ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १००
" ऐक. खुप पूर्वी सत्ययुगात एक राजा नृग होऊन गेला. तो चक्रवर्ती सम्राट होता. तो स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकून न्यायनिवाडा करत असे. त्याने एकदा महायज्ञ करून हजारों लोकांना गायी , अन्न, वस्त्र व अलंकार दान केले. त्या दान केलेल्या गाईमधे एक गाय एका विप्राची होती. ती गाय चुकुन दुसऱ्या एका विप्रवराला दान करण्यात आली.
ज्या विप्रवराची ती गाय होती तो विप्रवर आपल्या गाईला शोधू लागला. अनेक गाव पालथी घालुन शेवटी तो हरिद्वार मधे पोचला. तिथे त्याला आपली गाय दिसली. त्या गाईचे वासरू सुद्धा तिच्यासोबतच होते. त्याने आपल्या गाईचे नाव शबरी ठेवले होते. त्याने त्याच नावाने गाईला हाक मारताच दावा उखडून ती गाय वासरासहित त्या विप्राजवळ आली.
इकडे ज्या विप्राला ती गाय दान दिली होती, तो विप्रहि गायी मागोमाग धावत आला आणि मग दोघांच्यात वाद सुरु झाल. तंटा विकोपाला गेल्यावर एकमताने दोघानी ठरवलं की राजा नृग याकडे जाऊन, आपले गार्हाणे राजाला सांगुया आणि राजा जो निर्णय देईल तो दोघानीही मान्य करूया.
त्याप्रमाणे दोघेही राजाकडे पोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना समजले की राजा बाहेर गेला आहे आणि पर्यायी व्यवस्था काही नाही. दोघानीही खुप दिवस राजाची वाट पाहिली आणि अनेक दिवस राजा न आल्यामुळे रागाने दोघानीही राजा नृग याला शाप दिला की, हे नृग राजा तू आमच्या तक्रारीकडे बघण्यास देखील आला नाहीस, या तुझ्या उद्दामपणाबद्दल तुला शाप देतो की, तू सरडा होऊन एका गुहेत वास करून राहशील आणि द्वापारयुगात भगवान जगन्नाथ जेंव्हा श्रीकॄष्ण रुपात अवतार घेतील तेंव्हा त्यांच्यां योगे तुझी या शापातून मुक्तता होईल.
अश्या तर्हेने शाप देऊन दोन्ही विप्रानी ती गाय एका गरजु विप्रास दान केली आणि आपापल्या गृही परत गेले. इकडे राजाला आल्यावर शापाची कथा समजल्यानन्तर राजा खुप दुःखी झाला आणि आपल्या पुत्रास राज्यावर बसवले. त्याने आपला शाप भोगण्यासाठी गुहा बांधून घेतली. नन्तर तो बांधून घेतलेल्या त्या गुहेत शाप भोगण्यास्तव निघून गेला. म्हणून लक्ष्मणा राजाला लोक हिताची नेहमी पर्वा केलीच पाहिजे अन्यथा प्रारब्धी नरकवास येतो. ही संक्षिप्त स्वरूपातील कथा आहे."
इतक सांगून प्रभुनी लक्ष्मणाला राजसभेतील कामकाज बघून कोणी तक्रारदार आहे का याच्या चौकशीसाठी पुढे धाडले. हॄदयातील दुःख बाजूला ठेवून प्रभुनी कामात लक्ष द्यायचे ठरवले. त्याचप्रमाणे माता जानकिचा त्याग केल्यापासून ऊंची पलंगावरील निद्रा सोडून प्रभू भूमिवर निद्रा करू लागले.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment