लहानपण आणि पावसाळा
जून आला कि साधारण पावसाळ्याचे वेध लागायचे दिवस होते त्यावेळचे. त्यावेळचे म्हणजे साधारण ७५ ते ८२ दरम्यानचे. वळवाचा पाऊस साधारण २० ते २५ मे ला पडायचाच. हे सर्व पाऊस न पाडण्याचं लफडं साधारण ९५ ते २००० नन्तर सुरु झालं. २५ मे नंतर कधीही पावसाळा दाखल व्हायचा. आम्ही रहात असलेल्या गोग्रासवाडीत साधारण प्रत्येक खेळाच्या अलिखित वेळा वा काळ असायचा. मे मध्ये हे खेळ म्हणजे क्रिकेट, लगोरी, करवंटी डब्बा ऐस पैस , भोकंजा हे सकाळी व संध्याकाळी दिवे लागायच्या आत. पण दुपारी पत्ते , कॅरम, यासारखे बैठे खेळ. पत्त्यांमधले बरेचसे खेळ आता इतिहासजमा झाले असतील, वा काही काळाने होतील.
पण पाऊस सुरु होणार असला कि एक वेगळाच भारलेपणा असायचा सगळीकडे. एकतर त्यावेळी पाऊस म्हणजे अक्षरशः धो धो अर्थातच शब्दशः धो धो पडायचा. एकदा सुरु झाला कि, ४,४, दिवस न थांबता पडायचा. पण कदाचित माती भरपूर असल्यामुळे पडलेल्या पाण्याचा निचरा पटकन व्हायचा, म्हणजेच जमिनीत पाणी लवकर जिरायचं. त्यात गोग्रासवाडीत डोंबिवलीच्या इतर भागापेक्षा मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे किंवा डामरी रस्त्याचा मागमूससुद्धा नसल्यामुळे सगळीकडे माती आणि मातीत चिखलच चिखल. म्हणूनच गोग्रवाडीला गोग्रासवाडीबाहेरील लोक चिखलवाडीच म्हणायचे.
किंबहुना चिखलवाडी हेच नाव पावसाळ्यात वापरलं जायचं, आमच्या वाडीबद्दल. अर्थात तरीही आम्हाला अभिमान होता आणि आहे. माती भरपूर तसच झाडंही भरपूर होती, वाडीत. वाडी चांगल्यापैकी मोकळी असल्यामुळे (तुलनेने बांधकाम कमी असल्याने आणि जे होतं ते फक्त बैठ्या चाळीस्वरूपात असल्यामुळे) पावसाचं प्रमाण जास्त होतं. पावसाळ्याच्या सुरवातीला प्रचंड वीजा कडाडणं हा प्रकार खूप होता. क्वचित प्रसंगी वीज पाडण्याचं प्रमाणसुद्धा व शक्यतासुद्धा आमच्या इथे डोंबिवलीपेक्षा जास्त होतं.
मी प्रत्येकवेळी डोंबिवली आणि गोग्रासवाडी असा वेगळा उल्लेख करायचं कारण असं कि, त्यावेळी बहुतेक वाडीतील आणि डोंबिवलीतील लोकं वाडीला डोंबिवलीबाहेरचा भाग समजायचे. कारण गोग्रासवाडी त्यावेळी पाथर्ली गावात येत असल्यामुळे कायदेशीर दृष्टीने नगरपालिकेबाहेर होतं. पावसाळ्याच्या सुरवातीला अजून एक गोष्ट जी गोग्रासवाडीत व्हायची ती म्हणजे पावसाळ्याआधीचे उडते कीटक वा किडे यायचे काही दिवस आधी. कारण मोकळा भाग भरपूर. पावसाळा प्रत्यक्ष सुरु झाला कि, खूप पाणी साठायचं अनेक खड्डे वा उंचसखल भाग भरपूर असल्यामुळे.
मग घराबाहेर पडून (खेळण्याच्या निमित्ताने वा कोणाकडे तरी जातोय हे सांगून), मनसोक्त साठलेल्या पाण्यात नाचायचं. छत्री हा प्रकार बरेच वर्ष नव्हता. होते ते रेनकोट. पण असं खेळायला जायला कधी आम्ही रेनकोट घातले नाहीत आणि त्यावेळी आईला कधी वाटलं नाही. किंवा त्यावेळी कोणाच्याच आया मुलांना आजच्या इतकं जपत नसत. म्हणूनच कदाचित सर्व काही सहन करून जगण्याची शक्ती आली, त्याचं बीज या खेळात आहे. सर्व ऋतूत बिनधास्त राहायचं. बाहेर खेळायचं , खेळायला जायला भ्यायचं नाही, उगाचच लागलं, खरचटलं तर बाऊ करायचा नाही. अगदी दिवसचे दिवस घरी कळत सुद्धा नसे, कि लागलंय , पडलोय, धडपडलोय.
मला आठवतंय त्याप्रमाणे माझा एक ना एक गुडघा कायम फुटलेला असायचा. आई म्हणायचीसुद्धा याचे गुडघे कधी बरे होणार काय माहित. बर कधी लागलं तर सोप्पा उपाय, तिथलीच माती घ्यायची काहीतरी राम राम श्रीराम पुटपुटत फिरवायची आणि तिथेच फेकून द्यायची. यात काही अंधश्रद्धा असण्यापेक्षा बेफिकिरी वा बिनधास्तपणा जास्त असायचा. नव्हे तो रीतसर पिढीदरपिढी जपला जायचा. इन्फेकशन वगैरे शब्दसुद्धा ऐकल्याचं आठवत नाही. मलम , गोळ्या, औषध अगदी गंभीर आजारात वापरली जायची. एरव्ही काही घरगुतीच उपाय, काढे, सरबतं इत्यादी बनवून दिले जायचे. नव्हे ते प्रत्येक पिढीत पद्धतशीरपणे पुढे पास ऑन केले जायचे, नकळत आपसूक.
पावसाळा एकदा स्थिरावला कि मग पावसाळ्यातील खेळ म्हणजे रूपवणी , बेडूक पकडणं, गोगलगायी पकडणं, इत्यादी सुरु व्हायचे. रुपवणी खेळत खेळत खूप लांब जाण्यात मजा यायची. आमच्या वाडीत छोटे छोटे ओहोळ अनेक होते. त्यात फिरणारे मासे वा छोटे किडे बघायचं वा पकडायचे, हा सुद्धा एक खेळ होता. आमच्या वाडीत पाथर्ली गाव होतं.
मला आठवतंय जवळ जवळ १९८० पर्यंत आमच्या चाळीसमोर शेती होत होती, अगदी रीतसर नांगरून. आम्ही तासचे तास चाळीतल्या व्हरांड्यात बसून शेतीची कामं बघायचो. आधी मे संपताना शेत जाळलं जायचं. नन्तर नांगरणी, नन्तर पेरणी, नन्तर रीतसर राखणी केली जायची, दसरा येता येता कापणी. पूर्ण आठवतंय.
या सर्वात अनेक प्रकारांनी फक्त पावसाळा एन्जॉय करायचा हा मुख्य उद्देश आम्ही त्यावेळी साध्य करत असू. खरच आमचं बालपण समृद्ध करणारा हा पावसाळा आजही सुरु झाला कि, त्या जुन्या आठवणी, लहान पणच्या गोग्रासवाडीतील , अगदी आपोआप पाण्याच्या तळातून पृष्ठभागावर येतात आणि जुन्या दिवसांचा चित्रपट डोळ्यासमोरून फिरायला लागतो.
बाकी भाजी, वडे हे कालानुरूप योजलेले उपाय. पण खरा आनंद पावसात धम्माल करणं , जे लहानपणी आमच्या पिढीने तर नक्कीच केलंय. मनसोक्त केलंय मनापासून केलंय. भरपूर केलंय. इतकं कि त्या आठवणींवर आयुष्य नक्कीच सुलभ होऊ शकतं , समृद्ध होऊ शकतं
©लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०१९
Comments
Post a Comment