अध्यात्म विराम १८८ ज्ञान माणसाला सत्य आणि मिथ्या, योग्य व अयोग्य, अती आणि संयत, अनावर आणि नियंत्रण यातील फरक मुख्यतः जाणवून देतं. ज्ञानाने कृती किंवा कर्म योग्य पद्धतीने घडेल, ही शक्यता पूर्ण ठामपणे जरी सांगता आली नाही तरी, ज्ञानाने मनाचे चक्षु नक्कीच उघडतात आणि त्याने कार्य करण्याची, जग वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. अर्थात दृष्टी आली म्हणजे कार्य घडेल किंवा योग्य कृती होईल, याची शक्यता असेलच हे विश्वेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही. पण जाणिवेची केंद्र जागृत होतात. बरेच वेळा एखादी नवीन माहिती, आपल्याला मिळाल्यावर, आपण म्हणतो अरे हे तर माहीतच नव्हतं. अर्थात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे इथे मुद्दाम स्पष्ट करू इच्छितो. तर माहिती म्हणजे फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. खरं ज्ञान हे ते जे मनाला, मनातील जाणीवेच्या केंद्रांना आणि त्याद्वारे मनःचक्षुंना योग्य आणि अयोग्य हा सारासार विचार करण्याची किल्ली मनाला प्राप्त करून देतं. असा सारासार विचार करायची दृष्टी मनाला प्राप्त झाली की, हळूहळू, त्या मार्गावर नियमित चालताना, विवेक जागृत होतो. विवेक हा सारासार विचार आणि योग्य दृष्टी य...