Skip to main content

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं.

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं. 

अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, द्वैतातून अद्वैताकडे, अज्ञाना कडून ज्ञानाकडे, तीमिराकडून प्रकाशाकडे जातानाचा प्रवास हा शिवाकडून पुन्हा शिवाकडे जाण्याचा प्रवास. हा प्रवास अनंत जन्मांचा असतो. म्हणूनच हा अनंताकडे जाणारा प्रवास आहे. शिवतत्व हे अगम्य आणि गूढ आहे. तो एक अग्निरुप ब्रम्हांड आहे.जीवाला तिथे जाण्यासाठी अनेक दिव्य पार करून जावं लागतं. यामधे आपले भोग व उपभोग संपवून किंवा त्यांचा मोह टाळून, पुढे जाणं अपेक्षित आहे. 

यातील शून्यातून शिवाकडे जाण्यात,चुका, प्रमाद, अज्ञान वश अनेक चुकीची कर्म घडतात. हा प्रवास म्हणजे एक यज्ञ आहे आणि यज्ञ म्हटलं की आहुती अपेक्षित आहे. ही आहुती, मोह, लोभ, माया, अज्ञान, दुष्कर्म यांची असावी लागते. पण या सर्वातून निर्माण झालेले व होणारे भोग व उपभोग हे या अहुतीला अपूर्ण ठेवतात. कारण प्रत्येक क्षणी आहुती अपेक्षित असते. पण प्रत्येक क्षणी भोग आणि उपभोग सुद्धा येतच असतात. 

या सर्वांना टाळून जाणं अशक्य आहे. या सर्वांना भोगून जाणं कष्टप्रद आणि ऊर्जा, शक्ती व वेळ यांचा अपव्यय करणारं आहे. पण द्वैत, अस्थिरता, अज्ञान, तीमिर यात अडकलेला जीव या सर्वांचा विचार करून, गांजलेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात शिवाकडे जाण्याचा विचार सुद्धा येत नाही,येऊ शकत नाही.अश्या आपल्या सारख्या सर्व अज्ञानी जीवांना पुढे नेण्यासाठी शिव तत्वाने. प्रकृती अर्थात पार्वती अर्थात शक्तिरुप मातेची निर्मिती केली.

कारण तो स्वतः अग्नितत्व असल्याकारणाने, त्या स्वरूपात जीवाला सांभाळून घेण्यासाठी, पुढे येऊ शकत नाही. म्हणून त्याच शिवतत्वाने आईस्वरुप देवी तत्वाची निर्मिती केली. आपल्या याचं देवी तत्वाला, पृथ्वीच्या परिभ्रमण काळातील काही दिवस अनेकानेक जड जीवांना, त्यांच्या पापातून, भोगातून, अज्ञानातून काही प्रमाणात मुक्ती देऊन, त्यांना या दीर्घ प्रवासात काही योजने पुढे नेण्याची संधी साधता यावी, यासाठी या नऊ दिवसात, हे शिवाचच शक्तिरुप तत्व, कैलासावरून भुलोकि अवतीर्ण होतं. 

त्या तत्वाच्या प्रभावाचा लाभ घेण्यासाठीचा पर्व काळ म्हणजेच हे नवरात्र. अर्थात हे नऊ दिवस व नऊ रात्री. या नऊ रात्रीच्या पर्वात प्रसारित होणाऱ्या या शक्ति तत्वाचा अखंड लाभ घेण्यासाठी, आपण नऊ दिवस नऊ रात्री अनेकानेक स्वरूपात पूजा, अर्चना, जागरण, गोंधळ, जोगवा, भजन, कीर्तन, देवीची घटस्थापना, पूजा आरती इत्यादी करून, मुख्यतः त्या तत्वातील शुद्ध, सात्विक, ऊर्जा व शक्ती लहरींना आपल्या देहात,बुद्धीत व मनात साठवून घेतो. किंवा तसं करणं अपेक्षित आहे. कारण या शक्ती तत्वाच्या पायावर आणि बळावर शिवाकडे जाण्याचा मार्ग सुलभ होत जातो. हाच अग्निस्वरुप शिव आपल्यातील चैतन्याला विश्वरुप विश्वात्मा परब्रम्ह तत्वाकडे घेऊन जातो.

म्हणून या उत्सवाचा आणि या नऊ दिवसांचा अनन्य होऊन सदुपयोग करून घ्या. त्यामुळेच पुढचा किंबहुना पुढच्या प्रत्येक क्षणाचा आणि जन्माचा मार्ग सुलभ होत जाईल. अर्थातच हे आपलं परम भाग्य आहे की, या भुलोकी आपण आद्य व मुलस्वरुप सनातन धर्मात जन्म घेतला. म्हणजे विधाता, विश्वात्मक शक्ती, शिव-शक्ती यांची सदिच्छा आहे की, आपण या मातृरूपशक्ती चैतन्याचा, पुत्र होऊन, लाभ घ्यावा. 

वर मांडलेल्या भावनेने, बुद्धीने, एकरूप होऊन, आपण जर या नऊ दिवसांचा पूर्ण सदुपयोग केलात,तर कदाचित हा अनंताचा प्रवास, कोण. जाणे याचं जन्मात संपेल. शेवटी शिव आणि शक्ती रूप भिन्न असलं तरी स्वरूप एकच आहे. 

सर्वांना या चैतन्यमय पर्वाचा लाभ घेण्याची बुद्धी होवो, हीच त्या शक्ती चरणी विनम्र प्रार्थना. 

जय श्री आदिशक्ती
जय श्री आदिदेव 

©® लेखन : प्रसन्न आठवले
१५/१०/२०२३
२१:२२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...