Skip to main content

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग १

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग १

श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं ।
नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥

कन्दर्प अगणित अमित छवि नव नील नीरद सुन्दरं ।
पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥

भजु दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं ।
रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥

सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं ।
आजानु भुज शर चाप धर संग्राम जित खरदूषणं ॥४॥

इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं ।
मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥


गोस्वामी  तुलसीदास विरचित जगत्पालक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या स्तुतीपर रचलेलं हे अलौकिक अद्भुत शब्दातील गीत आणि त्याला अनेकांनी चाल लावून याच केलेलं सोन. हे सर्वश्रुत आहे.  तरीही माझ्या मते लतादीदींनी गायलेलं हे गीत आहे खरंच अप्रतिम, अविस्मरणीय, अवर्णनीय आणि अतुलनीय आहे. त्यांच्या इतर गाण्यांप्रमाणे प्रत्येक शब्द स्वच्छ उच्चारलेला, प्रत्येक स्वर सूर तान पूर्ण शेवटाला नेऊन मग समेवर येऊन पुढची ओळ वा ध्रुवपद घेतलेल आणि गाण्यातील गोस्वामींना अभिप्रेत भाव जे दीदींच्या अंतरात्म्यातून आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचतात ती प्रत्यक्ष अनुभवणं हीच एक समाधी आहे. दिव्य आवाजाच्या या गळ्यातून दिव्य शब्दात परम ईश्वर प्रभू श्री रामचंद्र यांची स्तुती ऐकणं हा स्वर्गीय आनंद आहे. फक्त एकवेळ रात्री झोपताना आणि सकाळी बिछान्यातून उठण्याआधी हे ऐकून मग सांगा काय दिव्य अनुभूती मिळते. या गीतातून अवीट आनंद आणि गोडी मिळते हे वादादीत आहे. संस्कृत आणि अवधी अश्या मिश्र भाषेत रचलेलं पण मुख्यतः संस्कृतकडे झुकलेलं हे स्तुतिगीत प्रत्यक्ष प्रभुना समोर पाहूनच लिहिलंय  इतका आनंद हे गीत वाचताना वा ऐकतांना मिळतो. यात विभूषणं आणि खरदूषणं यात ष चा दीदींनी केलेला उच्चार अद्वितीय आहे. 

अर्थाकडे वळण्या आधी हे लक्षात ठेवलं पाहिजे कि हे गीत गोस्वामी तुलसीदास या महत्तम व्यक्तित्वाने रचताना एका भक्ताच्या नजरेतून प्रभू श्रीराम यांचं, गोस्वामींना झालेलं दिव्य दर्शन कथित केलं आहे. एकप्रकारे प्रत्यक्ष घटना घडताना जसंच्या तसं, त्याचं प्रत्यक्षदर्शीने केलेलं अचूक वर्णन आहे. म्हणजेच ज्या दिव्य नेत्रांनी गोस्वामी तुलसीदास यांनी पाहिलं त्याच नेत्रांनी केलेलं हे कथन  आहे. चक्षुर्वे सत्यम. म्हणजेच हे वर्णन प्रत्यक्ष प्रभूंचंच आहे जे कल्पनेने लिहिलेलं नाही, त्यामुळे ते वाचताना आणि गीतातून ते ऐकताना देह मन आणि आत्मा रोमांचित होतात. एक अद्वितीय अनुभूती प्रत्ययास येते, जर त्या गीताच्या शब्द सूर स्वर यात आपण तादात्म्य पावलो तर. 

साधारण सोळाव्या शतकातील संत गोस्वामी तुलसीदास यांनी या गीतातून प्रत्यक्ष प्रभूंची छबी वा प्रतिमा कशी दिसते याचं अचूक वर्णन केलंय. त्यातून प्रभूंच्या सानिध्यात राहण्याचा अलौकिक आनंद मिळतो. जो खरंतर अवर्णनीय आहे. त्याला अचूक शब्दात बांधणं त्याहूनही खरंतर कठीण आहेत. अर्थात हा योग अलौकीक आणि दिव्य विभूतींनाच लाभतो आणि शब्दात मांडणं शक्य होतं. गोस्वामी तुलसीदास यांचा कार्यकाळ इ.स. १५११ ते १६२३ आहे. त्याना महर्षी वाल्मिकी यांचा अवतार मानलं जातं . त्याच सुमारास १६०८ ते १६८१ या काळात महाराष्ट्रात थोर संत समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म आणि कार्य सुरु झालं. त्यांना प्रत्यक्ष श्रीहनुमंताचा अवतार मानलं जातं .मला स्वतःला  असं वाटतं कि, अश्या प्रकारच्या दिव्य पुरुषांच्या, त्यातही महर्षी वाल्मिकी आणि श्रीहनुमंत यांच्या एका मागोमाग एक अवतारा मागे अर्थातच त्यांची श्रीरामभक्ती आणि त्याची समाजात क्षीण होत असलेली स्थिती, अश्या प्रत्येक काळात त्यांचा जन्म हा फक्त योगायोग असू शकत नाही. तर त्यामागे एक सुसंगती अर्थात सूत्रबद्धता नक्कीच असणार. असो या अश्या सूत्रबद्धतेचा विचार अनेक दिव्य संत महंतांच्या जन्माबाबत मला येतो. त्यावर एक लेख नक्की लिहीन, वेळ काढून,  धर्मरक्षणातील सूत्रबद्धता या शीर्षकाने. 

भक्ताला भगवंताचं दर्शन व्हावं हा योग भक्ताच्या भक्तीतील तन्मयतेवर लीनतेवर अवलंबून असतो. अर्थात प्रारब्ध , संचित आणि भाग्य हे देखील यात महत्वाचं असतंच हे नक्की. अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईवर या दर्शनाचा लाभ अवलंबून असतो. ते दर्शन होणं हे महत्भाग्य आणि असं दर्शन घडल्यावर या जन्मात काही करण्याचं राहात नाही. मुळात प्रत्यक्ष महर्षी वाल्मिकीं एक दिव्य महर्षी. एका सामान्य वाल्या कोळ्याचा एक महर्षी होतो हे योग्य अनुसंधान, साधना, तपश्चर्या, योग, चिकाटी याची प्रचिती व प्रत्यय आहे. ज्यावेळी पंचमहाभूत देहातील आत्म्याच्या उन्नतीचा काळ येतो त्यावेळी तो देह कोणत्याही अवस्थेत व जन्मात असला तरी विधाता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या आत्म्याला त्याच्या उन्नतीच्या मार्गाकडे घेऊन जातो. ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याबाबत देवर्षी नारद यांच्या मार्फत त्या देहधारी दिव्य आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त झाला आणि रामनामाने एक कोळी महर्षी वाल्मिकीमध्ये परिवर्तित झाला. 

नामाची अशी अद्भुत अनुभूती अनेक देहधारी मानवांनी घेऊन उन्नती साधली आहे. रामायणकार या पदावर आरूढ होऊन झालेल्या व प्रत्यक्ष प्रभूंच्या जन्माआधी एक सहस्त्र वर्ष रामायण निर्मिलेल्या महाकवी वाल्मिकींनी प्रत्यक्ष महालक्ष्मी अवतारातील माता सीतेला आपल्या आश्रमात स्थान देऊन कुश आणि लव या प्रभूंच्या अंशाना सांभाळण्याचं महत्कार्यदेखील केलं. अशी दिव्य अनुभूती घेऊन तृप्त झालेले महर्षी पुन्हा तुलसीदास या मानवी देहात अवतीर्ण होऊन पुन्हा नामसाधना करून त्या दिव्यत्वाला प्राप्त करण्याचा योग साधतात, त्यावेळी या कार्याची आवश्यकता काय हा प्रश्न मनात निश्चित येतो. तीच गोष्ट रामदासस्वामी व अनेक दिव्य विभूतींविषयी. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता आणि संत महंतांच्या जीवनाची इतिकर्तव्यता हि नक्कीच भिन्न असते.  

।। श्रीराम जयराम जय जयराम ।।

क्रमशः 

संकल्पना आणि लेखक : प्रसन्न आठवले. 
१९/०९/२०२०





















Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...