गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग १
संपूर्ण गीत
कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर
जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर
गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी
मानव जन्माचं सार्थक आणि अंतिम ध्येय , आपल्याला ज्ञात असो वा नसो , एकच असत ते म्हणजे मोक्ष , मुक्ती, हृदयांतरी वसलेला आत्मा आपला पिता व माता सर्वकाही असलेल्या नारायणाला सुपूर्द करणं हेच असत. निदान तसा विधात्याच्या रचनेचा भाग वा उद्देश असतो. याची जाणीव वा जाण असणं हीच एक मोठी भाग्यकारक गोष्ट आहे.
हा एक योग आहे. या रचनेत प्राणी कर्मगतीनुसार एक एक क्रम वा पद पुढे पुढे सरकतो. कदाचित अनेक पद वा योजनं दूर सुद्धा जाऊ शकतो. नव्हे सर्वसामान्यपणे जातोच जातो. कारण आपलं इप्सित वा ठिकाण माहीत नसलेला यात्री जसा कुठेही विश्राम घेतो, काही आलेलं स्वीकारतो, काही मिळेल ते धन्य मानतो वा कशात कशात गुंतत असतो. त्याच्या लेखी थांबलो तीच आपली दिशा , तेच आपलं स्थान वा तेच ध्येय.
हा योग देखील मात्र कर्मानेच लेखी येतो. पण मूळ उद्देश वा अंतिम ध्येय वा साध्य माहीत नसल्यामुळे व्यर्थ फेऱ्यात अडकलेला जीव हा जत्रेतील पाळण्यात अडकल्यासारखा असतो. जसा पाळणा हलेलं , फिरेल वा वेग घेईल त्यानुसार त्याला कोणताही पर्याय नसल्यामुळे फिरत राहणे गरजेचचं असतं. पाप वा पुण्य या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत कारण विधात्याच्या नजरेत फक्त कर्म आणि त्याचे फल याच गोष्टी असतात. किंबहुना त्याच त्याने या जगाचा मार्गदर्शक म्हणून नेमलेल्या आहेत.
यावर अजून माया ही एक अजब गोष्ट निर्मात्याच्या कल्पनेतून प्राण्याच्या मार्गात जन्म ते मृत्यू येऊन उभी असते. ती बुद्धीचा असा काही भेद करते की प्राणी भास व आभास या मितीत अडकून आपली कक्षा विसरून जन्म मृत्यच्या फेऱ्यात अडकून जातो. बर यात माया स्वतः काही करत नाही. ती बुद्धिभेदाने फक्त कर्म करण्यास , न करण्यास वा अस्थिर करण्यास प्रवृत्त वा निवृत्त करते. हीच माया सजीव वा निर्जीव दोन्हीना समान न्यायात तोलून आपले इप्सित साध्य करते.
क्रमशः
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०१/२०१९
Comments
Post a Comment