आध्यात्म विराम ४ (नवीन लेखमाला)
कालचाच विषय पुढे नेऊ. याच कारणाने असे खरे संत, साधू वा महाराज आणि स्वामी आपल्या भक्तांना वा साधकांना किंवा त्यांच्याकडे आलेल्या सामान्य जनांना, इतकी कृपा कधीच करत नाहीत, ज्यायोगे, तो जीव, प्रपंचात, कर्मसागरात हरवून जाईल आणि मूळ उद्देशा पासून इतका दूर जाईल की, तो भवसागरात, बुडून जाईल.
असे ज्ञानी जन, आपल्या सद्गुरू रूप अधिकारात, इतकीच कृपा करतात की, भक्त वा साधक, निराशेने, दुःखातिरेकाने, आत्मवंचनेने मार्गभ्रष्ट न होता, मार्गात राहतील. एकदा सदर जीव मार्गात राहिला की, प्रारब्ध, संचित आणि उत्तम कर्म योगाने, तो पुढे जात राहील. ही कृपेची पद्धती अद्भुत असते. सद्गुरू सर्वज्ञानी असल्या कारणाने, कधी कधी कृपा वा सहाय्य न करण्यात सुद्धा, साधकाचं हित आहे, हे जाणल्यामुळे, अशी कृपा न करण्याचा मार्ग सुद्धा अश्या ज्ञानी जनांकडून योजला जातो
काही उदाहरणं घेऊ म्हणजे मुद्दा समजेल आणि पुढे जाता येईल. आपण दुःखातून, वाईट परिस्थितीतून, आयुष्यातील अत्यंत कमजोर काळातून जात असताना. सद्गुरू आपल्या ज्ञानाची, धैर्याची, चिकाटीची, स्थिरतेची परीक्षा पाहताना, कृपा न करण्याचा निर्णय घेतात. असा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा, त्यांचं सदर जीवाकडे दुर्लक्ष झालेलं नसतं. उलट अश्या साधकांकडे त्यांचं जास्त प्रकर्षाने लक्ष असतं.
लहानपणी मुलांना चालायची सवय लावण्यासाठी एखादा गाडा किंवा walker दिला जातो. त्यामागचा उद्देश, त्यांना चालण्याची सवय व्हावी, त्याचप्रमाणे पाय व देह तयार व्हावा, हा असतो. पण ठराविक काळानंतर हा गाडा काढून घेतला नाही, तर सुट्ट चालण्याची सवय न होता, मुल कायमचं त्यावर अवलंबून राहू शकतं. हे त्याच्या पुढील काळासाठी घातक आहे.
हे जाणूनच, माता पिता त्याला सुरवातीच्या उभ राहून, चालण्याच्या सरावाच्या काळात, पडू देतात, पण जाणीव पूर्वक, मदत करत नाहीत वा हात देत नाहीत. कारण एकदा तशी सवय लागली की, ते मूल कधीच स्वतःचं स्वतः उठून चालू शकणार नाही, हे आई जरूर जाणते.
मग कल्पना करा, या विश्वाची जननी आणि चैतन्य रूपातील त्याचे प्रतिनिधी असलेले ईश्वरी अंश मोक्षाच्या मार्गातील जीवांना फुकाचे आणि अवाजवी सहाय्य कसे काय करतील. पण असे न करण्यात आपले हित आहे, हे आपल्या ध्यानात येण्याची जरुरी आहे.
दुसरी गोष्ट, चालायला व्यवस्थित शिकलेल्या मुलाला, पडल्यानंतर, सहाय्याची अतिरिक्त आवश्यकता नाही आणि ते मूल आपणहून, उठून पुन्हा चालायला सुरूवात करू शकतं. हेदेखील माता जाणते. म्हणून मनातून, त्या मुलाची करुणा असूनही, त्याला मुद्दामहून सहाय्य न करण्याचं हित ती माता जपते.
विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे, आपण हा उद्या विषय पुढे नेऊ. पण अश्या ज्ञानी जनांचे आभार मानत राहू आणि त्यांच्या कृपा कटाक्षात राहण्याचा, नित्य प्रयत्न करत राहू.
याव्यतिरिक्त काही जीव, हे आत्ममार्गात, अग्रेसर आहेत, हे ईश्वर किंवा ईश्वरी अंश जाणत असतात.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/११/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment