Skip to main content

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग ३

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग ३


आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे 

घेऊन एकतारी गातो कबीर दोहे


गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा

वेलीवरी सुखाने निजला दमून वारा

कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे


भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध

ओठांत आगळाच आनंद काही धुंद

त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे


काहूर अंतरीचे भजनात लोप होई

भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई

उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे


गीतकार : मधुकर जोशी 

संगीतकार : दशरथ पूजारी

गायिका : सुमन कल्याणपूर


अश्या या भारलेल्या वातावरणात संपूर्ण नश्वर जगताला विसरून चिरंतन आनंदाचा प्रत्यय देणारं जगदीश्वराचं नाम संत कबीर  घेत आहेत. नाम घेत असताना त्या नामाची गोडी अजून अवीट व्हावी यासाठी ते एखाद्या सूत्रात वा वृत्तात बांधून त्यांना लयबद्ध शब्दांची जोड देऊन मांडलं तर मिळणारा आनंद आपल्याबरोबर संपूर्ण जगताला देता येतो. म्हणून कबीरांनी दोहे रचले. यात पुन्हा विचार जगताचा. त्यासाठी घेतलेला आधार म्हणजे दोहे. समजण्यास अत्यंत सोपे आणि ईश्वर सान्निध्याचा प्रत्यय आणून देणारे. एकतारीवर सुर आळवत कबीर आपली परमेश्वराप्रती असलेली भक्ती प्रकट करत आहे. 


आकाशरूपात आपल्या अस्तित्वाचा आनंद मुक्तपणे उधळणाऱ्या ईश्वराच्या या आनंदाचं प्रतीक वा प्रकटन म्हणजेच त्याच आकाशात उगवलेल्या, दिसणाऱ्या तारे तारका. त्या तारका जणू ईश्वराची  अनुभूती जगताला प्रत्ययास आणून देत आहेत. या तारका म्हणजे नील नभाला पडलेलं स्वप्न आहे. जे ईश्वराने आपल्या हाताने जगासाठी मुक्तपणे उधळून दिलं आहे. वाहता वारा हा चैतन्याचं जिवंत प्रतीक. ज्यावेळी वारा पडतो त्यावेळी जणू हास्य आनंद चैतन्य काही काळासाठी लोप पावला आहे असाच जणू भास होतो. परंतु हे चैतन्यदेखील ईश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर, त्या आनंदाची अनुभूती घेतल्यानंतर, आत्मरंगी रत झाल्यानंतर, स्थिर, स्तब्ध, शांत, निश्चल होतं. 


मेरुदंड हा देखील एखाद्या वेलीसामान असतो, आकाराने. त्याच्या मुळाशी अर्थात मूलाधार चक्राशी कुंडलिनी शक्ती शांत स्वरूपात स्थित असते, सर्पाकार वेटोळे करून. ती योगमायेने वा शात्रोक्त पद्धतीने अथवा भक्ति मार्गाने जागृत झाल्यावर   सहा पायऱ्या चढून सातव्या स्थानावर अर्थात सहस्त्रार चक्रात स्थित होते. तिथे पोचल्यावर ती शांत होते अर्थात निजस्थानी स्थित झाल्यामुळे. अर्थातच हि प्रक्रिया हि निश्चितच कष्टदायक असल्यामुळे सहस्त्रार चक्रात पोहोचल्यावर ती शांत होते. तश्याच पद्धतीने वारा अर्थात चैतन्यरूप शक्ती निजस्थानी शांतपणे निद्रा घेत आहे, ध्यानरूपात. 


गोकुळ वृंदावन आणि मथुरा म्हणजे कृष्ण वास्तव्याने पावन झालेला परिसर. अश्या या भक्तीने भरलेल्या परिसरात आल्यानंतर कालिंदी म्हणजेच यमुना नदी, जी मथुरा, वृंदावन गोकुळ इथपर्यंत येताना आवेगात असते, परंतु तिचे पात्र आणि त्यातील जलप्रवाह कृष्णाच्या वास्तव्य स्थानी आपल्यानंतर निरंतर नित्य शांत होतं. इथल्या भक्तीचा भारलेपणा घेऊनच आपल्या पुढील प्रवासाला निघते, परंतु शांतपणे. 


संत कबीर म्हणजे नाममय आयुष्याचं मूर्तिमंत उदाहरण. एखादी काया ब्रह्मस्वरूप करण्यासाठी तिच्याठायी वसलेल्या अंतरात्म्याला मन, इंद्रियं आणि पंचमहाभुतरूप देह ज्यावेळी अलौकिक सार्थ साथ देतात आणि त्या चैतन्याच्या आनंदात हरवून  जगाला विसरून फक्त परम ईश्वर आराधनेत रत होतात, त्यावेळी त्या देहात प्रत्यक्ष ईश्वराची शक्ती स्थिरावते. तो पूर्ण देह भक्तिरूपात रत होऊन जातो. 


जागृती व निद्रा या दोन्ही अवस्थेत त्या देहातील आत्म्याला फक्त निर्गुणरूप ब्रम्ह सगुणरूपात दिसायला लागतं . अश्या उच्च कोटीतील भक्ताचा संपूर्ण देह परम पावन आणि भक्तिमय एखाद्या सुगंधित धुपासारखा असतो. तो स्वतः भक्तीच्या मार्गात क्षण क्षण जळत राहून जगाला त्या निरामय भक्तीचा आनंद दोन्ही करांनी देत असतो. अश्या दिव्य आत्म्याच्या आतील आवाज हा त्याच भक्तीच्या भारलेपणाने सदगतीत आणि सुगंधित असतो. त्याच्या प्रत्येक स्वरात भक्तीचा सूर नवविधा सुगंध घेऊनच येत असतो.


क्रमशः 


©® विश्लेषक : प्रसन्न आठवले

१४/०९/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...