आत्मचिंतन भाग २
मानवी देहात असताना आपण फक्त आणि फक्त देहाचा विचार केला, या गोष्टीला आठवून आत्मा, पश्र्चाताप पावतो. हा प्रत्येक क्षण होणारा पश्र्चाताप, खरतर आत्म्याला दाह देतो. हा दाह वा याचा अग्नी, वास्तविक अग्नी सारखा नसला तरीही, तो आत्म्याला नित्य जाळणारा असतो. आपण नैनं छिंदंती शस्त्राणी..... हे वचन वाचलं, ऐकलं आणि जाणलं आहे. पण तरीही मी, आत्म्याचा दाह होतो,असं का म्हणतोय, याचा विचार करूया.
भुलोकीच्या पंचतत्वातील अग्नी, जल, वायू, आकाश हे नक्कीच आत्म्याला काहीही करू शकत नाहीत. अगदी भुलोकीच्या गुरुत्वाकर्षण सारख्या कोणत्याही शक्तीचा सुद्धा त्यावर परिणाम होत नाही. कारण त्यांचा अधिकार फक्त पंचमहाभूतरूप देहापुरता आहे. देह संपला की, त्यांचं कार्य, अधिकार आणि उद्देश तिन्ही समाप्त होतं आणि ते पुन्हा आपल्या स्थानी विलीन होतात. त्यामुळे भगवंत जे सांगतात ते संपूर्ण सत्य आहे, ते या अर्थाने.
याचं विषयावर चिंतन करतांना, एक प्रश्न नेहमी मनात यायचा की, नरकात आत्म्याला ज्या यातना दिल्या जातात असं आपण वाचतो, त्या आत्म्याला कश्या काय, स्पर्शू शकत असतील, किंवा त्रास देऊ शकत असतील. कारण श्रीमद् भगवद्गीता तर आपल्याला आत्म्याबाबत वर मांडलेल्या श्लोकात वेगळच तत्वज्ञान देते आणि भगवंत मिथ्या वचन करण्याचा प्रश्नच येत नाही. ही श्रीमद् भगवद्गीता तर त्यांनी स्वमुखे अर्जुन या आपल्या सख्याला सांगितली आहे. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काहीतरी असणार. कारण मृत्यू नंतरचा नरकवास किंवा स्वर्गसुख हे देखील, याचं श्रीमद् भगवद्गीतेत भिन्न भिन्न श्लोकात मांडले आहेत.
यावर थोडं दीर्घ चिंतन करतांना, या दोन्हींची तर्कसंगती लक्षात येते. विचार करा की आपली कर्म ही आपल्या देहापश्चातसुद्धा आपला पाठलाग करतात आणि पुढच्या जन्मी आपल्याला त्याचे भोग किंवा उपभोग पूर्ण करूनच, पुढे जावं लागतं, हे निर्विवाद सत्य आहे. याचा वास्तविक अर्थ काय असेल.म्हणजेच फक्त देहापुरताच या विधानाचा किंवा व वचनाचा अर्थ लावायचा का. की यात काही गुह्य आहे, जे नरकवास किंवा स्वर्गसुख याचा अर्थ उलगडून सांगू शकेल. तेच आपण पाहू.
कर्मगती, कर्मफल म्हणजे नक्की काय असतं आणि अशी काय व्यवस्था आहे की जी अनेक देहात सुद्धा आपला पाठलाग करून,आपल्याला आपल्या कर्माचं दान पदरात देतेच देते. ती व्यवस्था नक्की मन व आत्मा यांच्या कोषात दडलेली असते. कारण हे दोनच आहेत, जे देहातून बाहेर पडतात, फिरत राहतात आणि पुन्हा देह प्राप्तीच्या इच्छेने, वासनेच्या मोहात देहपाप्ती मिळवतात.
पण त्या कोषात दडलेली, कर्माची साठवण, नक्कीच एखादी झीप फाईल अर्थात सूक्ष्म रुपात साठवलेला कोष असणार. आपल्या संगणक व्यवस्थेत ज्याप्रमाणे, झीप फाईल उघडून डाऊनलोड होण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली (प्रोग्राम ) असते, त्याचं पद्धतीची प्रणाली वा व्यवस्था, विधात्याकडे असते. जेणेकरून, देहातीत अवस्थेत, कर्माची फलश्रुती, उघडून, त्यातील भोग व उपभोग यांचं वाचन, कुठेतरी होत असणार.
त्याला यम, चित्रगुप्त या कोणत्याही नावाने संबोधू शकता. पण आहे तर ही तीच व्यवस्था, जी तुमचा हिशोब, आत्मा या देहातीत स्थितीत तुमच्या समोर मांडून दाखवते. तत्पश्र्चात त्यानुसार योग्य जागा निवडून, तिथे त्या आत्म्याला पाठवते. हा आत्मा अनेक जन्मात, अनेक देहांनी केलेले संस्कार, घेऊन, त्या हिशोब तपासनीस व्यवस्थेकडे, प्रत्येक जन्मातील मृत्यू पश्चात जातो.
आता या हिशोबाचा परिणाम काय आणि कसा होतो किंवा ठरवला जात असतो आणि तो आपल कार्य नक्की कसं करतो, यावर पुढील लेखात विचार करूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२५/१०/२०२३
Comments
Post a Comment