आध्यात्म विराम ७
कर्मगतीच्या भोगात व उपभोगात जीव आपला मार्ग, गती, स्थिती आणि स्थान यातील काहीही जाणत नाही. सर्वसामान्यपणे या विश्वातील किंवा या भूलोकीचे जीव, आपल्या आजच्या स्थितीला,भोग, उपभोग यांना जाणतो आणि मन बुद्धी याद्वारे त्यांचेच चिंतन, चिरंतन करतो. ह्याला आत्मकेंद्री जीव म्हणातात. पण ही आत्म केंद्रित वृत्ती, जीवाला भोगातून बाहेर पडून उपभोगांना प्राप्त करण्याकडे नेण्याचा प्रयत्न करते.
ही बुद्धी व वृत्ती, अनंत काळ याच भूतलावर भोग व उपभोग यांच्या चक्रात, जीवाला गुंतवून ठेवते. देह, बुद्धी, मन व वाचा, याच आत्मकेंद्रित वृत्तीतून कर्म करतात. प्रत्येक जन्मात, देह सोडताना, हेच संचित घेऊन, आत्मा व मनोमय कोष, आपला पुढील प्रवास सुरू करतात.
अनंताकडून अनंताकडे नेणारा हा प्रवास असतो. यामध्ये फक्त आणि फक्त, आज भोगत असलेले भोग,जीवाला ग्रासतात आणि इतर जनांना प्राप्त झालेले किंवा होणारे उपभोग, मनाला व्यथित, क्षतिग्रस्त, प्रेरित, उद्युक्त करून कर्मरत ठेवतात.
इथे होणारी जीवाची तगमग, तळमळ, अतृप्त इच्छा, अतृप्त भावना या अनिष्ट आणि इष्ट मार्गाकडे नेणाऱ्या असतात. परंतु सर्वसामान्य जीव, यातील भविष्याची अनिश्चितता, कर्माचा आलेख, भोग आणि उपभोग यांची प्राप्ती होणं वा निसटून जाणं, यातच मग्न असतात.
त्यांच्या लेखी, जीवन ही फक्त आणि फक्त या देहात करावयाची, मिळवावयाची, साधायची आणि जोडायची गोष्ट असते. त्यामुळे भोगांची प्राप्ती झाली की, खिन्नता आणि उपभोग निसटून गेले तरीही अपार खिन्नता हीच सदा सर्वकाळ मनःस्थिती असते.
याची जाणीव विधात्याला असते किंवा समस्त जगता तील जीवांची चिंता हाच विधात्याच्या नित्य कर्माचा भाग आहे. यामधे विधाता एका विशिष्ट नियमाने व नीतीने बद्ध असतो. त्यामुळे, एखाद्या सत्पुरुष व साधुसंत यांसम, विधाता हा सहज आणि सरसकट सर्वांना सहाय्य करू शकत नाही. पण ही विधात्याची अगतिकता नसते. तर तो ईश्वरी व्यवस्थेचा भाग असतो. त्यातूनच त्याने निवडलेला, योजलेला व प्रकृती धर्म पाळून निर्मिलेला एक मार्ग आहे.
पण त्यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत त्या अविनाशी, अच्युत, अनादी ईश्वराचं गुणगान, त्याच्या नामाच्या माध्यमातून करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment