एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - १५
कृष्ण वाम कुक्षिवर वळताना गालातल्या गालात मिश्किल हसता हसता ज्येष्ठ भ्राता बलरामदादा यांच्या आपल्यावरील मायेने आनंदी झाला . दादा कृष्णाच्या चिंतेने आपल्या बिछान्यावर पहुडले. ब्राम्हमुहूर्त कधी झाला आणि झुजूमुंजू कधी झालं हे कळलंच नाही. पण अचानक बलरामदादाला जाग आली. त्याने कुशीवर पहुडलेल्या कृष्णाला जाग केलं आणि म्हणाला
"कान्हा उठा, जग उठलंय, आपल्याला निघायला हवं. दिवस सुरु व्हायच्या आत जर निघालो तर पुढे मोठी मजल मारता येईल. चल चल उठ. "
कृष्ण कुशीवरूनच उठत म्हणाला
"चला नवा दिवस, नवी जाग, नवी चेतना, नवी उर्मी, नवी ऊर्जा, नवोन्मेषाचा नवं साक्षात्कार "
"हे काय नवीन आज"
'नवीन नाही दादा मी रोज हे म्हणतो पण मनात म्हणतो. आज ओठानवर आलं इतकच "
"पण तरी किं अर्थम "
"स्वःताच्या मनाला पुन्हा नवीन दिवसासाठी तयार करायची माझी पद्धत आहे. मन जे रात्रभर सुप्तावस्थेत असत अचानक जाग आल्यावर पुन्हा कालच्या नकारात्मक घटनांची, विचारांची साखळी पुन्हा पकडू नये आणि त्यामागे धावू नये म्हणून मनाला नवीन उगवलेल्या दिवसांकरता तयार करण्याची एक पद्धत आहे. सकारात्मक ऊर्जा देण्यासाठीचा मंत्र म्हण हवं तर."
"अच्छा. छान. चल बाहेर लगेच आवरून निघूया."
बलरामदादाच्या मागोमाग कृष्ण बाहेर जातो. सर्व जण उठून आवरून निघण्याची तयारी करतात. इकडे गाव प्रमुखासह सर्व जण, मंडळींच्या आवरण्याची वाट बघत असतात. बलराम, कृष्ण यासह दोहोंच्या धर्मपत्नी आणि इतर सर्वजण आवरून गावाच्या प्रवेशद्वारापाशी जमतात. बलरामदादा म्हणतो
"आम्हाला आता निघण्याची अनुमती द्यावी. लांबचा पल्ला गाठायचा असल्यामुळे. आम्हास लवकर निघावयास हवं. आपण काल आमच जे अतिथ्य केलंत, त्याने आम्ही सर्वजण भारावले आहोत आणि आपल्या या आतिथ्याचे आम्ही आजन्म ऋणी राहू. आपलं गाव आमच्याच राज्यात असल्यामुळे काही समस्या असल्यास मोकळेपणाने सांगाव्यात म्हणजे त्याच निराकरण करणं सोप्प जाईल. "
गाव प्रमुख हात जोडून म्हणाले.
"महाराज आपले चरण आमच्या गावाला लागले हेच मुळात आमच सदभाग्य म्हणावं लागेल. आणि ज्यांच्या राजाची जोडी राम कृष्ण यांची आहे त्यांना समस्या असणार नाहीत. तरीही आपण विचारलंत हा आमचा बहुमान आहे. आपणच आपल्या सेवेची संधी आम्हाला दिलीत याबद्दल आम्ही उपकृत राहू. आमच्यातर्फे आपल्याला काही सदिच्छा भेट अर्पण करतो त्याचा स्वीकार करावा. "
असं म्हणून त्यांनी उंचीवस्त्रात बांधलेली काही वेष्टन असलेल्या भेटवस्तू समोर ठेवायला सांगितल्या.
"काय आहे "
त्यांनी पृच्छा केली.
"आमच्या गावाच्या काही कलाकारांनी मिळून काही काष्ठशिल्प तयार केलीत त्यातील काही आपल्या चरणी अर्पण करतो म्हणजे त्यांना नक्की बाजारात मागणी येईल. त्याच बरोबर काही लाकडी खेळणी आणि बांबूपासून बनवलेल्या काही वस्तू सुद्धा यात आहेत. आपल्याला नक्कीच आवडतील. "
बलरामदादा आणि कृष्ण यांनी मिळून त्या सर्वांचा स्वीकार केला. पण आत काय असेल याची उत्सुकता सर्वांइतकीच कृष्णाला सुद्धा लागून राहिली होती. पण दादापुढे काही बोलण्याची हिम्मत कृष्णाला झाली नाही. तरीही त्या बांधलेल्या बांबूच्या वस्तूमधून काही कृष्णाने आपल्या रथात ठेवण्यास सांगितलं. त्यावर कान्हाला दादा म्हणाले
"कृष्णा सर्व सेवकांकडे दे ठेवायला. नन्तर पाहू. "
"नको दादा. यात काय आहे हे बघण्याची उत्सुकता आहे. काही खास नसेल तरी बांबूच्या वस्तू म्हणजे एखादी बासरी असूच शकते."
यावर प्रामुख म्हणाले
'असूही शकते. कारण त्या कलाकारांनी जश्या पाठवल्यात तश्याच आम्ही ठेवल्यात. बघितल्या नाहीत. पण असूही शकेल बासरी. "
यावर कृष्ण आनंदी झाला आणि ते एक वेष्टन आपल्या रथात ठेवण्यास सेवकाला सांगितले. सेवकाने विचारले.
"महाराज आपण आधीसारखंच बलराम महाराजांच्या रथातून येणार ना. "
यावर कृष्णाने प्रश्नार्थक नजरेने दादाकडे पाहिल. दादांनी स्मितवदन त्यास दुजोरा दिला आणि म्हणाले.
'तुला सोबत घेऊनच सर्व प्रवास करीन असा मानस आहे ."
यावर कृष्ण, सर्व देवी आणि समस्त मंडळी मोकळेपणाने हसली. सर्व सामान निघालं. निघण्याची पूर्ण तयारी झाली आणि दादा कृष्ण व सर्व परिवाराने मंडळीस हात जोडून नमस्कार केला आणि निघण्याची अनुमती मागितली. अर्थात गावकऱ्याना गहिवरून आलं होत. आपल्या लाडकया राजाने आपल्या बरोबर एक रात्र राहून भोजन देखील केले याचा परमोच्च आनंद आणि आता ते सर्व निघणार याच दुःख अश्या संमिश्र भावनेने आणि मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी मंडळींना निरोप दिला. सर्व लवाजमा पुन्हा पुढील मार्गक्रमण्याकरता प्रस्थान करता झाला. इकडे गावकरी राजा आल्यापासूनच्या सर्व घटना एकमेकांना सांगण्यात पुनश्च हरवून गेले.
सर्व व्यवस्थित आहे याची खातरजमा करून सर्व रथ, घोडे गाड्या आणि सर्व साजसामान पुन्हा द्वारकेच्या दिशेने रवाना झाले. कृष्ण राहून राहून आपल्या रथात ठेवलेल्या उंची वस्त्रात बांधलेल्या त्या भेटवस्तूंच्या वेष्टनांकडे मधून मधून बघत होता. त्यामुळे दादा काय बोलत होता याकडे थोडस दुर्लक्षच होत होतं आणि दादाच्या प्रत्येक वाक्यागणिक हं , हो , नाही इतकं त्रोटक उत्तर कृष्ण देत होता. दादाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून त्याने प्रश्न केला.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
०८/०५/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment