उठी उठी गोपाला – गीत विश्लेषण
भाग १
मलयगिरीचा चंदनगंधित
धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता,
उठी उठी गोपाला
पूर्व दिशेला गुलाल
उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन
गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा
सदुपचार चालला
रांगोळ्यांनी सडे
सजविले रस्त्यारस्त्यांतुन
सान पाऊली वाजति पैंजण
छुन छुनन छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते
टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते
एकतारीची धून
निसर्ग मानव तुझ्या
स्वागता असा सिद्ध जाहला
राजद्वारी झडे चौघडा
शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा
वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवि
मुरली, छान सूर लागला
तरुशिखरावर कोकिलकविने
पंचम स्वर लाविला
गीतकार : बाळ कोल्हटकर,
गायक : कुमार गंधर्व
संगीतकार : वसंत देसाई
नाटक : देव दिना घरी
धावला
खरच एखाद्या गीताचं
भाग्य असत इतकं थोर की त्याचे गीतकार , संगीतकार आणि गायक अर्थात पेशकर्ते हे इतके
दिगग्ज असतात की त्या गीताला, त्या काव्याला जन्म घेऊन धन्य वाटतं. अमरत्व,
माधुर्य, सहजता, सौन्दर्य, शालीनता , नजाकत, अंतरीचा अनाहत नाद , आत्म्याला
जाणवणारा त्याचा गोडवा आणि आत्मसुख हे सर्वच्या सर्व एकाच गीतात नव्हे काव्यात जर
असेल तर संगीतकाराला त्याला चाल लावताना खरच बहार येत असेल.
जर या गीताचे गीतकार हे
सुप्रसिद्ध नाटककार, कवी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अश्या चतुरस्त्र
भूमिकेत लीलया वावरलेले स्वर्गीय बाळ कोल्हटकर असतील, तर ते गीत अमरत्व घेऊनच
जन्माला येत. त्यांनी अनेक अजरामर नाटकांना जन्म दिला. नव्हे सर्व भूमिका लीलया
सांभाळून कायम उच्च पदी राहिले आणि तरीही त्यांचे पाय जमिनीवर होते अगदी
शेवटपर्यंत. या कवितेला नाटक देव दीनाघरी धावला या साठी त्यांनी लिहिलं, की
लिहिलेलं पद नाटकासाठी वापरलं ते ज्ञात नाही. पण हे गीत एक अद्भुत रसायन आहे.
सुंदर सुरवात असलेलं हे
काव्य कोल्हटकरांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष देतं. गोपालकृष्णासाठी कित्येक
भूपाळ्या अनेक दिग्गजांची लिहिल्या आहेत. माझ्या मते त्यात ही भूपाळी वरच्या
स्थानावर असेल, कदाचित " घनश्याम सुंदरा श्रीधरा " नन्तर. अनेक काव्य
लिहिलेले बाळ कोल्हटकर या गीतांची सुरवात इतकी सुंदर करतात की, तिथेच या गीताचं
सौन्दर्य खुलून येतं.
मलयपर्वतावर दैवी सुगंध
असलेल्या चंदनाच्या वृक्षांची वन आहेत. अर्थातच त्या दिशेकडून येणाऱ्या वाऱ्याला
निश्चित चंदनाचाच गंध असेल. अश्या मलगिरीच्या चंदनातून बनलेला धूप तोच सुवास घेऊन
चहू दिशाना पसरेल. असाच सुगंध राजप्रासादात सर्वत्र पसरला आहे. तो धूप घेऊन देवी
रुक्मिणी आपल्या महालात येऊन गेल्यामुळे त्याच्या चंदनयुक्त गंधाने आपला महाल
प्रफुल्लित झाला आहे. अश्या या सुगंधीत भावनेचा स्वीकार व्हावा. अश्या
ब्राम्हमुहूर्ती आपण आपली निद्रा पूर्ण करून या पूजेचा स्वीकार करून निद्रेतून
जागे व्हावे, हे गोपाळ, हे श्रीकृष्ण. नयनांची कमलरुपी कवाडे उघडून आपल्या
लोचनांच्या दिव्य तेजाने आम्हाला कृपादृष्टी द्यावी.
© ®संकल्पना व लेखन :
प्रसन्न आठवले
१०/०९/२०१८
Comments
Post a Comment