आत्मचिंतन भाग ५
मृत्यू पश्चात आपला हिशोब कसा असावा, याचा विचार माणूस तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत मृत्यू साक्षात समोर येत नाही. कदाचित त्याही वेळी, हाच विचार मनात येत असावा की,मी काय कमावलं किंवा काय गमावलं म्हणजे पुन्हा बेरीज वा वजाबाकी. म्हणजे पुन्हा व्यापारी हिशोब. पण हा व्यापारी हिशोब वरती किंवा जिथे कुठे ही कर्माच्या हिशोबांची उजळणी होते, त्या ठिकाणी होत नाही. तर तिथे किंवा त्या व्यवस्थेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तीनच मोजमापात आत्म्याच्या त्या देहातील जन्माचा हिशोब होतो.
त्यावर आधीच्या संचीतातील किती ठेव वा देणी शिल्लक आहे, ते मिळवून, एकूण ताळेबंद मापला जाऊन, त्यातून पुढे या जीवाला काय भोगायचे किंवा उपभोगायचे आहे ते काढले किंवा ठरवले जाते. म्हणजे आपण एखाद्या जन्मात मौज मजा आणि नुसती धमाल केली असेल तर, त्यानुसार आधीच्या संचीतातील ठेवीमधे घट होऊन, पुढील जन्मी फक्त आणि फक्त भोग अर्थात देणी शिल्लक राहू शकतात.
नक्कीच आपल्यासमोर, आत्मा देह सोडून गेल्यावर, हा हिशोब, होत असणार. म्हणजे तिथे आपल्याला नक्कीच आपल्या त्या आणि आधीच्या जन्मांची शिलकी समजत असेल. चैतन्य रुपात असलेल्या आत्म्याला, हे ज्ञान व ही जागृती सदैव असते. पण ही जागृती कुठपर्यंत असते तर, देह धारण करू तोपर्यंतच. पण देह धारणे पश्चात पंच महाभूत रूप देहाला, माया ग्रासून, सर्व स्मृती मागे जातात.
म्हणजे त्या स्मृती असतात पण त्या स्मृतींच्या ठेवी, आत्म कोषात, विरघळून जातात. त्यामुळे जीव या जगतात हरवून, आपल्या देहातील कर्तव्य, वासना भाव यांमध्ये गुरफटून जातो. पण त्या स्मृती चाळवळ्या गेल्या तर, तर नक्कीच त्यांना गती मिळून, त्या आत्मकोषाच्या वरच्या पातळीवर येऊ शकतात. कारण शेवटी त्यांना तिथे लहरी वा स्पंदन रुपात साठवण्यात आलेलं असतं. त्यामुळे लहरींना लहरीच, स्पर्शून, त्यांना, चेतवण्याचं काम करू शकतात.
पण त्यासाठी तितक्याच शक्तिवान लहरी, उत्पन्न करता आल्या पाहिजेत. कारण त्यांची साठवण ही आत्म्याच्या परमोच्च कोषात अगदी आत असल्या मुळे, त्या अत्यंत शुद्ध आणि सात्विक रुपात असतात. त्यामुळे त्या कोषा पर्यंत पोचण्यासाठी,मनाची, बुध्दीची व देहाची, तितकीच शुद्धता आत्म्याला साधता आली पाहिजे. त्यासाठी यम नियम, शास्त्र, विधी,साधना इत्यादींची व्यवस्था करण्यात आली. त्या सर्व साधनांद्वारे, आत्मयज्ञ साधावा लागतो.
याचं महत्वाचं कारण आत्म्यावर साठलेली किंवा जमा झालेली, अनेक जन्मातील संस्कारांची पुटं, सहसा साधनेशिवाय निघत नाहीत. त्यासाठी साधनेची जोड असावी लागते.ही अनेक जन्मांची अस्वच्छता, काढायला आणि आत्मतत्व उजळून यायला, तप घडावं लागतं. त्यासाठी भोगांची देणी धुवून काढावी लागतात आणि उपभोगांची येणी रीती करावी लागतात.
आता या चक्राला भेदण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत. अन्यथा प्रत्येक जन्मात मृत्यू पश्चात, आपल्या, ताळेबंदात, येणी व देणी यांचा असमतोल असणारच आणि त्यासाठी पुन्हा भुलोकी येणं आहेच. कारण हे मर्त्य जगत हा एकच असा फासा आहे, जो देणी व येणी फेडून घेतो. बरं यात मोठी गुह्य बाब ही आहे की, कर्महिन वा अकर्मी सुद्धा राहता येत नाही.
मग काय करायचं, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२८/१०/२०२३
Comments
Post a Comment