Skip to main content

जानकी पुनःवनवास ९३

 

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९३

माता जानकी आपण वनात चाललो आहोत आणि तिथे काही काळ राहण होईल, म्हणून अत्यंत आनंदित होत्या. तिथे गेल्यावर क़ाय क़ाय करायच आहे, हे त्या लक्ष्मणाला सांगत होत्या. लक्ष्मण फक्त ऐकून मानेनेच उत्तर देत होता. माता हर्षभरित ,उत्साहित आणि प्रसन्न वाटत होत्या. पण लक्ष्मणाजवळ बोलायला शब्दच नव्हते आणि काय झालंय हे पण सांगता येत नव्हतं. त्यामुळे फक्त ऐकून घेणं आणि जुजबी प्रतिक्रिया देणं इतकंच लक्ष्मण करत होता. 

दुपारचं भोजन करून थोडा विश्राम करून पुन्हा त्यांनी वाटचाल सुरु केली. होता होता सूर्य अस्ताला जायची वेळ आली. म्हणून लक्ष्मणाने मातेला विचारून वाटेत थांबण्याची आणि रात्री मुक्कामाची व्यवस्था केली. ब्राम्ह मुहूर्ती उठून त्यांनी सूर्योदयाच्या आत प्रस्थान ठेवलं. एक दीड घटका गेल्यानंतर वाटेत गंगा नदी लागली. सुमंत आणि लक्ष्मण यांनी नावाड्याशी बोलणी करून माता व लक्ष्मण यांनी गंगा नदी पार केली. आर्य सुमंत रथासहित किनार्यावर थांबले. नावेत संपूर्ण प्रवासात, ज्या क्षणाला आपण सदैव टाळत होतो तो क्षण आता समीप येऊन  ठेपला, याची जाणीव लक्ष्मणाला झाली. त्याचं मन अत्यंत व्याकुळ  आणि उदास झालं होत. जस जसा पलीकडील किनारा जवळ येऊ लागला तस तसा लक्ष्मणाच्या अंगाला कंप सुटला होता. जो क्षण टाळावा असं मनाला वाटत होत तो क्षण अत्यन्त निकट येऊन स्वये हात जोडून प्रार्थना करत होता कि, शक्य असल्यास काळगती पुढे जाऊदे अथवा थांबू दे. 

लक्ष्मण व  माता किनाऱ्यावर उतरले. थोड़ पुढे जाऊन लक्ष्मण थांबला आणि तो क्षण समोर येऊन उभा ठाकला. इतका वेळ उरात दाटून आलेला, पण दाबून ठेवलेला, दुःखातिवेग अश्रुपाताच्या रूपात लक्ष्मणाच्या नेत्रातून अचानक वाहू लागला. तो मातेस म्हणाला. 

" हे माते अयोध्येच्या बुद्धिमान व पराक्रमी राजाने या नीचतम आणि निंदनीय कार्यासाठी मलाच नियुक्त करून या जगतात अनंतकाळ पर्यंत निंदेचा धनी केलं आहे. या नुसत्या विचारानेच माझ्या हृदयाची सहस्त्र शकलं होत आहेत आणि अगणित विंचू एकत्र डसावेत तसाच भास या क्षणी मला होत आहे. हे असलं लोकलज्जीत आणि निंदनीय कार्य करण्यापेक्षा जर मला मृत्यू आला असता तर तो हि हसत हसत स्वीकारला असता. कमीत कमी या जाळ्यात तर मी अडकलो नसतो. हे माते मी फक्त यात एक दूत आहे आणि हे करत असताना सुद्धा मला होणाऱ्या यातना कदाचित काळाला सुद्धा जाणवल्या असतील. " 

इतकं बोलून लक्ष्मण दुःखातिवेगाने आणि शोकसंतत्प अश्रूमय स्थितीत मातेपुढे जमिनीवर लोळण घेता झाला. अचानक घडलेल्या या घटनेने आणि लक्ष्मणाच्या अश्या जमिनीवर पडण्याने संभ्रमात पडलेल्या मातेने पृच्छा केली. 

"हे लक्ष्मणा काय झालय. मी खूप आधी पण तुला विचारलं होत कि सर्व कुशल आहे ना. नक्की काय झालय हे मला सांगणार का. तुला श्रीरामांची शपथ काय झालंय ते कृपया मला सांग. "

जेंव्हा मातेने अश्याप्रकारे शपथ घातली तेंव्हा उठून पण मान खाली घालून सद्गतीत स्वरात लक्ष्मण नाईलाजास्तव उच्चारता झाला. 

"हे माते आपल्या राक्षसराज रावणाच्या घरी घडलेल्या वास्तव्या संदर्भात राजा रामचंद्र यांच्या कानावर प्रजेकड़ून अनेक प्रवाद येऊ लागलें. ते सर्व त्यांनी स्वतःच्या मनात ठेवले. पण त्या सर्वांच्या कारणे  ......... ..... "

लक्ष्मणाच्या ओठातून शब्द बाहेर यायला तयार नव्हते. मातेने पुन्हा आर्जव केला कि, 

"जे असेल ते स्पष्ट सांग. "

"माते यात माझा काहीहि अपराध नाही आणि मी हे जाणतो कि आपण निष्कलंक आहात . हे महाराज सुद्धा जाणतात. पण लोकापवाद आणि लोकानुनय म्हणून त्यांनी आपला त्याग करण्याचं ठरवलं आहे आणि आपल्याला त्याच साठी येथे सोडून जाण्याची आज्ञा मला देण्यात आली आहे. हा आश्रम माझे दिवंगत पूज्य पिताश्री महाराज दशरथ यांचे परममित्र महर्षी वाल्मिकी यांचा आहे. हे परम पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. आपण इथे समाधानात राहावं. यापेक्षा जास्त मी काय सांगू. "

इतकं बोलून लक्ष्मण मातेच्या चरणावर लोळण घेता झाला. 

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...