Skip to main content

जानकी पुनःवनवास ९४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ९४


इतकं बोलून लक्ष्मण मातेच्या चरणावर लोळण घेता झाला.

लक्ष्मणाचे हे दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण शब्द ऐकून माता जानकी धरणीवर कोसळल्या  आणि मूर्च्छित झाल्या. लक्ष्मण सुन्न होऊन समोरचं दृश्य पहात होता. तोही दिग्मूढ अवस्थेत होता. काही क्षण तसेच गेले. थोड्या वेळाने माता थोडया शुद्धावस्थेत आल्या. थोडस भानावर येत लक्ष्मणाला म्हणाल्या.

" लक्ष्मणा कदाचित विधात्याने मला फक्त दुःखच भोगायला जन्माला घातलं असावं.  मला साक्षात दुःख मूर्तस्वरूप समोर ठाकलेल दिसत आहे. मला माहित नाही कि गेल्या जन्मी मी असा काय प्रमाद केलाय किंवा कोणत्या स्त्रीचा तिच्या पतीपासून वियोग घडवून आणलाय कि, मी निष्कलंक , चरित्रवान आणि पतिव्रता असून सुद्धा मला पतिवियोग सहन करावा लागतोय.

आधीसुद्धा वनवासात पतिसेवेला आपला धर्म मानून वनवासातील सर्व दुःख व अडचणींना सुख मानलं. आता मी माझं हे दुःख कोणाला सांगू. इथे महर्षीनी विचारल्यावर मी कस सांगू कि मी काहीही दुष्कर्म केल नसतानासुद्धा महान राजा श्रीराम यांनी का माझा त्याग केलाय. मी या गंगेत स्वतःला झोकून प्राणत्याग सुद्धा केला असता. पण राजवंशाची वेल माझ्या कुशीत वाढत असताना, अशी निष्पाप जीवांशी प्रतारणा सुद्धा मी तरी करू शकत नाही. हे लक्ष्मणा तू तुझ्या राजाज्ञेच पालन कर त्यात तू कसूर करू नकोस आणि मला अभागीला इथेच सोडून निघून जा. पण जाण्याआधी मी जे सांगते ते तुझ्या राजाला जाऊन सांग.

सर्वप्रथम माझ्या वतीने तीनही माताना चरणस्पर्श करून प्रणाम कर.  त्यांना आणि महाराजाना मी त्यांचं क्षेमकुशल इच्छिलय म्हणून सांग. आणि धर्मपरायण महाराजाना सांग कि, हे रघुनंदना तुम्ही हे अंतःकरण पूर्वक जाणता कि तुमची जानकी चरित्रवान आहे आणि कधीही  तुमच्या हिताचीच चिंता करेल. हे वीर श्रीराम तुम्ही लोकापवाद आणि लोकानुनय याच कारणांसाठी माझा परित्याग केलात आणि हे करण्याने, तुमच्या अनुमानाने, जर लोकापवाद नष्ट होत असेल, तर मला हे देखील मान्य आहे. कारण माझ्यासाठी तुम्हीच माझं परमधाम आहात. माझं हे वाक्य सदैव धर्माचरणी असणाऱ्या आणि धर्माबाबत अवधानी असणाऱ्या प्रभू श्रीराम यांना नक्की सांग. जशी वर्तणूक तुम्ही तुमच्या बंधूना देता, तशीच वर्तणूक प्रजेला देणं हेच तुमचं कर्तव्य आहे आणि त्यानेच तुम्हाला कीर्ती प्राप्त होईल. हे देखील महाराज श्रीराम यांना अवश्य सांग. जस शक्य आहे तस लोकापवादापासून स्वताला अस्पर्श ठेवा, यातच तुमचं हित आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी अशी परिस्थिती येईल त्या त्यावेळी लोकापवादापासून कायम दूर रहा.

राहिला माझा प्रश्न तर मी एकपतिव्रता  स्त्री आहे आणि पती धर्म आणि पती हित हेच परम कर्तव्य मानत असल्यामुळे , मी मात्र सदैव आपल्या पतीच्या भल्याचीच कामना करेन. माझा हा संदेश तुझे  महाराज आणि  रघुकुल प्रतिपालक प्रभू श्रीराम यांना अवश्य सांग. आणि माझ्याकडे बघून जा कि,  या समयी तुझी वाहिनी जानकी गर्भवती आहे. "

हे ऐकताच लक्ष्मण विजेचा धक्का बसावा तसा स्तंभित झाला.

"ज्येष्ठ भ्राता हे जाणतात ? "

मातेने मानेनेच होकार देऊन लक्ष्मणाकडे बघितलं  आणि लक्ष्मण हताश होऊन अश्रू ढाळत जमिनीवर बसला. काही वेळाने पुन्हा उठून मातेला प्रणाम करण्याच्या हेतूने  चरणस्पर्श करून मातेला एक प्रदक्षिणा  करून आक्रन्दन करत जमिनीवर कोसळला.

"माते मी आजपर्यंत कधीही आपले मुखदर्शन केले नाही हे आपण जाणता. मग आज कस पाहू शकेन. माझी नजर सतत तुमच्या पायापाशी होती आणि राहील. "

इतकं बोलून मातेला पुनःश्च नमस्कार करून लक्ष्मण नावेत बसला.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...