दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग २ पुढे
४. योग्य माणसांची साथ. इथे मोदीजी, अमितभाई, डोवाल यांच्याबरोबर एक नाव जोडावं लागेल, ते म्हणजे काश्मीरचे मुख्य सचिव श्री सुब्रमण्यम, ज्यांनी या मोहिमेच्या तयारीत डोवाल व मोदीजी यांना गेले वर्षभर साथ दिली. या व्यतिरिक्त सर्व अनामिक माणसं ज्यांनी हे इप्सित साध्य व्हावं म्हणून आपली आपली कामं चोख बजावली, ती सर्व शाब्बासकीस पात्र आहेत.
यात काही नाव वा संस्था मुद्दाम अनुल्लेखित आहेत. कारण त्या नेहमी गुप्तस्वरूपी कार्यरत असतात किंबहुना तो त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. तरीही त्यांचं कर्तव्य स्तुत्यच आहे.
५. पुढला मुद्दा जो मी पहिल्या भागात लिहिला होता तो म्हणजे वरच्या व्यक्तीचा वरदहस्त. याबाबत आपण खर तर बोलायला सक्षम नाही. कारण वरची व्यक्ती म्हणजेच नमो. त्यांचा विश्वास मिळवणं हे सात नव्हे कित्येक जन्मांच्या पुण्याईचं फल आहे वा असेल आणि ते त्या दोघांनाच माहीत. सर्जिकल स्राईकच्या वेळी आणि एअर स्राईकच्या वेळी मुख्यतः अजित डोवाल सर्व सूत्र सांभाळत होते. हाताशी काही मोजकी विश्वासू माणसं होती.
दोन्ही वेळी एखादी बारीकशी चूक घातक तर ठरली असतीच पण जी बदनामी झाली असती त्यात मुख्य नाव मोदींजींचं गेलं असतं. हे सर्व माहीत असून १००% यशस्वी कार्य करायला अनेक गुण संबंधित व्यक्तीच्या अंगी असलेच पाहिजेत. अश्या काटेकोर मशीन प्रमाणे कार्यक्षमता असलेली माणसं हेरून त्यांना बांधून ठेवून त्यांना कार्य प्रेरणा देणं, कार्य सोपवणं हेच मोदींजींचं मुख्य यश आहे. काय जादू त्या माणसात आहे माहीत नाही, पण एकदा जोडलेली माणसं आयुष्य उधळून देण्यास तयार असतात. हे दैवदुर्लभ आहे. अशी माणसं छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभली.
अर्थात मी यात कोणत्याही प्रकारे मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत नाही. मी फक्त साथ देणाऱ्या माणसांच्या अंतःप्रेरणेबद्दल बोलतोय. कारण महाराज हे एक अलौकिक, एकमेव आणि अद्वितीय व्यक्तित्व होते, हे नक्कीच. पण मुद्दा इतकाच अशी माणसं मिळणं हे अलौकिक आणि दैवी आहे. या ३७० प्रकरणात पडद्यामागे अमितभाई आधीपासूनच असतील. फक्त अधिकृतपणे यात ते अर्थातच ३० मे, २०१९ , नंतर आले. पण इतक्या कमी वेळात अधिकार वापरून व जमलेल्या माणसांमधून उत्तम सहकारी निवडून त्यांच्याकडून तितकंच उत्तम काम करून त्यांना प्रोत्साहित करणं व आत्मविश्वास देत राहणं, हे एका उत्तम नेत्याचं वा सेनानायकाचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये अर्थातच मोदींजींइतकेचं अमितभाई हे देखील वाकबगार आहेत.
पण तरीही मोदींचा एक प्रमुख म्हणून आणि वरिष्ठ म्हणून मागे पाठिंब्याचा भक्कम हात असणं हे अहोभाग्य अमित भाईचं. यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. वरिष्ठ म्हणून कनिष्ठ माणसांवर असलेला विश्वास, याआधी मोदींजीं साठी , पक्षासाठी अमितभाईनी केलेली कामं, यशस्वीपणे पार पडलेल्या मोहिमा , ज्यात अमितभाईची कार्य कुशलता पदोपदी मोदींना जाणवली असेल, त्यांची दीर्घकाळ असलेली मैत्री , त्या मैत्रीतून निर्माण झालेला एकमेकांवरचा सार्थ विश्वास , दोघांची जमलेली वेव्हलेंथ, या साऱ्यातून देशहितासाठी हे अत्युच्च महत्वाचं काम निर्विघ्नपणे , तितक्याच हुशारीने आणि सर्वात महत्वाचं गुप्तपणे करणं हे अमितभाईसारखा वजीरच करू शकेल , हा मोदींचा असलेला विश्वास, अमितभाईनी सार्थ ठरवला.
यात एक मुद्दा मुद्दाम मांडतो. अश्या प्रकारच्या कार्याला लागणारी कुशलता, नियोजन व गुप्तता फक्त आणि फक्त संघाच्या मुशीतून तयार झालेली माणसंच करू शकतात. याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे सुनीलजी देवधर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला त्रिपुरा विजय आणि पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व यश. संघशक्ती युगे युगे.
खरतर हा विषय दोनच भागात संपवायचा होता पण विस्तारपूर्वक सांगताना लेखन वाढत गेलं, म्हणून अजून काही बाबी, अमितभाईशी निगडित, पुढील भागात बघूया.
भाग २ समाप्त
© लेखक : प्रसन्न आठवले
०७/०८/२०१९
Comments
Post a Comment