ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९८
प्रभूंच्या समीप जाऊन चरणावर शीश ठेवून प्रणाम करून लक्ष्मण म्हणाला.
" प्रभू आपल्या आज्ञेनुसार मी माता जानकीना महर्षि वाल्मीकींच्या आश्रमासमीप सोडुन आलो."
प्रभू अत्यंत दुःखी अन्तःकरणाने अश्रु ढाळत बसले होते. ते काहीच बोलले नाहीत हे पाहून लक्ष्मण म्हणाला
" प्रभू , आपण असे शोकसंतप्त अवस्थेत बसण आपल्या सारख्या व्यक्तीला शोभा देत नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. कारण आपण स्वयं ज्ञानी आहात आणि जाणता की हे सर्व विधिलिखित आहे. आपल्याच पूर्वकर्मानुसार हे होत आहे. त्याचप्रमाणे प्रकृतिधर्मानुसार जे मिळालय ते जाणारच. आप्त , स्वकीय, सखा, बन्धु, दारा, माता पिता पुत्र , पौत्र हे कधी ना कधी तरी आपल्याला सोडून जाणारच.
त्याचप्रमाणे जे सोडून गेले तेही कधी ना कधी पुन्हा भेटू शकतात. तेंव्हा कदाचित हा वीरह कायमस्वरूपी नसेलही. मुळात या सर्व गोष्टी पूर्वकर्मानुसारच आहेत. अस शास्त्रवचन आहे. जे मिथ्या असू शकत नाही. त्यातही आपण नरश्रेष्ठ आहात आणि सर्वसामान्य व्यक्ति नसून अयोध्यापति आहात. हे सुद्धा आपल्याला विसरता उपयोगी नाही.
माता जानकी या, थोर तपस्वी महामुनी वाल्मीकि यांच्या, आश्रमात गेलेल्या मी पाहिलय त्यांमुळे त्या सकुशल असतील हे सुद्धा मी सांगू इच्छितो. आपण आपले राजा म्हणून प्रजेशी असलेले कर्तव्य पार पाड़ावे. त्यात काही न्यून राहू नये. कारण आपण असाच शोक करत राहिलात तर तोहि लोकाप वादास कारण ठरेल. म्हणून सुद्धा आपण या शोकातुन अवस्थेतून बाहेर यावे हेच माझ प्रामाणिक मत आहे"
लक्ष्मणाच्या या बोलण्याने प्रभू भानावर आले आणि लक्ष्मणाला वदले
" हे महात्मा लक्ष्मण तुझ्या या कथनाने आणि शास्त्रसहित वक्तृत्वपूर्ण निवेदनाने मला आत्मिक बळ प्राप्त झाले आहे आणि तू जे राजा म्हणून माझे कर्तव्य मला सांगितलेस त्यावरून मला नृग राजाची एक कथा आठवली ज्याने अशीच कर्तव्यात चूक केली ज्यामुळे त्याला खुप मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागले. कारण जो राजा प्रजेप्रति आपल्या कर्तव्यात चूक करतो तो घोर नरकाला प्राप्त होतो. असही शास्त्रवचन आहे."
" हेज्येष्ठ भ्राता क़ाय आहे ती कथा याचे कथन करून मला उपकृत करावे."
" ऐक. खुप पूर्वी सत्ययुगात एक राजा नृग होऊन गेला. तो चक्रवर्ती सम्राट होता. तो स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकून न्यायनिवाडा करत असे. त्याने एकदा महायज्ञ करून हजारों लोकांना गायी , अन्न, वस्त्र व अलंकार दान केले. त्या दान केलेल्या गाईमधे एक गाय एका विप्राची होती. ती गाय चुकुन दुसऱ्या एका विप्रवराला दान करण्यात आली. "
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment