ll ॐ ll. श्री गणेशाय नमः ll
सुखाचा शोध - १
मानवाच्या देहात आलेल्या प्रत्येक जिवाला सतत काही ना काही करत राहण्याची खुप मोठी देणगी विधात्याने दिलेली आहे. पण प्रथम या गोष्टीची जाणीव मानवाला कधी झाली असेल, कधी त्याला हे समजल असेल हे ख़र तर ताड़ण मुश्किल आहे. पण तरीही काही अंदाज बांधता येऊ शकतात.
मानव अगदी अश्म वा त्याही आधी कधीतरी जेंव्हा प्रथम हसला असेल वा रडला, रुसला वा असेच भाव व्यक्त करता झाला असेल तिथेच ख़र तर सुख दुःख या भावना जन्म घेत्या झाल्या. अनेक प्रश्न यातून निर्माण झाले. सुख दुःख, राग लोभ, हसण रडण हे कळून येण आणि ते वारंवार करावस वाटण आणि ते करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण ही जणु एक साखळी तयार झाली. यालाच जन्म आणि मृत्यु यामधील अंतर काटण किंवा जगण्याच्या संघर्ष करण म्हणजेच जीवन अस संबोधल गेल.
कधी ते सांगता येणार नाही , पण प्राणी आणि मानव यातील अंतर वाढत असतानाच्या काळात माणसाला आपण वेगळे आहोत हे उमगल असेल. किंबहुना तो फरक त्याला प्रकर्षाने जाणवला असेल. जाणीव , मन, भाव तरंग, तरलता, बुद्धि, उपजत ज्ञान हे पहिल्यांदा जेंव्हा उमगल असेल त्या वेळच्या माणसाच्या भावना काय असतील याची आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. यातून तयार होणाऱ्या विचारांच्या लहरी, त्याच व्यक्त होण हे ज्यावेळी कळल असेल प्रथम, त्या क्षणाच मोजमाप करताच येणार नाही. द्वैतही तिथेच सुरु झाल असाव. सुख दुःख, राग लोभ, प्रेम द्वेष इत्यादि
कदाचित पहिल दुःख, वेदना, धक्का यांची जाण आली तिथेच कदाचित सुरु झालाय ''सुखाचा शोध"
याचाच मागोवा घ्यायचाय या नव्या लेखमालेत आणि पहायचेत याचे अनेक पैलु.
सुखाचा शोध
© संकल्पना आणि लेखन प्रसन्न आठवले
०१/११/२०१७
शुभंभवतु
Comments
Post a Comment