गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग १
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे
गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे
काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे
गीतकार ः मधुकर जोशी
संगीतकार ः दशरथ पूजारी
गायिका ः सुमन कल्याणपूर
काही काही गाणी ही अवर्णनीय आनंद देतात. त्या गाण्याच्या शब्दात , संगीतात जादू असतेच पण स्वर आपसूक त्या शब्दांचे अर्थ गर्भितार्थ आणि मतितार्थ श्रोत्यांच्या कानातून हृदयापर्यंत एखाद्या निर्मळ जलप्रवाहासम नेऊन स्थापित करतात. तो आनंद कल्पनातीत आणि खरतर शब्दातीत असतो. पुन्हा पुन्हा ते गीत ऐकायची ओढ निर्माण करतो. मला वाटत त्याच गुणांची मोहिनी मनावर, त्यामागे हृदय व आत्म्यापर्यंत पोहोचवणारं गाणं म्हणजे आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले.
गीतकार मधुकर जोशी ज्यांच्या काव्याची स्तुती प्रत्यक्ष गदिमानी केली आणि गीतरामयणानन्तर श्रीकृष्णाच्या चरित्रावर गीतमाला लिहिण्यासाठी जेंव्हा गदिमांना विचारणा झाली त्यावेळी प्रकृती कारणास्तव नम्रपणे नकार देत मधुकर जोशींच नाव सुचवलं आणि मधुकर जोशींनी गीतगोपाळ यशस्वीपणे पूर्ण केलं. त्याला यशवंत देव यांनी सुरातबांधून त्याचे कार्यक्रम देखील झालेत. मी स्वतः दूरदर्शनवर त्याचे सर्व भाग पाहिलेत. खूप छान गाणी लिहिली होती मधुकर जोशींनी.
मुळात कोणतंही भक्तीगीत लिहिताना त्या विषयाच्या खोलात शिरकाव केलेली व्यक्तीच त्या भावाला कमीतकमी शब्दात अतिशय परिणामकारकरित्या मांडू शकते. त्याही पुढे जाऊन हा विषय कुठेतरी अधिभौतिक पातळीवरून आत्मिक पातळीवर नेताना, योग्य त्या संकल्पना दृष्टांतरुपात वापरून, आणि निर्गुण निराकार परम शक्तीला कल्पून, तिच्या भक्तीत रममाण झालेल्या संत कबिरांच्या भक्तीची एकरूपता मांडताना, बाह्य चक्षूंना सहजी दिसणाऱ्या परंतु अंतर्यामी त्याचा अध्यात्मिक अर्थ विषद करतानासुद्धा शब्दांची चपखलता आणि साधेपणा राखून खूप अलौकिक परिणाम या गीतातील शब्दांनी साधला आहे.
मुळात भक्ती म्हणजे परमेश्वराच्या कल्पित सगुण रुपाला आठवत, त्याच्या नामाला आळवत त्या नामात एकरूप होणं. संत मीराबाई, संत कबीर यासारख्या संतांनी जगताला अत्युच्च भक्तीची परिमाणं उलगडून दाखवत असतानासुद्धा त्यातील सहजपणा, सच्चेपणा आणि तन्मयता जपली. स्वतःचा आत्मिक उत्कर्ष साधत येणाऱ्या अनेक पिढ्यांना एक सच्चा आणि निर्मळ आदर्श घालून दिला.
संतांच्या लेखी भक्ती म्हणजे फक्त ईश्वर रुपाशी नाम माध्यमातून एकरूप होणं. तेच खऱ्या अर्थाने जाणत असतात की, नाम हे एकतारीसारखं एकमार्गी तादात्म्य पावण्यास मदत करणारं निस्सीम साधन आहे, पण साध्य नाही. साध्य ईश्वराशी एकरूप होणं. त्यांचंच होऊन जाणं. हे गुह्य संत कबिरांच्या माध्यमातून सुंदरपणे मांडलं आहे. जे तितक्याच ताकदीने साधेपणाने सूर आणि स्वर यातून साकार झालंय.
बघूया त्याचा मनोहारी गूढ गर्भीत अर्थ, पुढल्या भागात.
क्रमशः
©® विश्लेषक : प्रसन्न आठवले
०७/०९/२०२०
२३:३७
Comments
Post a Comment