आध्यात्म विराम १ (नवीन लेखमाला)
भोग आणि ईश्वर या लेखमालेच्या माध्यमातून, भोग, उपभोग, मन, बुद्धि, देह यांचा व्यापार, समस्या आणि समाधान, यांचा उहापोह केल्यानंतर, आता पुढील टप्प्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. भोग आणि ईश्वर या पहिल्या पायरीवर स्थिरावून, विचार केल्यानंतर आता मोक्ष, मुक्ती या प्रवासात पुढील पायरीवर, काही काळ विश्राम अर्थात विराम करून चिंतन करूया. माझे सद्गुरू, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांच्या कृपाप्रसादाने, आता या विषयावर काही काळ लिखाण करून, मग पुढे जाऊया, अशी इच्छा उत्पन्न झाली आहे. म्हणून विषयाला सुरुवात करूया.
देहाचं असणं आणि देहातीत असणं, यातील भेद, देहातील जीव, देह सोडल्यापश्चात जाणतो. अर्थात तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच कोणतीही गोष्ट, कर्म, धर्म, भोग आणि उपभोग, हे देह असेतोवर, साध्य करून घ्यावं. अनेक धर्मग्रंथ, धर्मशास्त्र, धर्मज्ञान, पुराणं, वेद, संत साधू, सज्जन हेच सांगून गेले आहेत .
सर्वच महानतम ज्ञानी जनांनी, हेच सांगण्यासाठी जन्म खर्ची घातले. कारण, देह सोडण्यापश्चात जे समजतं, जाणवतं, उपजतं, ते त्यांना, देहात असताना समजलेलं असतं. ते त्यांच्या अनेक जन्मांच्या पुण्य कर्माचं फल असतं. समजल्यानंतर, त्यांच्या जाणिवांची उत्पत्ती आणि व्याप्ती वाढते.
यामधे, विश्व, विश्वाबाहेरील जग, ब्रम्हांड आणि ब्रम्हांडा बाहेर असलेला ईश्वरी पसारा आणि त्यातून निर्माण झालेल्या लहरींचा आलेख, याद्वारे जाणलेलं, आपलं निहित कर्म, त्याज्य कर्म आणि सदुपयोगी कर्म या सर्वांबाबत, विश्वात संचारत असलेलं, विश्वरुप ज्ञान त्यांना, त्यांच्या त्यांच्या साधनेच्या माध्यमातून, प्राप्त झालेलं असतं. या ज्ञान प्राप्तीला अध्यात्मिक परिभाषेत सिद्धी म्हणतात.
त्यानंतर त्यांना, हेच ज्ञान, इतरांना देण्याची प्रेरणा प्राप्त होते. कारण हे ईश्वरी व विश्वरुप ज्ञान आहे. त्यामुळे त्यावर कुण्या एकाचा किंवा काहीं जणांचा अधिकारच नाही, हे त्यांना ज्ञात होतं. म्हणून ते सहज, सोप्या संकल्पनेत परिभाषेत सांगणं,हे त्यांचं कर्तव्य उरतं. त्यासाठीच ईश्वर अश्या काही जीवांची निवड करतो. त्यांना या कार्यार्थ वाहून घेण्याची प्रेरणारूप शक्ती, ईश्वरच प्रदान करतो.
मुळात हे लक्षात घ्या की, समस्त विश्वच नव्हे तर संपूर्ण ब्रम्हांड हे, लहरी, कंपनं आणि संदेश यावर सचालित होतं. परमात्म्याने, ब्रम्हांड निर्मिती करतानाच, सर्व व्यवस्था ही याचं संदेश व्यवस्थेवर आधारित स्थापित केली. कारण सजीव आणि निर्जीव यांच्या एकमेकांशी आणि परम पित्याशी, संपर्काची, संवादांची, इतकचं नाही तर, जीवाला देहात असताना कराव्या लागणाऱ्या कर्मांची आणि त्याच्या फलरूप प्राप्तीची व्यवस्था सुद्धा, याचं संदेश व्यवस्थेवर आधारित ठेवून, ईश्वराने, या व्यवस्थेला स्वयंचलित रूप दिलं.
या व्यवस्थेमुळे, देहांचा संवाद, व्यवहार, प्रपंचं,सुलभतेने होतो. हीच संदेश व्यवस्था विश्वाचा आधार आहे. याच माध्यमातून, सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे संदेश, लहरी, हे देहात असणाऱ्या जीवांच्या मनापर्यंत पोहोचतात.
याच विषयाला उद्याच्या भागात पुढे घेऊन जाऊया. तोपर्यंत त्या ईश्वरी व्यवस्थेचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार मनात धारण करण्याचा चिंतनात्मक प्रयत्न करत राहूया.
क्रमशः
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/११/२०२२
Comments
Post a Comment