एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - १३
इकडे मजल दरमजल करत वृन्दावनातून निघालेल्या सर्व गाडया गोकुळात पोचल्या. गाड़ीवान आणि गोप सर्व मुलींना व स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या घरी पोचवून मगच आपल्या घरी गेले.
तर मथुरेहुन द्वारकेला निघालेल्या सर्व गाडया , रथ , सर्व लवाजमा न्याहारिसाठी वाटेत थांबला. कृष्ण आणि बलराम काही विचार विनिमय करण्यास्तव जरा दूर अंतरावर एका हिरवळीवर जाऊन बसतात. बलराम म्हणतो.
" आता थोडे गेल्यावर जवळ एखाद गाव बघू आणि रात्रीचा मुक्काम तिथेच करण्याचा बेत आखूया. म्हणजे पुन्हा ताजेतवाने होऊन पुढील मार्ग क्रमणा करता येईल. "
" हो दादा जस तुम्ही योग्य समजाल तस. मग तस सांगतो मी सर्वांना कळवायला. "
" हरकत नाही "
बलरामाची आज्ञा मिळताच कृष्ण आपल्या सारथ्याजवळ जाऊन त्याला सर्व सेवक वर्गाला सांगायला सांगतो. त्याचप्रमाणे सेनापतीला बोलावून आज्ञा देतो कि
"न्याहारी नन्तर एखाद घटका प्रयाण करून जवळच जे गाव लागत असेल त्यालाच मध्य करून आपला सर्व लवाजमा थांबावण्याची आणि रात्रीच्या मुक्कामाची तयारी करा. त्याच प्रमाणे रात्रीची गस्त आणि पहारे यांसाठी पथकं तयार करा. सर्व कार्य सुनियोजित पद्धतीने होऊद्या आणि जवळ असलेल्या गावाला आणि त्यातील लोकांना आपला व आपल्या सैन्याचा काहीही त्रास होणार नाही याची जबाबदारी तुमची असेल."
सेनापती लगेच "जशी आज्ञा. आपण निश्चिन्त असावं. सर्व आपल्या आज्ञेनुसार होईल. "
"ठीक तर. प्रस्थानाची तयारी करा न्याहारी झाली असेल तर. "
सेनापती प्रणिपात करून निघून. जातो आणि कृष्ण बलराम दादाकडे परत येतो.
"आपल्या आज्ञेनुसार सर्व सुखरूप होईल. प्रस्थान करूया? "
"सर्वांची न्याहारी झाली असेल तर निघूया. एखाद घटका चालून मुक्कामाची व्यवस्था बघू. "
" जी दादा. चालावं"
असं म्हणून बलरामाच्या मागोमाग आज्ञाधारक धाकट्या बंधू सारखा कृष्ण चालू लागतो. सर्व जण आपापल्या गाडी, रथ यावर स्वार होऊन तयार आहेत आणि कोणीही मागे नाही याची खात्री झाल्यावर बलरामदादा पुढे चालण्याची आज्ञा देतो. जवळ जवळ दीड घटिका चाल केल्या नंतर सर्व लवाजमा एका गावाच्या जवळ पोहोचतो. कृष्ण गावातल्या प्रमुखाला निरोप पाठवतो. त्या निरोपापाठोपाठ गावाच्या प्रमुखाबरोबर गावातील काही प्रतीष्ठीत आणि जाणकार मंडळी असा एकूण ८ , १० जण कृष्ण ,बलराम यांच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि गावचे प्रमुख हात जोडून म्हणतात.
"मथुरानरेश बलराम आणि श्रीकृष्ण यांना आमचा सादर प्रणाम. आमच्या गावाजवळ आलेत आणि आम्ही त्यांना गावाबाहेर ठेवलं तर लोकं आमच्यावर छी थू करतील, आमची निंदा करतील. या क्लेशापासून आपणच आमची सुटका करू शकता. "
"ती कशी काय" कृष्ण विचारतो.
"अर्थातच आमच्या गावात येऊन, आमचं आदरातिथ्य स्वीकारून आणि आम्हाला उपकृत करून. "
कृष्ण बलराम दादाकडे बघतो. बारामदादा मानेनेच होकार देतो.
"ठीक आहे पण आम्हाला राहण्याचा आग्रह करू नका. कारण आम्हाला खूप दूर जायचंय. त्यामुळे आम्ही प्रातःसमयी प्रस्थान करू. या एकाच अटीवर आपली विनंती बलरामदादा स्वीकारतील. "
"अवश्य. आपले पदस्पर्श गावाला लागले तरी आमचं गाव आणि आम्ही पवित्र आणि शुद्ध होऊ. तेंव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. चलाव. "
गावप्रमुख आणि बरोबर आलेली मंडळी ज्या गाड्यांमधून जाणार होते त्या गाड्या पुढे ठेऊन बाकीच्या गाड्या मागे घेऊन मुख्य मुख्य मंडळी बरोबर घेऊन आणि बाकीच्यांची व्यवस्था एका विस्तीर्ण जागेत लावून गाड्या निघाल्या.
इकडे गोकुळात राधेला आज काहीही सुचत नव्हतं कारण कृष्णाची आणि तिची भेट नियतीने होऊ दिली नव्हती. तिच्या मनात राहून राहून एकच विचार होता कि, नियतीने निदान काही काळासाठी असलेली हि शेवटची भेट का होऊ दिली नाही. याच चिंतेत आणि विचारमग्न अवस्थेत, निराश मनःस्थितीत राधा मनात कृष्ण आणि त्याच्या मुरलीचाच विचार करत असते आणि संध्या समय सुरु होतो.
गावाकडे निघालेल्या सर्व गाड्या अंधार पडायच्या आत गावात पोचल्या. गावात हर्ष आणि उल्हास यांचं वातावरण आहे. सर्वत्र कृष्ण आणि बलराम संपूर्ण कुटुंबासह आलेले पाहून जणू एखाद्या सणासारखा उत्साह सर्व गावकऱ्यांच्या अंगात संचारलेला आहे. जाताना गाव प्रमुखाने कल्पना दिलेली असल्यामुळे. जेवणा खाण्याची व्यवस्था करण्यात आणि साज सजावट करण्यात काही लोक गुंतलेले आहेत. सुनियोजित पद्धतीने कृष्ण आणि सर्व परिवाराचं स्वागत करण्याची सर्व तयारी पूर्ण होत आलेली. आहे. आलेल्या अतिथींना उतरायची व राहण्याची व्यवस्था दाखवण्यासाठी प्रमुख आणि काही मान्यवर जातात. इकडे बाकीची मंडळी सर्व तयारी कितपत झाली आहे,याचा अंदाज घेत आहेत.
ऐकूण सर्व वातावरण आणि उत्साह पाहून बलराम आणि कृष्ण दोघेही खुश झाले.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
२९/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment