ll श्रीविष्णवे नमः ll श्रीविष्णवे नमः ll श्रीविष्णवे नमः ll
नारदपूराणातील भक्तीचं विवेचन
श्रद्धापूर्वक भक्ती करणारा प्रत्येक जीव भक्त म्हणवला जातो हे सर्वश्रुत आहे आणि वेदमान्य आहे. परंतु श्रद्धा आणि भक्ती म्हणजे नक्की काय याचा उहापोह नारदपुराणात करताना श्रीसनकऋषी विस्तृतपणे सांगतात. श्रद्धा आणि भक्ती या खरतर एकच अस म्हटलं जातं. श्रद्धा ही भक्तीची प्रथम पायरी आहे. म्हणूनच नारदपुराणात म्हटलंय की,
श्रद्धापूर्वा: सर्वधर्मा मनोरथफलप्रद: l श्रद्धया साध्यते सर्व श्रद्धया तुष्यते हरी ll
श्रद्धावान लभते धर्म श्रद्धावान अर्थमाप्नुयात l श्रद्धया साध्यते काम: श्रद्धावान मोक्षमाप्नुयात ll
या श्लोकांचं विवेचन आणि विस्तृत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया.
श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्ती करणारा हा अनेक पुण्यांचा धनी होतो. श्रद्धा आणि भक्ती यावर विस्तृत विवेचन करण्या आधी भक्ती म्हणजे काय हे समजून घेऊया.
एखाद्या गोष्टीला भजणे म्हणजे भक्ती. भजणे म्हणजे शब्दशः त्या गोष्टींच्या नादी लागणं वा त्याच्या नादात गुंग होऊन जाणं. म्हणजेच त्यापासून विभक्त न होणं. ती गोष्ट आणि आपण हे एकरूप असणं. मुळात भजणं म्हणजे भजनी लागणं, म्हणजे फक्त त्याच गोष्टीचा ध्यास घेणं. मुळात भजन करणं म्हणजे तरी काय, एका नावाला सुरात आळवून , त्याला साद घालणं.
भक्ती म्हणजे एकरूप होणं, एकतानता येणं वा साधणं. भक्ती म्हणजे मनाची एकाग्रता साधून त्या लक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न करणं, पण एकदा नाही सतत, निरंतर, नित्य , निरपेक्ष होऊन. आता म्हणाल की निरपेक्ष राहायचं तर लक्ष धरायचं का. निरपेक्ष म्हणजे लक्ष साधत असताना अविचल राहून प्रयत्न करणं, संकटं आली , अडथळे आले, आपदा विपदा काही जरी आल्या तरी , त्याने ध्येयावरचं आपलं लक्ष टिकवून ठेवणं.
याचा उहापोह करताना नारदपुराणात म्हटलंय की जी गोष्ट भक्तीविरहित आहे ती कधीही भगवंतापर्यंत पोचूच शकत नाही. कितीही कष्ट घेऊन केली गेलेली असेल, पण त्यात भक्तीची मात्रा नसेल तर त्याने इप्सित साध्य होऊ शकत नाही. म्हणजेच ज्या गोष्टीत मन नाही त्यातून काही निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणजेच शरीराने कितीही साधना केली वा अपार कष्ट केले, तरीही बाकी शून्यच राहणार.
म्हणजे भक्तीचा आणि मनाचा गहिरा संबंध आहे. त्याच कारणही तसंच आहे. स्वतः भगवंतानी गीतेत लिहिलय जे वेदांचा पुनरुच्चार आहे, की इंद्रियांमध्ये मी मन आहे. म्हणजे भजणे याचा अर्थ मनात इच्छा धरून चिंतणे, स्मरण करणे, आठवण काढून जगदीश्वराला जवळ जवळ बाहणे. कारण तो मनात आहे म्हणून मनापासून त्याला स्मरणे, त्याच्या समीप राहण्याचा सतत यत्न करणे, नित्य त्याची आठवण काढून संसार कर्तव्य करणे. भगवंताला सतत स्मरणे म्हणजेच त्याच्या नावाचा जप करणे, नाम घेत राहणे. अर्थात नामस्मरण करणे तेही मनातून, मनापासून, मन ओतून भक्तीने, नारदपुराणात सांगितल्यानुसार. सर्व सद्गुरूंनी हेच पुराणातील , वेदातील सार सहज सोप्या शब्दात सांगितलंय, नामस्मरण करा, नित्य करा, भक्तीने करा, अविरत करा आणि हे सहजसाध्य आहे.
क्रमशः
©® लेखन व संकलन : प्रसन्न आठवले
२४/१०/२०१९
Comments
Post a Comment