Skip to main content

नवरात्र २०१९ माळ ५

नवरात्रातील पाचवी माळ श्रीस्कंदमाता

सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया |
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ||

भगवान श्री कार्तिकेय हे स्कंद या नावाने देखील ओळखले जातात. देवासुर संग्रामात हे देवांचे सेनापती होते. यांनाच कुमार आणि शक्ती या नावाने देखील त्यांना ओळखतात. यांची माता असल्याने देवीच्या या रुपाला देवी स्कंदमाता म्हणून ओळखलं जातं.

ही चतुर्भुजा देवी असून दोन्हीकडच्या वरच्या हातात कमलपुष्प असून खालील डावा हात वर देण्यासाठी उचलला आहे. उजव्या बाजूच्या खालील हाताने आसनावर विराजमान भगवान स्कंद यांना धरलेलं आहे. देवी कमळाच्या आसनावर विराजित असल्या कारणे देवीला पद्मासना देवी या नावाने देखील संबोधले जाते.  देवी सिंहारूढ आहे.

स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण होतात. या संसारातच मनुष्याला परम सुख , शांती आणि समाधान यांची अनुभूती प्राप्त होते. साधकांसाठी मोक्षाची द्वारं स्वमेव सुलभ होतात. स्कंदमातेच्या पूजनाने आणि साधनेने स्कंदाच्या अर्थात भगवान कार्तिकेयाच्या उपासनेचा लाभ स्वमेव प्राप्त होतो. हा लाभ फक्त स्कंदमातेच्या भक्तांना प्राप्त होतो. म्हणून मातेच्या उपासनेकडे भक्तांनी विशेष ध्यान दिले पाहिजे.

सुर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी असल्या कारणे देवीचे उपासक अलौकिक तेज व कांतीने संपन्न होऊन जातात. एक अलौकिक प्रभामंडल साधकांच्या चाहुबाजूला परिव्याप्त असतं. हे प्रभामंडल त्या साधकाचे योगक्षेम निर्वाहन करतं.
आपण यश कीर्ती आणि तेज यांच्या प्राप्तीसाठी स्कंदमातेचं स्मरण करूया.

कार्तिकेय माता ज्या म्हणती स्कंद सारे
कीर्ती स्कंदाची तव कारण जाणती सारे
ऐश्या या पुत्राची जाणती तुज माता सारे

जय देवी जय देवी जय जय  स्कंदमाता
भक्तांचे दैन्य दूर करण्या धावत ये आता

सुर्यमंडली वास तुझा, जग सारे तव तेजे
भक्त तुझे उपासना करती दे तेज तुझे
भक्तांचे योगक्षेम वाहसी हे ब्रीद तुझे

जय देवी जय देवी जय जय  स्कंदमाता
भक्तांचे दैन्य दूर करण्या धावत ये आता

भक्तीने प्राप्त होय सुख शांती समाधान
स्वानंदे  जाणवते संसार होई सुलभ जाण
मोहाचे क्षण येती जाती हे ही समाधान

जय देवी जय देवी जय जय  स्कंदमाता
भक्तांचे दैन्य दूर करण्या धावत ये आता

©® लेखन व काव्य : प्रसन्न चिंतामणी आठवले
०३/१०/२०१९
माळ पाचवी अर्पण !!!  🚩🚩🚩🌷🌷🌷

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...