नशीब वा प्रारब्ध, कर्म आणि नामस्मरण !!!
काल बाल्कनीत उभा होतो. वरुन एका पक्ष्याचं पीस पडताना पाहिलं थोडं खाली गेलं आणि तेवढ्यात वारा आला. त्याबरोबर ते पीस ज्या जागी पडणार होतं त्या जागेपासून खुप लांब अंतरावर जाऊन पडलं. ते पाहून एक विचार चमकून गेला. वर वर पाहता फक्त पडणं आपल्या हातात आहे. पण कुठे आणि कसं हे त्या वार्याच्या हातात आहे. हा वारा म्हणजे कर्म आणि त्या कर्माचं योग्य वेळी मिळणारं फलित. अर्थात ती वेळ योग्य आहे हे आपण नाही तर आपलं कर्म ठरवतं. म्हणजेच खरतर आपणच. पण आपण केलेलं कोणतं कर्मं आपल्याला कधी फल देईल हे पुन्हा आपल्या हातात नाही.
इथेच खरतर गीतेचं कर्माबद्दलचं सर्वात महान तत्व लागू होतं. तू कर्म करत जा. फलाची अपेक्षा करु नकोस. त्याचा गर्भीत अर्थ हाच आहे कि, कोणतं कर्म कधी फळेल हे इश्वर सुद्धा नियंत्रित करु शकत नाही. हीच जीवनाची अशाश्वत गोष्ट आहे. म्हणुनच जीवन हे या अर्थाने पराधीन आहे. जे भगवंतानी वेळोवेळी येऊन सांगितलं. जे खरं गुह्य आहे. म्हणुन कर्म करुन सोडुन देणं इतकचं मानवाच्या हातात आहे. एखादी गोष्ट आपण योजणं आणि त्याचवेळी एखादं संकट आपली वाट अडवून उभ राहाणं हा फक्त योगायोग असु शकत नाही. नियती म्हणजे दुसरं तिसरं काहीही असु शकत नाही तर आपल्याच पुर्वकर्मांच आज झालेलं फलितरुप घटित.
आता मगाशी बघितलेल्या घटनेत अजुन खोल जाण्याचा प्रयत्न करुया. त्या पीसाचं पडणं जसं त्याच्या हातात नव्हतं तसच कधी पडणं हे देखील त्याच्या हातात नव्हतं. म्हणजेच एखादी घटना वा कर्म आपल्या हातून होणं हे देखील आपण आधीच लिहुन ठेवलेल्या कर्माच्य फलितात आपणच मांडुन ठेवलेलं असतं. म्हणजेच आपणच आपल्यासाठी सर्व करुन ठेवतो आणि वर आपणच नशिब नावाच्य अज्ञात गोष्टीला अकारण दोष देत असतो. म्हणजेच तसं पाहिलं तर नशीब असं काही असत नाही तर आपल्याच पुर्वकर्मानी आपणच आपल्यासाठी मांडुन ठेवलेलं गणित जे डोईजड झालं की आपण नशीबाला दोष देतो.
अर्थात आपल्याला त्याची कार्यकारण मिमांसा माहित नसल्यामुळे म्हणजेच या दोन गोष्टींचा संबंध माहित नसल्यामुळे आणि ते कटु वास्तव आपल्यासमोर येऊन ऊभं राहील्यामुळे आपण ते मनाने स्विकारण्यास तयार नसतो, ते नाकारतो. कारण कर्माचा हा कार्यकारण भाव आपल्यासाठी अज्ञात असतो. तरिही त्यामुळे कर्माच वास्तव आणि त्याच्या फलिताचं गणित चुकतही नाही आणि टळतही नाही.
यावर उपाय काय. तर एकच उपाय संपुर्ण शरणगती, कोणापुढे तर विश्वाच्या मालकाकडे. कारण ते एकच अंतिम सत्य आहे. त्याने साध्य काय होईल. तर फलाची आशा मनातून नष्ट होऊन फक्त कर्म करण्याची व्रुत्ती आपल्यात येईल. या आशा निराशेच्या खेळात मन गुंतुन पडणार नाही. समोर आलेली प्रत्येक गोष्ट सुख दुःख, चांगलं वाईट, भलं बुरं स्विकारण्याची व्रुत्ती अंगी तयार होईल. आता हेही साधत नसेल तर निदान इतकं तर करता येईल कि, कोणत्याही प्रसंगात मन स्थिर राहण्याची सवय बाळगावी. म्हणजे केलेल्या कर्मात मन गुंतणार नाही आणि ज्या कर्मात मन गुंतत नाही ते कर्म बाध्य होत नाही.
हे सर्व साधण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे नामस्मरण. त्या परमशक्तीचं नित्य निरंतर स्मरण करणं जेणेकरुन केलेलं प्रत्येक कर्म हे त्याला अर्पण केल्यासारखं होईल. कलियुगात सर्व योग साधणं हे अत्यंत दुरापास्त आहे. पण नामस्मरण हे असं हत्यार आहे,जे सर्व प्रकारच्या असुरांशी, शत्रूंशी लढुन कर्माच्या फलाची श्रुंखला तोडण्याचा प्रयत्न करते. चित्तव्रुती शांत होण्यास मदत होते. कर्मात भाव न गुंतल्यामुळे फलाची आशा मनाला बांधत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत वुत्ती स्थिर राहते. जे घडेल ते आपल्या नियंत्रणाबाहेरील असेल तर मन अशांत होणार नाही आणि बरेचसे योग मनाच्या शांततेवर अवलंबुन आहेत आणि मन शांत करण्यासाठी आहेत.
म्हणुन आपल्या हातात दोनच गोष्टी आहेत. एक कर्म आणि दुसरं नामस्मरण. !! तेवढच आपण करुया बाकी सर्व ईश्वराधीन आहे ते त्याच्या हातातच राहुदे. !!
(c) (R) संकल्पना आणि लेखन. ः प्रसन्न आठवले.
२८/०७/२०२०
०५ः३०
Comments
Post a Comment