गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ५
संपूर्ण गीत
कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर
जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर
गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी
आणि मी कर्मदारिद्री यातून काहीही बोध न घेता बालपण वाया घालवलं. व्यर्थ काळ घालवला. हे बालपणाचं झालं त्यांनतर येणारा आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे तरुणपणाचा. हा खरा असा काळ की ज्या काळात शारीरिक व मानसिक शक्ती ही चरमसीमेवर म्हणजेच शिखरावर असतात. या वयात अनेक गोष्टी या , शारीरिक व मानसिक ताकदीने सहजसाध्य असतात. माणूस या गुणांमुळे मूळ प्रवाहातून बाजूला जातो.
या अनेक गुणांबरोबर वा सकारात्मक गोष्टींबरोबर मोह , लोभ, क्रोध, मद, मत्सर याला सहज बळी पडण्याचं वय. यामुळेच प्रवाहपतीत होण्याचं भय तितकंच अधिक असतं. म्हणून जे वाटत होतं वा घडू नये असं तुला ईश्वरा वाटलं होतं तेच घडलंय. संपूर्ण तरुणपण म्हणजेच तारुण्य या मोह , क्रोध, लोभ या अवगुणांना खांद्यावर वाहून त्या पखालीनी पापाचं ओझं वाढवून पुढच्या अनेक जन्माची जणू सोयच करून ठेवली आहे.
या संपूर्ण आयुष्याच्या पटावर सर्व गोष्टी वासनेच्या प्रवाहात वाहवत जाऊन सर्व आयुष्य वाया घालवल्यावर, आता वृद्धापकाळात या जीवनसागराचा किनारा पैलतीर दिसायला लागल्यावर या कर्मदारिद्री जीवनाची जास्त प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे देवा. म्हणून तुझ्या एका कृपाकटाक्षासाठी मन तळमळ करत आहे.
या जीवनातील उणेपणाची आणि त्यातील मोह माया आदी बद्धध करणाऱ्या बाबींची जाणीव झाल्यावर व या सर्वात तूच एक नावाडी आहेस हे समजल्यावर आता पुन्हा या जन्म व मृत्यू या लक्ष लक्ष योनींच्या महाचक्रात अडकण्याची या आत्म्याची इच्छा नाही. तू आता सर्व उलगडून दाखवलस आणि कर्मफलांची ओझी वाहण्यात काय धन्यता आहे हे कळल्यावर, फक्त एकच मागणं आहे देवा, या पुनरपी जननं पुनरपी मरणं या येरझाऱ्या आता नकोत देवा. नका यामध्ये आता अडकवू या आत्म्याला.
ऐहिक सुखाची परमावधी झाली या आयुष्यात. सर्व आयुष्य जणू उपभोग घेत घालवलंय. या ऐहिक जगाचा पोकळपणा पाहिलाय. त्या पोकळ वाश्याला व्यर्थ बांडगुळ म्हणून चिकटून राहण्यात आणि त्याचा व्यर्थ बडेजाव करण्यात काही हशील नाही हे जाणवतंय देवा. म्हणून त्याचा सुद्धा सोस व मोह आता नको वाटतो. नको देवा ऐहिक सुखातील वा भौतिक जगतातील काही काहीसुद्धा नकोय. हे ऐहिकाचं अवडंबर दूर करा पांडुरंगा , पंढरीराया. इतकं तरी निदान मान्य करा , या पामराचं.
क्रमशः
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१९
Comments
Post a Comment