Skip to main content

उठी उठी गोपाला भाग ४

उठी उठी गोपाला या गीतावर स्वैर लेख भाग ४

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला 
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला 

पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला 
गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला 
धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला 

रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन 
सान पाऊली वाजति पैंजण छुन छुनन छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण 
एकतानता कुठे लाविते एकतारीची धून 
निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला 

राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला 
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला 
वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला 
तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला 

गीतकार : बाळ कोल्हटकर, 
गायक : कुमार गंधर्व
संगीतकार : वसंत देसाई
नाटक : देव दिना घरी धावला

 राजप्रसादतील अर्थात राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारी प्रत्येक पहाटेला परंपरागत सनई व चौघडा हा सुंदर वातावरण निर्मिती तर करतोच, पण प्रजाजनांना पहाटेचा प्रहर सुरू झाल्याचंसुद्धा सांगतो. खर तर हा सनई चौघडा सनातन धर्माच्या मांगल्याच प्रतीक असून तो मंदिरात , प्रवेशद्वारी व राजप्रसादतील प्रांगणात नित्य वाजवण्यात येतो. हा सनई चौघडा शुभकालाचे देखील प्रतीक आहे. तो पहाटेच सुरू झाला असून त्यानेदेखील शुभवेळेची शुभमुहूर्ताची जणू वर्दीच दिली आहे.

या भारतवर्षाची पुरणकाळापासूनची ऋषी , मुनी आणि तपस्वी ही फक्त परंपराच नसून तो एक भक्कम राष्ट्राधारच आहे. असे ऋषी मुनी धर्माची ध्वजा सतत अधोरेखित ठेवतात. धर्माला प्रतिष्ठा आणि नियम प्राप्त करून देतात. त्यांचा संयम हे राष्ट्राच्या उन्नतीस कारण असतात. अश्या असंख्य ऋषी, मुनी व महान तपस्वी यांच्या प्रातःकालीन संध्येस व पूजा अर्चनेस ब्राम्हमुहूर्तीच प्रारंभ झाला. या पूजाविधींमध्ये वेदातील सूक्ते, मंत्रोच्चार यांचा उद्घोष सुरू आहे. सर्वसामान्य पणे या पूजा व हे विधी जलप्रवाहाच्या ठिकाणी केले जातात. द्वारकेच्या जवळ असलेल्या सागरतीरावर हे विधी या अर्चना करण्यासाठी गेलेल्या ऋषी , मुनी व तपस्वी यांच्या या वेदघोषालासुद्धा आरंभ झाला आहे व त्या घोषातील ऋचा व स्तोत्रे यांचा तालबद्ध नाद ब्रह्मांडातील समस्त देवीदेवताना आवाहन करत आहे. त्याचप्रमाणे तो नाद राजप्रसादपर्यंत पोहोचत आहे.

हे मुरलीधर मोहन, हे घनश्याम आपल्या राज्यातील निसर्गतः असलेली व स्थापित केलेली वृक्षराजी हे तर अमूल्य धन आहे. हे गोधनासम अनुपम आहे. त्याच वनात वेळूची म्हणजेच बांबूची अनेक उपवने आहेत. आपण स्वतः मुरलीधर म्हणजे उत्तम मुरलीवादक आहात आणि म्हणूनच आपण जाणता की अश्या वनातून जेंव्हा वारा वाहतो तेंव्हा त्याचा बासरीवादनासम मधुर आवाज येतो. असा भास होतो की कोणीतरी मुरलीवादन करत आहे. हे गोपाळ प्रभातीचा आल्हाददायक वारा या वनातून वहात असून तो या वनात मुरली वादन करत आहे. तो सुद्धा मधुर नाद आपल्यापर्यंत येत आहे. त्याचा आनंद घ्यावा. 

आपण एक महान कलाकार आहात. आपण जाणता की, गाण्यात पंचम स्वर हा खूप महत्वाचा आहे. वसंतऋतूंच्या काळात या संगीताला एक वेगळाच बहार येतो. कारण सर्व ऋतूंचा राजा आणि संगीतातील महत्वाचा राग वसंत एक सुमधुर राग आहे. या रागात आणि ऋतूत जीचा स्वर फुलून येतो आणि जी पंचम स्वरात उच्चारवाने वसंताच्या आगमनाची चाहूल देते ती कोकिळा ही जणू एखाद्या कवीच्या प्रतिभेसमान काव्यस्फूर्ती आल्याप्रमाणे पंचम स्वरात आपलं कूजन करत आहे आणि प्राचीवर रावीराजाचे कुंकुमार्जन होते त्या झुंझुमुंझु वेळी हे कोकिळकुजन कानांना एक अलौकिक स्वर्गीय आनंद देत आहे.

अश्या या सुवर्णमयी , सुमंगल, सुप्रभातीच्या सुमुहूर्तावर हे योगश्वर आपण निद्रेचा त्याग करून आपल्या सुमुख दर्शनाने समस्त जनांस कृतकृत्य करून यथार्थ करावे. हीच आपल्या चरणी आपल्या भक्तांची प्रार्थना आहे आणि त्याचसाठी जनसमान्यांसह सर्व सृष्टी, नव्हे सर्व ब्रह्मांड, प्रतीक्षेत आहे तेंव्हा हे नारायण , रुक्मिणीवरा जागे होऊन  आम्हास उपकृत करावे हाच आर्जव आपल्या चरणी आहे. 

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
१३/०९/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...