Skip to main content

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ३


गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ३

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||

हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||

पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||

चैत वार्‍याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३|

गीत गदिमा
संगीत सी रामचंद्र
गायिका आशा भोसले
चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव

विषयवस्तू उपभोगणं आणि त्यासाठी देह झिजवणं किंवा संसारात रममाण होणं हे वास्तविक सामान्य लक्षण आहे. पण एखादा ज्ञानमार्गी वा भक्तिमार्गी साधक ज्यावेळी आपल्या साध्याच्या म्हणजेच या विश्वाच्या निर्मात्याच्या शोधार्थ असतो त्यावेळी त्याला अनेक मानसिक वा शारीरिक यातनांमधून जावं लागतं. अनेक दिव्य पार करावी लागतात. अश्या कर्मकठीण वा आत्मवंचित मार्गावरून जाताना होणारा त्रास हा त्या ध्यासामुळे नगण्य वाटतो.

पण एकवार साक्षात्कार वा परमगुह्य वा ज्ञान प्राप्त झाल्यावर मनातील अंधःकार, अज्ञान, शंका, किल्मिश वा  नैराश्य पूर्ण नष्ट होतं. त्या अज्ञानाचा विनाश होतो. अज्ञान म्हणजे एक प्रकारचा अंधारच. ज्यामुळे त्या जीवाला मार्गातील काहीही दिसत नाही. पण एकदा नवल वा साक्षात्कार झाल्यावर हा सर्व अंधार दूर होऊन ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने अंतर्मन वा अंतरात्मा उजळून निघतो. तिथे न दिसू शकणारं काहीच उरत नाही.

ही साक्षात्काराची स्थिती मोठी विलक्षण असते. जे दिव्य आणि अलौकिक ज्ञान त्या वेळी प्राप्त होतं , आत्म साक्षात्कारामुळे आणि कुंडलिनी जागृती मुळे की, जे माहीत नव्हतं वा जे आपण समजत होतो त्याहून किती भिन्न आहे विधाता व त्याची सर्व निर्मितीमागील कारणमीमांसा की या एका अद्भुत सत्याच्या जाणिवेने ओठांवर शब्द न येता एक आपल्या मूढमतीबद्दल आणि आपल्या समजुतींबद्दल एक हास्य उमटत. त्याहीपेक्षा जे अद्भुत ज्ञान प्राप्त झालं त्यामुळे सुद्धा मन अचानक हसू लागतं. अप्राप्य ते प्राप्त झाल्यामुळे एक अद्भुत अशी गोठ म्हणजेच गोष्ट घडल्यामुळे.

ती गोष्ट वा ते ज्ञान हे काय आहे याचा दृष्टांत देताना ज्ञानी म्हणतो की रात्रीच्या तेही अवसेच्या रात्रीत स्वप्नात कोवळा म्हणजे प्रभातीचा प्रथम दर्शनाचा दिनेश म्हणजेच ताम्रवर्णी केशरी छटा असलेला अरुण यावा तशी स्थिती मनाची झाली आहे. म्हणजे एक गोष्ट त्यांनी सांगितली की अंधारात जर दुपारच्या सूर्यप्रकाशाचा उद्रेक झाला तर डोळे दिपून जातील वा अचानक भयंकर प्रकाशाने दृष्टी पण जाण्याचा संभव असतो. पण हा प्रकाश कोवळ्या राविकिरणांप्रमाणे आहे. तो सहन करता येतोच पण प्रभातीची एक शीतलता वा थंडावा सुद्धा त्यात आहे. त्यामुळेच ते सहन पण करता येऊ शकतं.

क्रमशः भाग ३ समाप्त
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...