ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ३
आणि दूसरी व्यक्ति
अर्थातच भ्राता लक्ष्मणाची अर्धांगी उर्मिला. जिने लग्नानन्तर लगेच काही अवकाश जाण्याआधी पति पासून १४वर्ष दूर राहण्याचा योग साधला. थोड़ विचित्र वाटेल पण हा योगच होता नाशिबाचा , कर्माचा. कारण पति बन्धुकर्तव्याकरता १४ वर्ष दूर जाणार, यात तिची काहीच चूक नव्हती अथवा कर्मदोष सुद्धा नव्हता. तरीही हे दुःख पदरी आलेली सम्पूर्ण रामायणात ती एकमेव स्त्री होती. तिला आठवतय की शेवटच्या भेटित लक्ष्मणाने तिला काय सांगितल होत,
" उर्मिले मी ज्येष्ठ भ्राता राम , या परते वेगळे जगणे कल्पनेत देखील आणू शकत नाही. तस्मात तुला माझ्या वियोगाच दुःख सहन कराव लागेल, उणेपुरे १४ वर्ष."
आणि आपण त्याना वचन दिलय की ही १४ वर्ष मी त्यांची प्राणपणाने वाट पाहिन. आणि ज्या क्षणांसाठी मी जगले ,जागले (स्वतःशी हसत) हो खरच गेली १४ वर्ष या डोळ्याना , या पापण्याना झोप माहित नाही, आणि आपण सुद्धा एक निर्जीव शरीर म्हणून जगलो आहोत. कारण पति परते सुख नाही आणि त्यावीण जगणे नाही हेच परमसत्य असताना हा वनवास आपल्या नशिबात का आला. (तसा विचार केला तर खरा वनवास या अर्थाने रामायणात दोघानी भोगला. एक भ्राता लक्ष्मण आणि दूसरी अर्थात लक्ष्मण भार्या उर्मिला )
किति स्वप्न पाहिली होती या अयोध्येत येताना. पिताश्रीनि सुद्धा हातात हात दिला तेंव्हा जन्म जन्मांतरिच सार्थक झाल्या सारख वाटल होत.
जो अर्थ मिळे जीवना ते कर मज मिळाले
ज्यावीण असे जीवना सर्वस्व मज मिळाले
आणि ........... आणि हो या सर्व स्वप्नांच भस्म झाल एका क्षणात , माता कैकयिनी मागितलेल्या त्या २ वरानी जे पिताश्री राजा दशरथ याना द्यावे लागले. यात चूक कोणाची कोण बरोबर वागल हे सर्वस्वी गौण होत माझ्या दृष्टीने आणि आज सुद्धा त्यावर विचार करावा अस खरच मनापासून वाटत नाही. पण एक प्रश्न जो सतत मनात येतो , त्रास देतो आणि झोप लागू देत नाही तो म्हणजे माझी यात काय चूक होती.
जानकिताई ही पतिशिवाय राहु शकणार नव्हती , तस तीने स्पष्ट म्हटल आणि तिच अनेक मिनतवाऱ्या करून प्रभुनी ऐकल. यांच तर कर्तव्य होत भावाची पाठराखण करण. पण मी कधीही मनातली ही गोष्ट कोणाशीही बोलू शकले नाही. किंबहुना नकळत एक मोठेपणाचा दर्जा मला देऊन माझ्या भावनाना त्याखालीच थांबाव लागल. त्याना वाट मिळूच शकली नाही. तो एक प्रघात होत गेलाय , अगदी लहानपणा पासून.
मी आणि ताई यातला हा व्यक्त आणि अव्यक्ताचा खेळ नेहमीच माझ्या विरुद्ध गेलाय. आणि आपल्याला लहानपणीच मोठ असल्याचा शिकका मारला गेलाय तो आजतागायत. आई आणि पिताश्रीनी तर आपल्याला त्यागमूर्ति हेच नाम दिलय. नव्हे ते आपणच मिळवलय. का आपण अश्या समयी बोलू शकत नाही. का हे भाव जे आज पूर्ण प्रकट होतायत ते १४ वर्षानपुर्वी अप्रकट होते. काहीच का बोलू शकलो नाही आपण. की आपसुक प्रत्येकाने आपल कर्तव्य केल्यामुळे हे आपल कर्तव्य आहे असच या मनाने घेतल आणि तेच आपल प्रकट रूप झाल. असो , या मनाच्या उलढ़ालित आज पति परत येणार हा आनंदसुद्धा आपण विसरलोय.
चला लगबगिने कामाला लागू, झाल गेल गंगेला मिळाल.
(उर्मिलेचे भाव, भावना, अश्रु पाहून क्षणभर काळाला सुद्धा नियति या शब्दाचा राग आला असेल. इतकं अतीव दुःख तीने भोगलय आणि काहीही चूक वा प्रमात नसताना.)
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
२९/११/२०१७
जय श्रीराम
Comments
Post a Comment