एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - १४
साज शृंगार केलेल्या काही स्त्रिया व पुरूष, अतिथि स्थानापन्न होण्याची प्रतीक्षा करत होते. कृष्ण बलराम एका उच्चासनावर आणि त्याबाजुच्या आसनांवर रेवतीदेवी, रुक्मिणीदेवी यासह सर्व राण्या स्थानापन्न झाल्यावर सुंदर पदलालित्य करणाऱ्या बहारदार नृत्याविष्काराला सुरवात झाली. एक उत्तम कलाकृति एका उत्तम कलाकारापुढे अर्थात कृष्णापुढे सादर होत होती.कृष्ण अर्थातच याचा आनंद घेत होता.
कितीतरी वेळ यात निघुन गेला याच कोणालाच भान राहिलं नाही. कृष्ण स्वतः या नृत्य गायनादि कार्यक्रमामुळे आणि मुख्य ते इतकं अचानक समोर आल्यामुळे हरखुन गेला. बलरामदादा सुद्धा बेहद्द खुश होता. नृत्याविष्कार कार्यक्रम संपल्यावर मुखिया बलरामदादाकड़े येऊन म्हणाले
"भोजन व्यवस्था झालेली आहे आपण स्थान ग्रहण कराव म्हणजे बाकीचे सर्व भोजनास बसतील."
"जरूर "
अस म्हणून बलरामदादा उठून भोजनगृहाकडे रवाना झाले. अर्थातच त्यामागोमाग कृष्ण आणि इतर सर्व निमंत्रित भोजनास गेले. बलरामदादानी कृष्णाला विचारल
"बाकीच्या सर्व मंडळीच्या भोजनाची व्यवस्था ?"
"दादा आपण चिंता करू नये ती सर्व व्यवस्था मी जातीने पाहून आलोय."
" मग ठीक, म्हणजे आम्ही निश्चिंतपणे जेवू शकतो"
" अगदी विनाचिंता भोजन कराव आपण दादा. आपल्याला पाहूनच बाकीचे जेवतील."
कृष्णाने एक मिश्किल वाक्य टाकल. यावर दादासह सर्व मनसोक्त हसले. बलरामदादा म्हणाले
" जसे काही आपण अगदी आज्ञेत आहात आमच्या"
" भाऊजीना काहीही बोलू नये. ते आपल्या आज्ञेत पण आहेत आणि घाबरतात सुद्धा आपल्याला."
" तरीच म्हटल अजून वहिनी बोलल्या कश्या नाहीत"
" असत्य असेल तर तस सांगाव आपण"
रेवतीदेवी जरा घुश्यातच म्हणाल्या
" नाही नाही सत्य आहेच ते. पण तस आहे म्हणून आमचा धाक टिकून आहे अन्यथा कृष्णाने ........"
यावर सारे पुन्हा हास्यात हरवून गेले.
यथास्थित भोजन उरकली आणि गावकऱ्यानी अतिथिंच्या शयन व्यवस्थेची तजवीज केली. अर्थातच स्त्री वर्गाची वेगळी व्यवस्था होती. त्या तिकडे रवाना झाल्या. कृष्ण आणि बलराम काही काळ गावकाऱ्यान्शी गप्पा मारत बसले. नन्तर दोघेही शयनगृही रवाना झाले. तिथे काही काळ दोघानी पुढील प्रस्थानाची व्यवस्था आणि द्वारकेतून राज्यकारभार यावर चर्चा केली. गप्पांच्या नादात कृष्ण कधी झोपला ते कळलच नाही . बलरामदादा एकटेच बोलत असताना बराच वेळ प्रतिसाद का नाही म्हणून त्यानी बघितल तर बंधू झोपलेले. दादानी उठून कृष्णाला पांघरुण घातल. आणि म्हंटल
" सर्व जगाची चिंता करतो सतत. ज़गाच्या उठाठेवी करतो. स्वतःची काळजी नाही अजिबात. मी आहे म्हणून थोड़ा नियंत्रणात आहे. अन्यथा. असो."
कृष्ण वाम कुक्षिवर वळताना गालातल्या गालात मिश्किल हसता हसता ज्येष्ठ भ्राता बलरामदादा यांच्या आपल्यावरील मायेने आनंदी झाले. दादा कृष्णाच्या चिंतेने आपल्या बिछान्यावर पहुडले.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
०३/०५/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment