ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १०१
नृग राजाच्या शापाची कथा सांगितल्या नन्तर प्रभुनी लक्ष्मणाला राजसभेतील कामकाज बघून कोणी तक्रारदार आहे का याच्या चौकशीसाठी जाण्यास सांगितले. परंतु लक्ष्मणाने प्रभुना पृच्छा केली
"शाप मिळाल्यानंतर नृग राजाने काय केले, तसेच पुढील कथा खुलासेवार जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की आपण मला पूर्ण कथाभाग सांगून उपकृत करावे त्याचप्रमाणे आपण माझी जिज्ञासा पूर्ण करावी."
यावर प्रभू म्हणाले.
" हे लक्ष्मणा तुझी इच्छाच असेल तर ऐक . राजा नृगाने आपले मंत्रीगण, अधिकारी आणि गावा गावातील प्रमुख अर्थात महाजन यांना सभागृहात बोलावून घेतले आणि त्यांना देवर्षी नारदांकडून समजलेल्या आपल्यावरील शापाचा सर्व वृत्तांत कथन केला आणि हा शाप भोगण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण जन्मापर्यंत सरडा होऊन गुहेत वास करावा लागणार आहे . "
हे कथन ऐकल्यावर नृग राजाचा पुत्र वसू या सह सर्व मंत्रीगण व समस्त प्रजाजन अत्यन्त दुःखी झाले. त्यांनी राजाला या शापातून मुक्त होण्याचा काही मार्ग असेल तर त्याविषयी विचारणा केली. यावर नृग राजाने अत्यंत दुःखपूर्वक नकार देत सांगितले कि, मला हा शाप भोगून द्वापार युगात महाविष्णूंच्या श्रीकृष्ण अवतारापर्यन्त प्रतिकशा करणे गरजेचे आहे. त्यांनंतरच मला मुक्ती आहे. दुसरा काहीही तरणोपाय नाही. सर्वांचा निरुपाय झाल्यामुळे. अत्यन्त दुःखद अंतःकरणाने सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार केला. राजाने आजच्या सभेचे प्रयोजन सांगण्यास सुरवात केली. राजा म्हणाला कि,
सर्वप्रथम मी माझ्या जागी राजपुत्र वसू याची राजा म्हणून नेमणूक करून त्याचा त्वरित राज्याभिषेक करून घेतो. त्याचा यथोचित स्वीकार करून त्यास उचित सहकार्य करावे. ज्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे. हे सर्व कार्य उद्याच पार पाडण्यात येईल. तत्पश्चात तीन समान आकाराच्या गुहा तयार करण्यात याव्यात. ज्यातील एकात मी वर्षा व शरद ऋतूमध्ये , एका गुहेत शिशिर व हेमंत काळामध्ये आणि तिसऱ्या गुहेत मी वसंत व ग्रीष्म ऋतूंमध्ये वास करून. त्या तीनही गुहा त्या त्या ऋतुकाळात अनेक वर्षांपर्यंत राहण्यास सुकर अश्या बनवण्यात याव्यात, जेणेकरून माझ्या वास्तव्यात फार अडचण येणार नाही व फार त्रास येणार नाही. त्या गुहांच्या आजूबाजूला फळ व फुल यांनी युक्त तसेच भरपूर व शीतल छाया देणारी झाडे व वृक्ष लावण्यात यावेत. जेणेकरून तो परिसर शेकडो वर्षांपर्यंत रमणीय राहील. तसेच त्या परिसरात दोन कोस दूर पर्यंत सुगंधित फुले येणारी झाडे लावण्यात यावीत, जेणेकरून माझा शापाचा कालावधी सुखकर होईल.
इतके बोलून राजाने त्वरित आपल्या पुत्राचा राज्याभिषेक संपन्न केला. राजाच्या इच्छेनुसार तीन प्रकारच्या गुहा तयार करण्यात आल्या. त्यासभोवतीचा परिसर राजाच्या सांगण्यानुसार सुशोभित करण्यात आला. तदनंतर आपल्या पुत्राचा निरोप घेण्या आधी राजा नृग याने आपल्या अनुभवानुसार आपल्या पुत्राला काही बहुमूल्य सल्ले दिले. हे पुत्र वसू तू धर्मपरायण राहून आपले जीवन व्यतीत कर. प्रजाहित हेच परम कर्तव्य मान. कारण तू बघतोच आहेस कि, माझ्या अल्पशा प्रमादाची मला किती भीषण शिक्षा मिळाली आहे. म्हणून तू सतत प्रजेचे कल्याण होईल याचा विचार कर. माझ्या या परिस्थिती बद्दल किंचिंत देखील शोक करून नकोस.
कारण माझ्या कर्मानुसार मला हे भोग प्राप्त झाले आहेत आणि ते मी भोगीन. अतः तू व्यर्थ दुःख करून नयेस. ईश्वर सर्व साक्षी आणि सर्व शक्तिमान आहे. तो तुला उचित धैर्य देईलच. तरीही एक सांगून ठेवतो कि, जे पूर्वकर्मानुसार विधिलिखित प्राप्त झालेले आहे ते भोगुनच संपवावे लागते. त्यानुसार जिथे जाणे प्राप्त झाले असेल तिथे जावेच लागते, जसे मला आता जाणे प्राप्त झाले आहे. सुख आणि दुःख प्राप्त कर्मफलानुसारच येतात आणि जातात. म्हणून तू दुःखी होऊ नकोस.
हे लक्ष्मणा एवढे सांगून आणि आपल्या पुत्र व परिवाराचे सांत्वन करून राजा नृग तयार करण्यात आलेल्या गुहेत शाप भोगण्यासाठी प्रस्थान करता झाला.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment