ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९२
जानकी मातेने वनात जायला मिळणार आणि आपली ही मनीषा फलद्रुप होणार या आनंदात आणि उत्साहात लगबगिने आवरल. महालाबाहेरिल सज्जात रथाचे सारथी म्हणून स्वतः आर्य सुमंत आणि लक्ष्मण प्रतीक्षा करत उभे होते. मातेला पाहिल्याबरोबर लक्ष्मणाने चरणस्पर्श करून सादर प्रणाम केला.
मातेने रथप्रवेश केला आणि लक्ष्मण व नन्तर आर्य सुमन्त यानी रथात प्रवेश केला. आर्य सुमन्त यानी सूचक मुद्रेने लक्ष्मणाकड़े पाहिल. लक्ष्मणाने त्याना निघण्याची आज्ञा केली आणि रथ गंगेच्या दिशेने निघाला. लक्ष्मण दुःख व अश्रु लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.
मातेने मधुन मधुन विचारलेल्या प्रश्नाना त्रोटक आणि मोघम उत्तर देऊन वेळ निभावुन नेत होता. महाराज रामचंद्र यांच्या सूचनेनुसार मातेला आता काहीही सांगता येणार नव्हतं. ही अगतिकता आणि त्यातील दुःखाच्या आघातामुळे , पण त्याहीपेक्षा हे सर्व लपवण्यासाठी करावयाच्या कष्टप्रद प्रयत्नामुळे लक्ष्मणाला प्रचंड तणाव जाणवत होता. त्यातही रात्रभर निद्रा नसल्यामुळे जाणवणारा थकवा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
ते पाहून मातेने विचारल
" तुंमच्या चेहऱ्यावर ताण जाणवतोय. सर्व सकुशल आहे ना ? आपले ज्येष्ठ भ्राता ठीक आहेत ना ? त्यांच्याबाबत काही अघटित तर घडल नाही ना ? कारण इतका तणाव आपल्या चेहऱ्यावर मी वनावसात सुद्धा पहिल्याच स्मरत नाहीये. "
ज्यावर लक्ष्मणाने स्मितवदन करण्याचा यत्न करत सांगितल
" नाही माते सर्व सकुशल आहे आणि कार्य व्यस्ततेमुळे माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत असेल ."
माता म्हणाली
" तस असेल तर ठीक. पण आपला चेहरा वेगळ सांगतोय अस वाटल मला. मला तर हा प्रवास संपून कधी एकदा वाल्मीकि ऋषींच्या आश्रमात आपण पोहोचतो आहोत अस झालय. किंबहुना माझ मन तिथे आधीच पोहोचल आहे. किती सुंदर असेल त्यांचा आश्रम , हर तर्हेची व्रुक्षलता, वेली, फूल, हिरवागार निसर्ग, शेजारीच गंगेच झुळझुळ वाहणार निर्मळ जलप्रवाह, आश्रमातील त्यांचे निरागस शिष्यगण, त्यांचे ते कर्णमधुर आवाजातील मंत्रपठण, वेदांच्या ऋचा, ती सूक्त , विविध स्तोत्र यानी भारलेल वातावरण, खरच या सर्वाचा किती सुंदर परिणाम आपल्या मनस्थितिवर होईल. कदाचित तिथुन निघू नये असही मनास वाटेल. पण परत जाव तर लागेलच. कदाचित परतून पुन्हा येण्यासाठी."
मातेचा प्रत्येक शब्द एखाद्या तीरासारखा लक्ष्मण आणि सुमन्त यांच्या काळजात प्रहार करत होता आणि रक्तरहित जखमा करत करत पुन्हा पुन्हा प्रहार करत होता. सुमंताना निदान रथ हाकण्याच कार्य तरी होत. त्यांमुळे ते त्यात मग्न असल्याचा आभास निर्माण करत होते. पण लक्ष्मणाची स्थिति किती केविलवाणी होती.
मातेसमान जानकी देवीना पित्यासमान भ्राता ज्येष्ठ श्रीराम नव्हे महाराज रामचन्द्र यांच्याच आज्ञेनूसार वाल्मीकि ऋषींच्या आश्रमापर्यन्त कायम स्वरूपी सोडून यायच होत. यासाठी प्रभुनी आपलीच निवड का केली. का या अहितकारक कार्यात आपल्याला सहभागी व्हाव लागतय, याचं नियतिकडे उत्तर लक्ष्मण मागत होता आणि ही यात्रा देखील संपू नये अस वाटत होत. आजन्म ही चालावी निदान पुढील हृदय पिळवटून टाकणाऱ्या कार्यातून मुक्तता होईल. हे नियति का हा सुड आरंभलास आणि त्याच दुर्भाग्यपूर्ण साक्षित्व व सहभाग माझ्याच भोगात का.? क़ाय मी अपराध केलाय की मातेला त्यागण्याच्या कार्याची ही स्थिति आली आणि त्याच उत्तरदायित्व युगानुयुगापर्यन्त या लक्ष्मणाकड़े सोपवलस. हे नियतिकारा का का का ?
मनातल न सांगता येणाऱ्या अगतिक स्थितिच उत्तर लक्ष्मण नियतिकडे आणि ईश्वराकडे मुकपणे मागत होता. आर्जव करून, त्राहि त्राहि करून , पण चेहरा भावशून्य ठेवण्याचा प्रयत्न करत. विचित्र स्थिति होती. कदाचित नियति सुद्धा मूक रुदन करत असेल या क्षणी .
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment