#श्रीकृष्णनीती #भाग४०
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
मागच्या भागात आपण स्वातंत्र्य मिळताना नेहरूंनी कश्याप्रकारे, आपलं गांधींजवळचं वजन वापरून राज्यकारभार हातात घेण्याची सुवर्णसंधी साधली. तेदेखील प्रदेश काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस कार्यकार्यकारिणीत काहीही पाठिंबा नसताना, नव्हे अजिबात पाठिंबा नसताना. खरतर स्वातंत्र्य संग्रामातील निस्पृहता संपून राजकारण व्हायला तेंव्हाच सुरवात झाली. हळू हळू अनेक प्रश्नांना आपल्या हातात घेत नेहरूंनी पंतप्रधानपदामुले मिळालेल्या अधिकारांचा येथेच्छ वापर करत व फायदा घेत पटेलांना डावलायला सुरवात केली. काश्मीर प्रश्न गृह खात्यातून काढून विदेश नीती खात्यात वर्ग केला. खरतर इथेच त्यांनी काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय असल्याचं एक प्रकारे मान्य केलं होतं.
इथेच त्यांच्या सुप्त हेतूंचा अंदाज येतो. नन्तर अलगदपणे हा प्रश्न , पटेलांना न विचारता व कुणाशीही विचारविनिमय न करता, यूनोच्या अखत्यारीत आपणहून टाकण्याचा प्रयत्न केला. हि खरंतर एकप्रकारे पाकिस्तानला मदत होती. तदनंतर १९५४ ला घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य नसतानादेखील, ३७० कलम आणि ३५A घटनेत घुसवून हा प्रश्न कायमस्वरूपी धगधगत आणि मुख्य म्हणजे वादग्रस्त राहील याची तजवीज केली. काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान (वजीरेआजम) हे विशेषण जवळजवळ १९७२ पर्यंत होत. १९७२ ला स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्ती करून त्याला मुख्यमंत्री म्हणून संबोधन दिलं. जर गेल्यावर्षी पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमितजी शाह यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी धसास लावला नसता तर अजूनही आपण फक्त कागदोपत्रीच काश्मीर आमचा आहे हे वाक्य म्हणत बसलो असतो.
हीच गोष्ट विदेशनीतीबाबत, रशिया आणि चायना यांना आपण त्यांच्या जवळ आहोत हे वाटत राहावं म्हणून अमेरिकेशी फारसे घनिष्ट संबंध कधीही प्रस्थापित केले नाहीत. कदाचित जर सुरवातीला हे संबंध सुरळीत असते तर, मधल्या सर्व काळात अमेरिका पाकच्या जवळ जाऊन त्यांना मदत करत राहिले ते झालं नसतं . पाकवर प्रथमपासून अंकुश राहिला असता आणि पाकसोबत कोणताही प्रश्न इतक्या वाईट ठरला गेला नसता . मुख्य आज जे अमेरिका पाकशी रोखठोख वागते ती पहिल्यापासून वागली असती.
पण तस न घडण्याच कारण अमेरिकेला आपल्यावर पूर्ण भरवसा कधीच नव्हता. म्हणूनच आशियामध्ये आपलं अस्तित्व टिकून राहावं यासाठी त्यांना पाकला जवळ करणं क्रमप्राप्त होत. आता आतापर्यंत पाकला मदत करत असलेली अमेरिका २०१८ पासून सलग ३ वर्ष पाकला एक छदाम देखील मदत करत नाहीये हा निश्चितच भारताच्या बदललेल्या विदेश नीतीचा आणि विशेष म्हणजे नेतृत्वाच्या व्यक्तिगत संबंधांचा परिणाम आहे. हा परिणाम बऱ्याच बाबतीत दिसायला लागलाय.
विदेशनीतीतील खुपश्या चुकांची सुरवात त्याच सुमारास झाली हे एकूण इतिहास पाहता लक्षात येतं. मुळातच नेहरू चीनच्या इतक्या का प्रेमात होते हे न उलगडणारं कोडं आहे. आपल्याला UN Security Council मधील स्थायी सदस्यत्वाची दोन वेळा दोन्ही सुपर पॉवर्स कडून आलेली ऑफर धुडकावून त्याच्या बदल्यात चीनला ती जागा देणारा नेता आणि नीती, पाकिस्तान या राष्ट्राला प्रथमपासून नरमाईची दिलेली वागणूक नेहरूंच्या निधनानंतर एका वर्षात किती फोल आणि चुकीची होती हे १९६५ ला पाक विरुद्धच्या घडलेल्या युद्धात दिसून आलं.
मुळात ज्या देशाने आपला एक त्रितीयांश काश्मीर घशात घातला आहे हे माहीत असताना त्या देशाशी संबंध सलोख्याचे असूच कसे शकतात हे न उलगडणार कोडं आहे. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट स्पष्ट होत नाही कि, शास्त्रीजी आणि वाजपेयी हे दोन गैर गांधी नेहरू घराण्याचे पंतप्रधान असतानाच कसा पाकला जोर चढतो. याच उत्तर त्यावेळी मिळत नसलं तरी आज दीडशे वर्ष जुन्या पक्षाचं चीन बाबत असलेलं धोरण आणि त्या सरकारी पक्षाशी इथल्या पक्षाने केलेला करार आणि स्वीकारलेल्या देणग्या यावरून नक्कीच मिळू शकतं.
गांधी नेहरूंशी पंगा घेतलेले तीन नेते संशयास्पदरित्या मृत्यू पावतात यावरून या घराण्याला सत्तेचा दुर्योधनी मोह होता व आहे हे लक्षात येतं. ते तीन नेते आहेत स्व. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि स्व. लालबहादूर शास्त्रीजी. या व्यतिरिक्त जे जे या घराण्याच्या विरोधात गेले त्यांना वेगळा पक्ष काढून सरते शेवटी याच घराण्याच्या आधारावर पुन्हा सत्तेत यावं लागलं. चंद्रशेखर व चरणसिंग, आणि अजून एक नेता ज्यांनी आधी समाजवादी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, या सर्वांनी काँग्रेस पक्षातून घराण्याच्या विरोधात दंड थोपटून आपला संघर्ष सुरु केला.
परंतु जेंव्हा सत्तेची चव चाखायची वेळ आली तेंव्हा यांनी अंती काँग्रेस पक्षाचीच मदत घेतली. त्यामुळे कॉँग्रेस विरोधात जो गेला तो संपला किंवा पुन्हा त्याच पक्षाच्या मदतीसाठी आला. याची कित्येक उदाहरणं आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, तामिळनाड मध्ये मूपनार यांची तामिळ मानिला काँग्रेस या सर्वांनी काँग्रेसमधून बाहेर पाडण्याचं कार्य केलं. परंतु नंतर त्यांनाच जाऊन मिळाले. यावरून एकतर काँग्रेसशी असलेले त्यांचे लागेबांधे हे आतून तसेच असल्यामुळे असेल, पण त्यामुळे त्यांनी केलेलं बंड हा मुळातच एक अभिनय वाटला. म्हणजेच या पक्षातील सर्वच एकाच माळेचे मणी.
कदाचित हि लांगूलचालनाची सुरवात सत्ता हाती येताच नेहरूंच्याच काळात सुरु झाली असेल. मुळात कधीही अध्यक्ष हा सर्वेसर्वा असा प्रघात नसलेल्या काँग्रेसमध्ये अध्यक्ष पंतप्रधान होणार या घटनेने सुरु झाला असावा. कारण तोपर्यंत घटनात्मक कोणतेही अधिकार नसलेल्या अध्यक्षाला पंतप्रधानपद मिळणार हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी १५ प्रांतीय कमिट्यांपैकी १२ पटेलांच्या बाजूने असलेले आणि ३ तटस्थ असलेले सर्व आपोआप लादल्या गेलेल्या अध्यक्ष अर्थात नेहरू आणि नंतर पर्यायाने पंतप्रधान पद मिळालेल्या नेहरूंना १५ पैकी एकाचाही पाठिंबा नसतानासुद्धा आपोआप घटनात्मक अधिकारामुळे सर्व प्राप्त झालं. काश्मीर प्रश्नात पटेलांचा असलेला हात आधीच काढून तो प्रश्न परराष्ट्र खात्यात वर्ग करण्यात आला होताच. गृहखात्याच्या अंतर्गत असलेलं सर्व प्रश्न विशेषतः संस्थानं विलीन करण्याचं खूप मोठं आणि महत्वाचं कार्य सरदार पटेलांनी पोटतिडकीने आणि इमानेइतबारे मुळापासून पूर्ण केल्यामुळे निदान बाकीच्या भारतात तरी काश्मीर सारखा एकही प्रश्न निर्माण झाला नाही.
मुळात अजूनही एक गोष्ट माझ्या विचारातून जात नाहीये कि, भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर असलेल्या इतक्या महत्वाच्या राज्याचा अर्थात काश्मीरचा प्रश्न असा ना सोडवता लोंबकळत ठेवून भारताच्या सुरक्षेची कसलीही चिंता ना बाळगता एखादा सत्ताप्रमुख झोपूच कसा शकतो. युनोचा मुद्दा, ३७० व ३५A , काश्मीरला विशेष दर्जा, भारताचे कायदे तेथे लागू होणार कि नाही हे ठरवण्याचा तेथील राज्य विधानसभेला दिलेला अधिकार आणि तेथील राज्यप्रमुखाला घटनेमार्फत वजीरेआजम म्हणण्याची तरतूद या सर्व गोष्टी एखाद्या राज्याला भारतीय संविधानापासून फुटून वेगळं होण्याचा खूप सोप्पं मार्ग होता. मुद्दाम अश्या तरतुदी, काश्मीरच्या राजाची मागणी होती या नावाखाली घालणं हेच मुळात गैरवाजवी होतं .
कारण काश्मीरचा शेवटचा राज हरिसिंग यांनी स्पष्ट शब्दात लॉर्ड माऊंटबॅटन यांना २६ ऑक्टोबर १९४७ ला पत्र लिहून संपूर्ण समर्पण केलंच होतं . बहुतेक या सर्वांची गरज शेख अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे पिताश्री)यांच्या दबावामुळे भासली असेल. कारण इतिहासात नोंद आहे कि, शेख अब्दुल्ला यांना काश्मिरात अमर्याद अधिकार हवे होते. त्यांना दिल्लीचा संबंध कोणत्याही प्रश्नात नको होता. तशी मागणी, त्यांनी मुळात राजा विलीनीकरण करारावर सही करण्याचा खूप आधी राजाजवळ बोलून दाखवली होतीच.
मोदींनी काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीची प्रशासकीय, राजकीय, कायदेशीर अश्या सर्व बाजूनी सुरवात ६ वर्ष आधीपासूनच केली होती. कदाचित दुसऱ्या टर्म मध्ये माननीय अमितभाई शाह यांना गृहमंत्री बनवण्याचा निर्णय घेताना या प्रश्नाच्या सोडवणुकीची आधीपासून केलेली तयारी कामास आली असेल, म्हणूनच मे ३० २०१९ ला सत्ता घेताच ५ व ६ ऑगस्ट २०१९ ला या प्रश्नाचं मूळ असलेली ३७० आणि ३५A हि कलमं आणि ज्याला हात लावण्याची हिम्मत ७० वर्षात कोणीही केलेली नसताना, फक्त दोन दिवसात सोडवून दाखवणं हे खरतर अनेक वर्षांच्या मेहनतीचं फलितच असू शकतं .
नेहरूंनी निवडून येताच सर्वात प्रथम आपल्या माणसांची वर्णी लावण्याची तयारी सुरु केली किंवा पक्षातील विरोधक यातून कसे बाजूला करता येतील याची देखील सुरवात ५२ ते ५७ याच काळात करण्यात आली. कारण मुळात १९५० साली सरदार पटेल यांचं निधन झाल्यानंतर पक्षातील खंदा विरोधक मार्गातून आपोआप बाजूला झाल्यामुळे पक्षातील इतर विरोधक ज्यांची भिस्त मुख्यत्वे पाटेलांवर होती, ते आपोआप थंड पडले. या गोष्टींचा नेहरूंनी पुरेपूर फायदा घेत, आपलं पक्षातील स्थान पूर्ण बळकट करून आपण आहोत तोपर्यंत विरोधात कोणी राहू शकणार नाही याची तजवीज केली. पक्षीय पातळीवर सर्व आपल्या बाजूने वळवून घेत घेत नेहरूंनी परराष्ट्र नीतीवर देखील आपली पकड पूर्ण घट्ट केली. मुळात परराष्ट्र नीती हि रशिया चीन यांची बाजू आणि त्यांच्या मर्जीनुसार वागण्याची धोरणं याबाबत संकुचित होत गेली.
या सर्व गोष्टी पुन्हा महाभारतातील महायुद्धाच्या आधीच्या व्यापक कट कारस्थानासमान घडायला लागल्या होत्या. जिथे धृतराष्ट्राला सत्ताधीश म्हणून राहण्यासाठी दुर्योधनाचा आततायी, महत्वाकांक्षी स्वभाव, कर्णाची त्याला असलेली संपूर्ण साथ आणि शकुनीच्या कारस्थानाची त्यात होत असलेली मदत याची गरज वाटत गेली म्हणूनच तो आपोआप त्याकडे दुर्लक्ष करत गेला. त्याचप्रमाणे येथे काँग्रेसची व काँग्रेसमधील आपली सत्ता निरंकुश राहावी याकरता अनेक क्लुप्त्या, गोष्टी, कारस्थानं, प्रश्न हे जाणूनबुजून निर्माण करर्ण्यात आले किंवा असलेले न सोडवता तसेच ठेवण्यात आले. म्हणूनच इथल्या कॉम्युनिस्टाना कायम आपल्या अंकित ठेवण्यासाठी चीनसारख्या शत्रूराष्ट्राला आपला मित्र मानण्याचं महद्कार्या नेहरूंनी केलं.
बघूया पुढील भागात.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग चाळीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment