ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ४
या दोन्ही विरुद्ध भावाच्या अधीन असलेल्या व्यक्तिंची भावावस्था पाहिल्यानंतर आता राजप्रासादात अन्तःपुरात जाऊया. माता कौसल्या यांच्या अवस्थेचा विचार करूया.
त्यांची अवस्था अजूनही विचित्र आहे. कारण जे घडल त्याचा दोष कोणालाच देता येत नव्हता. अश्याच संभ्रमावस्थेत मातेने १४ वर्ष काढली होती. जे घडल त्यात प्रत्यक्ष पति, राजा दशरथ आणि त्यांचीच द्वितीयपत्नी कैकयी, हे मुख्य कारण होते. प्रश्न दोष देण्याचा वा अपराध कोणाचा हा नव्हताच, पण का अस घडल तेही आपल्याच पुत्राबाबत का. प्रश्न हा होता, की नियतीने एका हाताने पुत्ररूपाने दान दिलसुद्धा आणि दुसऱ्या हाताने तेच हिसकावून घेतल, अक्षरशः काढून नेल.
यात समाधानाची बाब एकच की निदान १४ वर्षानि आज परत राम सीता व लक्षण यांच् दर्शन होईल, पुत्रच दोन्ही. हो कारण ते दोघे एकमेकांवेगळे करताच येण शक्य नाही. जितका राम मला प्रिय तितकाच , किंबहुना आता काकणभर अधिकच प्रिय आहे लक्ष्मण आणि अर्थात उर्मिला. ज्यात काहीही दोष नसताना भरडले गेलेले हे दोन जीव. राजा जनकानी अभिमानाने सांगितल की मला उर्मिलेचा अभिमान आहे. आम्ही परोपरी विनवुनसुद्धा ते म्हणाले की तिच्या सासरी अश्या दुर्धर घटना घडत असताना, आम्ही तिला काही दिवसांसाठी घेऊन जाव, असा विचार सुद्धा करू शकत नाही. आमच्या सर्व कन्या आपल्या घरी सुखात असतील याची खात्री आहे, आपण जगन्माता आहात. आम्ही निश्चिंत आहोत.
पण तरीही अपराधिपणाचा भाव काही केल्या जात नाही. चारही सूना, सूना कश्या मुलीच त्या, एकाहुन एक गुणवान आहेत. राजा जनकांचे संस्कार आणि मिथिला नगरीची पुण्याई, म्हणुनअश्या मूली रघुकुलात आल्या. एक श्रुतकीर्ति सोडली तर बाकीं तिघिनाही पतिवियोग या ना त्या कारणामुळे. आणि सेवाधर्म तर जणु घराण्याची देणगी असावी अशीच. कुठेही तक्रारीला वाव नाही की, चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नाही. कामात इतक्या हुशार की या राजकन्या होत्या हे ख़र वाटणाऱ नाही.
असो या सर्व विचारांच्या कोलाहलात माझे रामसीता आणि लक्ष्मण येत आहेत हेच विसरून गेले काही काळ. चला स्वागताची कितपत तयारी झाली आहे ते एकदा बघून घेऊया.
अस म्हणून माता कौसल्या आपल्या महालाबाहेर येऊन दासीना बोलावत्या झाल्या.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
३०/११/२०१७
जय श्रीराम
Comments
Post a Comment