देवकी - ३
खर तर मला त्यांच्या या स्वभावाचा प्रारंभी भारी राग येत असे. इतका शांत स्वभाव राग न येता समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणं हे खरं तर विचित्र वाटायचं. अनेकदा मी बोलून बघितलं. पण ह्यांच्याकडून काहीही सुधार तो नाहीच. मग विचार केला की, इतके दृढ विचार आणि त्यावर तितक्याच श्रद्धेने अंमलबजावणी, हे नक्की दैवी असेल असं वाटलं होतं त्यावेळी.
अर्थात हे अगदी शतप्रतिशत होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे यांच्या स्वभावामुळे काही विशेष लाभ होईल, तोदेखील जीविताचा , हो हो जीवित राहण्याचा विशेष लाभ, मात्र वासुदेवांमुळे. विधात्याच्या कोणत्याही योजनेचा थोडादेखील माग वा अंदाजसुद्धा येत नाही कधी कधी.नव्हे बऱ्याचदा , घडत असलेली घटना समोर इतकं भयाण वास्तव वाढून ठेवेल याची कल्पना काही क्षण आधी येत नाही हे विधीचं विधान अनाकलनीय आहे.
काही काही व्यक्तित्व मात्र कालातीत असतात. जसे यदुराज वसुदेव हे एक विशेष मुशीतून तयार झालेले एक मानवी तंत्र . कदाचित यादवी जडणघडणीत काही विशेष असेल ज्यामुळे कोणतीही व्यक्ती प्राप्त परिस्थितीत स्वतःला पूर्ण परिस्थितीनुरूप बदलून परिस्थिती आपल्या बाजूला करण्यात कालांतराने का होईना यशस्वी होतात.
एखादी घटना तात्पुरता परिणाम करेल कदाचित, नव्हे खचितच, मृत्यमय वा मृत्यूच्या निकट घेऊन जाईल. परंतु अशाही परिस्थितीत साक्षात मृत्यू हात धरून उभा असताना आणि मात्र त्याची तलवार मानेवरून फिरण्यास पळ शिल्लक असताना त्यातून शांतपणे मृत्यूला परत फिरण्यास तयार करून त्याला काही काळासाठी परतवून लावणं असाधारण व्यक्तित्वाचंच काम असू शकतं. यदुराज त्या व्यक्तित्वात उच्च स्थानी आहेत.
यदुराजांबरोबर विवाहोपरांत पाठवणीच्या वेळी आम्ही बसलेल्या रथाचं सारथ्य स्वतः कंसदादाने केलं. दादाचा प्रथमपासून मजवर जीव आहे, नव्हे होता. मथुरेतून बाहेर पडण्यास काही प्रहर लागले. सर्व ताफा मथुरेच्या महामार्गावर वृंदावन गोकुळला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने वळला मात्र , आकाशातून एकाएकी काही बोल आले. दादाच्या स्वभावाबद्दल मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या अत्याचाराच्या काही काही कथा कानावर आपल्यासारख्या होत्या. पण त्याची तीव्रता इतकी भीषण व भयावह असेल हे त्या आकाशवाणीतून कळलं.
भाग ३ समाप्त .......
क्रमशः
© संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment