Skip to main content

उठी उठी गोपाला भाग २

 उठी उठी गोपाला – गीत विश्लेषण भाग २



मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला

स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला



पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला

गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला

धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला



रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन

सान पाऊली वाजति पैंजण छुन छुनन छुन छुन

कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण

एकतानता कुठे लाविते एकतारीची धून

निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला



राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला

सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला

वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला

तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला



गीतकार : बाळ कोल्हटकर,

गायक : कुमार गंधर्व

संगीतकार : वसंत देसाई

नाटक : देव दिना घरी धावला



अश्या या समयाचं वर्णन मांडायचं म्हटलं तर ते अद्भुत दृश्य भौतिक नेत्राना अनंत सुख देणार आहे देवा. पूर्व दिशेला रवीराजा स्वये गुलालरूपी किरणांना पसरून जगाला उतिष्ठ होऊन कार्यरत होण्यास आणि कर्मेंद्रियांना जागे करण्याचे ज्ञान देण्याचं आपलं नित्याच पण तितकंच महत्तम कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याचा, या तेजाचं दिपरूपी ज्ञान जगात चहूकडे आनंद पसरण्यास सिद्ध होत आहे. आपल्याला प्रिय असलेलं गोधन अर्थात गौमात आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे गोरस म्हणजेच क्षीर आधी आपल्या प्रिय वासराला पाजून नन्तर उरलेलं गवळ्याच्या हाती अर्पण करून, आपल्या आजच्या दिवसभराच्या चारापाणी व्यवस्थेसाठी गवळ्या सोबत यमुना नदीच्या काठावर वसलेल्या विस्तीर्ण कुरणांमध्ये चरण्यासाठी केंव्हाच प्रस्थान करत्या झाल्या आहेत.



आपल्या सेवार्थ असलेले दास दासी देवी रुक्मिणी आणि देवी सत्यभामा यांसह धुपाराती, दिपाराती अश्या अष्टसात्विक भावाचे निरांजन हाती घेऊन आपल्याला क्षीर व शर्करामिश्रित खीर, नवनीत, यांचे तबक पात्र घेऊन आपल्याला नैवेद्य म्हणून हे अर्पण करण्यासाठी केंव्हाच येऊन आपल्या नेत्रांचे प्रकाशमय दर्शन व्हावे या हेतुप्रीत्यर्थ येऊन उभे आहेत, हे वासुदेवा. या सद्रुपी उपचाराचा स्वीकार आपण करावा यास्तव त्या प्रार्थना करत आहेत.



फक्त राजप्रासादच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुवासिनींनी भल्या पहाटे किंबहुना ब्राम्हमुहूर्ती उठून स्नानसंध्या व पूजा आदि नित्यकर्मे सर्व विधिपूर्वक भक्तिभावाने पूर्ण केली आहेत. घरातील नित्यकर्मे उरकून त्या ललनांनी रस्त्यांवर सडा समार्जन करून मार्गांसह सर्व शहर परिसर विविधरंगी रांगोळ्यांनी सजवला आहे. त्या विविध रंगी रांगोळ्यातून विविध प्रकारची पुष्परचना केल्यामुळे त्या रांगोळ्यांची शोभा अजून देखणी झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याची शोभा बघण्यालायक झाली आहे.



या सजावटीमुळे सुशोभित सर्व परिसराची आणि प्रभातीच्या सुमुहूर्ताची शोभा वाढवण्यासाठी काही आकर्षक वसने परिधान केलेल्या छोट्या कुमारिकांनी व बालिकांनी आपल्या पायात पैंजण बांधून सुंदर नृत्याविष्कार सुरू केला आहे. त्यांच्याच छोट्या छोट्या नाजूक पायातील पैंजणांचा कर्णमधुर ध्वनी छुनू छुनन छुनू छुनू असा, वातावरणात मिश्रित होऊन राजवाड्यावापर्यंत पोहोचला आहे. त्याचा नाद आणि त्यांची नाजूक पावलं ही अगदी दैवीच भासत आहेत.



© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

११/०९/२०१८

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...