आध्यात्म विराम ३ (नवीन लेखमाला)
वाटेत निर्माण झालेल्या निसर्ग निर्मित गोष्टी, मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी या सर्वात आपण रस्ता चालत होतो आणि आपल्याला पुढे जायचं आहे, हेच जीव विसरून गेले. मार्ग चुकला, मार्गभ्रष्ट, ध्येयभ्रष्ट झालेला जीव, आहे त्या कार्यात, कर्मात, संतुष्टता मानून, त्यातच येथेच्छ रमणारा जीव, कधी कर्मफल मार्गाचा वाटसरू होतो, हे त्या जीवाला जाणवत नाही, समजत नाही, उमजत नाही.
आपण का कुठे आणि कशासाठी आलो आहोत, कुठे जायचं आहे हा मूळ उद्देश व ध्येयच विसरलं गेल्या कारणाने, कोणत्या मार्गाने जाण्यासाठी आपण निघालो होतो किंवा आपल्या मूळ पुरुषाला, निर्मात्याने सांगून पाठवलं होतं, तो उद्देश वा ध्येय वाहून गेल्यामुळे, पुढील कोणत्याही पिढीला, त्या गोष्टीचं भान राहिलं नाही. इथे एक माकडांची गोष्ट किंवा व्हिडिओ क्लिप बघितलेली आठवते.
एका पिंजऱ्यात काही माकड ठेवण्यात आली आणि उंचावर केळीचा घड. एक शिडी ठेवलेली होती, त्या घडाकडे पोचण्यासाठी. ज्या ज्यावेळी एक माकड वर जाई, त्यावेळेला इतर मकडांवर पाणी मारलं जाई. ती माकडं, पाहिल्या माकडाला, वर जाण्यापासून अडवत असत. त्यानंतर आळीपाळीने माकड बदलण्यात आली.
एका विशिष्ट काळानंतर, पिंजऱ्यातील सर्व माकड, बदलली गेली. पण प्रत्येक वेळी अश्याच प्रकारे त्या वरती जाणाऱ्या माकडाला, बाकीची माकड अडवत. काही वेळानंतर, पाणी मारणं बंद करण्यात आले. पण तरीही वर जाणाऱ्या माकडाला, इतर माकड सवयीने किंवा वंश परंपरेने चालत आलेल्या प्रथेप्रमाणे, अडवून, खेचून आणत असत.
यावरून आधीच्या परिच्छेदात मांडलेला मुद्दा, जास्त स्पष्टपणे ध्यानात येईल. की, विधात्याचा मूळ उद्देश ज्यामध्ये, प्रत्येक जीवाला सोहम म्हणवून पाठवलं जातं, तो संदेश, जीव देहात म्हणजे दुसऱ्या घरात आल्यावर, आत्मतत्त्व पूर्ण विसरून जातं. देहाचे व्यवहार, संसार व प्रपंच यामधे, जीव, देह, इंद्रिय, ज्ञान, जाणीवा हे सर्व हा उद्देश विसरून जातात.
त्याच उद्देशांची आठवण करून देण्यासाठी, ईश्वरी संदेशाला,जगातील प्रत्येक प्राणीमात्रापर्यन्त पोचवण्या साठी, अनेक जीव आपापल्या परीने प्रयत्न करतात. हे, ते जीव आहेत, ज्यांच्या बद्दल पहिल्या लेखात मी लिहिलं होतं. यांच्या जाणीवा, ज्ञान यांची व्याप्ती अमर्याद झालेली असते. यांना जीवाचा खरा प्रवास आणि मूळ उद्देशानेनुसार व्हावयास हवा असलेला प्रवास, यातील भेद, देह असल्यावर किंवा देह संपल्या वर, अश्या दोन्ही परिस्थितीत जाणवतो.
म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या निष्णात डॉ ला, रोगी पाहिल्या वर किंवा त्या रोग्याची नाडी तपासल्यावर, देहातील शारीरिक व मानसिक अश्या दोन्ही रोगांची वा आजारांची कल्पना येते, त्याप्रमाणे या ज्ञानी जनाना, (ज्यांना आपण संत महंत इत्यादी पुढारलेल्या संज्ञा देऊन संबोधतो), त्यांना भव रोगाची, आत्मरोगाची आणि जीवाच्या स्थितीची, आत्मिक प्रवासातील त्या जीवाच्या प्रगती वा अधोगती यांची जाण वा ओळख, पाहताक्षणी होते. ज्ञानाची प्रगल्भता वाढल्यावर, अगदी देहाने समोर नसलेल्या जीवांची सुद्धा, जाण अश्या ज्ञानी संतांना येते.
विषय खोल असल्याकारणाने, आपण उद्याच्या भागात पुढे जाऊया. पण अश्या ज्ञानी जनांनी दिलेल्या शिकवणुकीचा योग्य सन्मान, आदर ठेवून आणि त्यांना स्मरूनच.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment