आत्मचिंतन भाग ४
मागच्या भागातील मुद्दा जरा विस्ताराने अभ्यासून पुढे जाऊ. माणसाने गेल्या पन्नास ते पंचाहत्तर वर्षात जी वैज्ञानिक प्रगती केली आहे.त्यातील एक महत्वाची प्रगती म्हणजे या आकाशगंगेत असलेल्या इतर ग्रह, इतर विश्व आणि त्याही पुढे असलेल्या इतर आकाशगंगा यांचा शोध घेण्यासाठी अनेक यांनं पाठवली आहेत. या सर्वांचा मुख्य आदर हा प्रकाशाची गती आणि ध्वनीची गती हाच आहे. म्हणजे सरतेशेवटी या दोन गोष्टी, या विश्वाला भेदून पुढे जाऊ शकतात हे विज्ञानाने मान्य केलं आहे.
म्हणजेच प्रकाश आणि ध्वनी यांच्या लहरी अमर किंवा अमर्त्य आहेत. अर्थात त्यांच्या लहरी या आपलं स्वरूप बदलू शकतात आणि आसमंतात विरून जातात, पण अस्तित्व टिकवून असतात. असं वाचण्यात आलेलं आहे की, कदाचित याच तत्वाचा आधार घेऊन, काही जर्मन शास्त्रज्ञ, या आधी घडून गेलेल्या भगवदगीता कथनाचा प्रभूंच्या आवाजाचा वेध घेऊन,त्यांना पुन्हा साठवण्याच्या प्रयोगाचा अभ्यास करत आहेत.
पण एक नक्की की, कोणत्याही लहरी या एकदा निर्माण झाल्या की, नष्ट होत नाहीत. मर्त्य जगतात सुद्धा अनेक गोष्टीतून आणि अनेक कारणांनी निर्माण झालेल्या लहरी, अमर्त्य असतात.त्याचप्रमाणे त्यांना स्थळ,काळ, त्रिमिती यांचं बंधन वा मर्यादा असत नाही. त्या काळाच्या व भौतिकाच्या पार असतात. म्हणजे एकप्रकारे अस्तित्व आहे म्हणून सगुण आणि म्हटलं तर अदृश्य त्यामुळे निर्गुण. आपल्या प्रत्येक कर्मातून अश्याच लहरी निर्माण होतात.
ज्या काया वाचा बुद्धी व मन या चारही माध्यमातून निर्माण होतात. त्या आपल्या इच्छित स्थळी जातात. हे इच्छित स्थळ, ही ईश्वरी व्यवस्था आहे तिथे त्या नोंदल्या जातात आणि त्यांची योग्य वेळ आली की, त्या पुन्हा आपल्याकडे फलस्वरुप होऊन परत येतात. हे म्हणजे एखादं झाड लावावं त्याप्रमाणे आहे. आता प्रत्येक झाडाचा पूर्ण होऊन, फळं व फुलं देण्याचा काळ योजलेला आहे. त्या त्या काळानंतर ते झाड फळ देणार, पण त्याआधी नाही.
म्हणजे कोणतं झाड लावायचं हे आपणच ठरवायचं असतं. पण एकदा झाड लावलं की, आपण फक्त त्याच्या पूर्ण रूप होऊन, फलरुप होण्याची वाट बघायची. बरं या कर्माच्या झाडाचं वैशिष्ट्य हे आहे की, त्याची निगराणी, मशागत करावी लागत नाही. एकदा कर्म केलं की, पुढे ईश्वरी व्यवस्था, त्या कर्माच्या लहरींना सांभाळून, त्यांच्या पक्व होण्याची पूर्ण सोय करते. म्हणजे ईश्वरा कडे अशी व्यवस्था अस्तित्वात आहे आणि ती व्यवस्था प्रत्येक कर्म लहरी नोंदवून घेते.
म्हणजे प्रत्येक कर्म ईश्वराकडून नोंदवले जातं हे नक्कीच. आता ही व्यवस्था खरच या ब्रम्हांडा बाहेर आहे की याच ब्रम्हांडात आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे, हे ईश्वर जाणे. कारण पारलौकिक विश्व, व्यवस्था यांचं अस्तित्व हे इश्र्वराधीन आहे.त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला, त्रमिती जगताची मर्यादा आड येत नसावी.अन्यथा मानवी देहात जन्म घेऊन सुद्धा या त्रिमिती जगताच्या पार असलेल्या जगताशी संपर्क ठेवण्याची शक्ती, सिद्धी असलेले पुण्यात्मे या जगतात आले, त्यांनी काही तप साधना इत्यादी करून, त्या सिद्धी प्राप्त केल्या.
अशी सिद्धी व त्यांची प्राप्ती ही मानवी शक्तीच्या बाहेर नाही. म्हणजेच या देहात, त्या सिद्धी व शक्ती यांच्या प्राप्तीचे मार्ग, साधन व सोयी ईश्वराने करून ठेवलेली आहे, हे नक्की.म्हणजेच अश्या सिद्धी व शक्ती यांच्या प्राप्तीसाठी साधना माणसाला करता येते. पण त्यासाठी भौतिक कर्मगतीत कर्मरत असताना, हे सर्व करता येतं का यावर उद्याच्या भागात विचार करूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२७/१०/२०२३
Comments
Post a Comment