Skip to main content

देवकी - ४

देवकी - ४

त्या आकाशवाणीत जे ऐकलं त्याने , एक क्षण श्वास बंद झाले. वाटलं सर्व आताच संपलं. कारण दादाचा संताप , त्रागा, क्रोध हे सर्व मी पाहिलं आहे.  क्वचित सेवक सेविका काही चर्चा करताना वा वार्तालाप करताना ऐकलं. कधी कधी प्रत्यक्ष पाहिलं होतं. फक्त ते अत्याचार इतके भयावह असतील जेणेकरून त्या पापांच्या राशींचा एक दिवस पर्वत होऊन समोर उभा राहील याची यत्किंचितही कल्पना निदान मला तरी नव्हती.

आकाशवाणीचे ते शब्द अजूनसुद्धा कानात घणाचे घाव घालतात, अनेक प्रश्न उभे करतात, अनेक समस्या समोर येतात, अनेक गोष्टी उघड करतात, अनेक धूसर रेषा स्पष्ट करून दाखवतात. पण त्याचबरोबर उद्याच्या मृत्यूची , जो कधीतरी येणारच या मर्त्य जगात, चाहूल आजच जाणवू देतात. कदाचित प्रत्यक्ष मृत्यू प्राप्त परिस्थितीत सुखावह नाही पण सुटका या दृष्टीने सोप्पा पर्याय म्हणून स्वीकारार्ह झालाही असता.

या जीवाची तगमग, घालमेल, ही दुरवस्था आणि त्याच बरोबर या देहाचे हाल, आत्म्याचे क्लेश हे सर्व अनेक जन्मांचे भोग या एकाच जन्मात का मांडलेत विश्वनियंत्याने. हे आज तरी एक गुह्य आहे, काळाच्या उदरात दडलेलं. परंतु त्या दिवसानंतर सुरू जाहलेली ससेहोलपट, अत्याचार, अपेष्टा , यातना यांची अनंतापर्यन्तची शृंखला या हाता पायात कारागृहातील या बेडीच्या रुपात काळाने का घातली , तीदेखील माझ्या , म्हणजे आमच्याच योगात, हे अजब कोडं कधीच उलगडणार नाही का ? की अनेक अनुत्तरित प्रश्नांप्रमाणे हा सुद्धा एक कुटप्रश्न कधीच उत्तर घेऊन येणार नाही.

हृदयाला पिळवटून टाकणारे आणि काळजाला घरं पाडणारे ते शब्द दादाने ऐकले मात्र, अनंत शक्तीच्या विद्युल्लतेच्या प्रभावात आपण सापडलो आहोत आणि सुटकेचा काहीही मार्ग उपलब्ध नाही, अशी अवस्था या मस्तिष्काची झाली. गगनातील हा विदुल्लतेचा लोळ आपल्याच अंगावर यावा आणि आपण काहीही न करता फक्त त्याला सामोरे जावं, कदाचित इतकंच आपल्या हातात आहे. याची जाण आत्म्याला झाली. त्यात काही क्षण हातातून निसटून गेले. मात्र .......... मात्र... माझा कंसदादा माझ्याच अंगावर विजेच्या चपळाईने खड्ग घेऊन सारथ्य सोडून धावत येत आहे. हे दृश्य ती वीज आपल्याच अंगावर कोसळली इतका आघाताने समोर आलं.

मी भांबावले, गोंधळले, घाबरले. एका क्षणात साक्षात तो यमासम भासला. साक्षात मृत्यू आपल्या समोर उभा आहे आणि म्हणतोय देवकी तुझी घटिका भरली.आता फक्त देह सोड आणि माझ्या सोबत मर्त्यलोकातून यमलोकी प्रस्थान कर. कदाचित हे विचारदेखील त्या क्षणात आले नसतील, तर मृत्यू फक्त दिसला, नव्हे जाणवला, पाहिला प्रत्यक्ष ज्येष्ठ भ्राता कंस याच्या रुपात, विधिनुसार , विधिवत, विधिलिखित.

भाग ४   समाप्त .......

क्रमशः

© संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...