यांचे खेळ करायचे. नागाला देण्याच्या निमित्ताने दूध दान केलं जायचं. मुख्य उद्देश सणांचा तोच असावा. आपल्या कमाईतील थोडा हिस्सा समाजातील मागे राहिलेल्या गरीब आणि असहाय्य लोकांना देण्याचा उद्देश त्यानिमित्ताने साध्य होत असे.
मंगळागौरी देखील याच महिन्यात यायचे. वाडीत बऱ्याच घरात मंगळागौरी असायच्या. मुलांना मज्जाव नसायचा. आनंद आणि उत्साह यांचा मिलाफ म्हणजे मंगळागौर. त्यावेळी खरंच रात्रभर खेळ चालायचे. नोकरी करणाऱ्या बायकांचं प्रमाण कमी असल्यामुळे वेळ आणि बळ दोन्ही असायचं. त्यामुळे मंगळागौरीचे बहुतेक सर्व पारंपरिक खेळ खेळले जायचे. आम्ही गेलो नाही तरी ज्या घरात मंगळागौरीचे खेळ चालायचे तिथून रात्रभर आवाज , हसणं हे ऐकू येत असल्यामुळे तशी जाग असायची.
अजून एक गोष्ट जी त्याकाळी बहुतेक घरातून व्हायची ती म्हणजे श्रावणात पहिल्या दिवसापासून त्या त्या वाराच्या कहाण्या वाचायच्या. आधी गणपतीची कहाणी व्हायची. ऐका गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे ......... या कहाणीने सुरवात व्हायची, त्या त्या वाराच्या कहाण्या झाल्या कि शेवटी महाविष्णूंची कहाणी. बरोबर ७ वाजता कहाण्या म्हणायच्या त्या झाल्या कि, जेवायचं. प्रत्येक दिवसाची कहाणी म्हणजे नित्य जीवनाचा बोध होता, आचरणात आणता येणारी वा येण्याजोगी तत्व होती, वागण्याची रितभात शिकवली जायची. जीवनाचं सार होतं . खुलभर दुधाच्या सोमवारच्या कहाणीत आधी सर्वांचे आत्मे शांत करून मग देवाचं करा हा बोध होता. सर्वसाधारण प्रत्येक कहाणीत कथेच्या माध्यमातून समाजाला शिकवण होती. काही सद्हेतू होते. जे खरंतर तळागाळापर्यंत आधीपासून मांडले गेले असते तर समाजात दरी निर्माण नसती झाली. असो.
नारळी पौर्णिमा जन्माष्टमी, गोपाळ्काला म्हणजेच दहीहंडी, मंगळागौर, सोमवार, गुरुवार, शनीवार या व्यतिरिक्त अजुन एक उत्साहाची बाब म्हणजे उपवास आणि उपवासाचे पदार्थ जे या दिवसात मुबलक बनत आणि खायला मिळत. खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याचा खिस आणि तळून केलेला मस्त तिखट मीठ आणि दाणे घातलेला चिवडा, रताळ्याचे गोड़ काप किंवा आख्ख रताळ उकडून मीठ लावून असे अनेक पदार्थ या महिन्यात खायला मिळायचे. उपवास असो वा नसो जे केलं जायचं ते सर्वांसाठी असल्यामुळे ऐकतर उपवास आपोआप व्हायचा आणि या सर्व पदार्थांची चव अशी असायची कि, आपोआप या दिवसांची वाट पहिली जायची. उत्साहाचा सळसळता काळ म्हणजे हा श्रावण, सणांचा राजा म्हणजे श्रावण, घराला आणि घराघराला जोडणारा महिना म्हणजे श्रावण, कहाणीतून बोध देणारा महिना म्हणजे श्रावण, अविरत आनंद देणारा महिना म्हणजे श्रावण.
अशी हि आमच्या लहानपणीच्या श्रावणाची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. आवडली असल्यास दाद देणे आणि आपले अनुभव शेयर करणे.
लेखनः प्रसन्न आठवले.
२१/०७/२०२०
१०ः२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment