गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग १
नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||
हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||
पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||
चैत वार्याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३|
गीत गदिमा
संगीत सी रामचंद्र
गायिका आशा भोसले
चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव
नकारात्मकता ज्या वेळी आपल्या मनाचा ठाव घेते आणि मग संपूर्ण मन व्यापून दशांगुळे भरून वाहते, त्यावेळी सर्वत्र निराशेचा अंधःकार पसरतो. सर्व जग जणू आपल्या विरुद्ध षडयंत्र करून उभं आहे आणि आपला कोणीही वाली उरला नाही, अगदी प्रत्यक्ष परम ईश्वर देखील आपला नाही. आता या पडत्या काळात तो सुद्धा आपल्या बाजूने उभा राहणार नाही, त्याला सुद्धा आपली दया येत नाही.
अश्या मनस्थिती सर्वसामान्य माणूस आपल्या आयुष्यात अनेकदा येतो. कदाचित दिवसात वेगवेगळ्या मनःस्थितीतून सुद्धा जात असतो. अश्या वेळी मरुदेत जग गेलं चुलीत, मला मदत करायला कोणीच नाही अशी स्थिती खूप वेळा येते. आयुष्यातील नकारात्मक टप्पे येतात. कष्ट सर्वचजण करतात, आळशी मनुष्य सोडून सर्वच. पण कोणी मुद्दाम दुःखाला वा निराशेला अवताण म्हणजेच आमंत्रण देत नाहीत.
पण हे बऱ्याच वेळा माहीत पडतं की जे घडतंय वा घडलंय ते आपल्याच कर्माचं फळ आहे. भोगणे क्रमप्राप्त आहे. परंतु अशी सांगड खूप वेळा घालता येत नाही. मन अश्या वेळी जास्त निराश वा सैरभैर होतं. वाटतं की हे माझ्या बाबतच का घडतंय. मीच का दिसतो देवाला त्रास द्यायला. देवाला माझी दया का येत नाही. नक्की कोणीतरी काही तरी करतय म्हणूनच असं घडतंय वा घडलं.
ही सर्व स्थिती सामान्य माणसाची होतच असते. काही जण मान्य करतात वा जाणतात की सामान्यपणे असच असतं मनात चाललेलं. पण असामान्य तेच असतात की जे कोणत्याही स्थितीत मनाचा तोल ढळू देत नाहीत. त्यांनाही नैराश्य ग्रासतंच पण त्यांची निराश होण्याची कारणं भिन्न असतात आणि त्यांची त्यावेळची मनःस्थिती वेगळी असते.
क्रमशः भाग १ समाप्त
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/०२/२०१९
Comments
Post a Comment