गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग ३
श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं ।
नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥
कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं ।
पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥
भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं ।
रघुनन्द आनन्द कन्द कोसल चन्द दशरथ नन्दनं ॥३॥
सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं ।
अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥
इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं ।
मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥
खरंतर स्वतः गोस्वामी तुलशीदास यांनी प्रत्यक्ष रामाचे दर्शन घेऊन या गीताची रचना केले आहे हे नक्की. परंतु त्याच वेळी हे गीत समस्त राम भक्तांना प्रेरणादायी ठरावं म्हणून मनाला संबोधून वदलं असल्याचं दर्शवून ही रचना केली आहे हे पदोपदी जाणवतं. म्हणूनच तसा उल्लेख ते सुरवातीलाच करतात.
स्वतःच्या मनाला, श्रीरामांचं अलौकिक दिव्य दर्शन आत्मा मनाला संबोधून, वर्णीत आहे ही संकल्पना म्हणजेच आत्मा हा मनाच्या पार जाऊन, तिथून त्रयस्थपणे मनाला या दिव्य दर्शनाचा वृत्तांत कथन करत आहे. यात हे मन गोस्वामी तुलसीदास यांचं असलं तरी ते प्रातिनिधिक स्वरूपातील आहे. खरतर त्यांची इच्छा जगतातील सर्व श्रीरामभक्तांना उद्देशून लिहिण्याची आहे.
कृपेचा महासागर असलेले प्रत्यक्ष परमानंद दयानिधी कैवल्यमुर्ती श्रीराम. करुणेचा अपार सागर देखील आहेत. वात्सल्यमूर्ती आहेत. कृपेचा सागर असल्याचा अत्यंत जिवंत दाखला वास्तविक रावणयुद्धाच्या वेळी सापडतो. ज्या महापापी असुराने निर्दयपणे निष्कलंक माता सीतेला पळवून नेलंय हे ज्ञात असूनसुद्धा, त्याला शेवटची संधी देण्याची इच्छा प्रत्यक्ष प्रभू व्यक्त करतात.
या महाबलवान असुर असलेल्या आणि तिन्ही लोकांना त्राही करणाऱ्या रावणाला आपण सहज यमसदनी पाठवू शकतो हे माहीत असूनसुद्धा अशी संधी देऊन मात्र सीतेच्या बदल्यात तुला जीवित सोडतो हे म्हणण्याचं धैर्य प्रभूंमध्ये आहे ते त्यांची कृपाळू वृत्ती दर्शवतं.
व्यक्तिगत मी किंवा इतर अनेकजण एखाद्या गोष्टीने रागावल्यानंतर काही काळासाठी तरी कृपेचा विचार देखील करू शकत नाही. इथे तर प्रत्यक्ष आपली धर्मपत्नी ज्याने बळे हिरावून नेली आहे, तो तिला उद्दामपणे सोडणार नाही म्हणतोय, तरीही त्याला जीवित सोडण्याचं आश्वासन प्रभू देतात, हे कल्पनातीत आहे, हे नक्की.
असं आश्वासन एकदा प्रभूंनी दिल्यावर त्री जगतात त्या व्यक्तीला काही इजा करण्याचं धैर्य कोणतंही नाही. म्हणजेच शस्त्रत्याग करून देवी जानकीला आपल्या स्वाधीन केल्यानन्तर या कार्याची पूर्तता झाली. तद्नंतर शस्त्रहीन रावणाला मारून काय उपयोग इतक्या सहज विचाराने रावणासारख्या दानवावर कृपा करून त्याला जीवित सोडून देणं ही कृपेची परमावधी आहे.
याची उलट बाजू आपण तपासू. जे प्रभू प्रत्यक्ष दानवराज रावणावर कृपा करून त्यालादेखील मरणोत्तर मोक्ष प्रदान करू शकतात, तेच कृपानिधान प्रभू आपलं नाम घेऊन साद घालणाऱ्या सर्वसामान्य भक्ताला किती आपलंसं करतील. नक्कीच आपल्या हृदयात स्थान देतील. त्यामुळे हे मना अश्या कृपासागर, दयानिधी प्रभू श्रीरामाना तू भज तू त्यांना नित्य स्मर, तू त्यांचं सदैव नाम घे.
इथे भजणे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
।। श्रीराम जयराम जय जयराम ।।
क्रमशः
©® संकल्पना आणि लेखक : प्रसन्न आठवले.
२१/०९/२०२०
Comments
Post a Comment