गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ४
संपूर्ण गीत
कैवल्याच्या
चांदण्याला भुकेला
चकोर
चंद्र व्हा हो
पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो,
तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे
पैलतीर
जन्ममरण नको आता, नको
येरझार
नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.
मन करा थोर
गीत : अशोकजी परांजपे
संगीत आणि स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी
त्या कैवल्याच्या, निजधामाच्या चांदण्यात न्हाऊन परम ईश्वराला पाहण्याची आस लागलेला भक्त त्याच आर्ततेने ईश्वराची आराधना , मनधरणी करतोय की हे देवा तुझ्या कृपेच्या कैवल्यरूपी चांदण्याची आस मला लागली आहे.
इथे कैवल्य म्हणजे ईश्वराच्या हृदयात काही स्थान मिळावं किमान त्याच्या नजरेचा एक कटाक्ष तरी पडावा असा आहे, जेणेकरून या जीवाचं सोनं होऊन जाईल.
याच भावाने आणि भक्तीच्या अलोट ओढीने भक्त या भगवंताला साद घालतोय की मी तुझ्या एका कटाक्षाला भुकेला आहे. तुझ्या लोचनात मला प्रेमरूप चांदणं दिसू दे. हा जन्म कृत कृत्य होऊ दे. आता फक्त हीच ओढ , आस आणि मनीषा शिल्लक आहे. बाकी सर्व इच्छा वासना जळून गेल्यात.
अशी कल्पना आहे की चकोर हा पक्षी रात्रभर चंद्राकडे व त्यातून येणाऱ्या चांदण्याकडे एक टक पहात असतो. तो फक्त दुरून चंद्राच्या चांदण्याला न्याहाळतो. त्याला या चांदण्यात असण्यातसुद्धा एक अलौकिक आनंद मिळतो. त्याचप्रमाणे हे पांडुरंगा , विठ्ठला , हे पंढरीनाथा तुझ्या कृपेचा अलौकिक कटाक्ष, ज्यासाठी मी भक्ती करत आहे त्या कटाक्षाला, त्याचा एक कवडसा तरी मिळावा, म्हणून मी त्या चकोर पक्ष्याप्रमाणे वाट पहात आहे.
आपण माझ्यासाठी चन्द्र होऊन या जीवनाच्या विस्तीर्ण आणि अशाश्वत अवकाशात येऊन एकदा तरी तृप्त करा, हे कैवल्यनाथा. माझ्यासारख्या पापी, अधमी जीवासाठी आपलं दयारुप विशाल मन आपण अजून थोर करा, मोठं करा आणि माझी सर्व पातक पदरात घेऊन कृपेचा चंद्रप्रकाश माझ्यावर येऊ द्या. पांडुरंगा , दयानाथा त्याच साठी हा जीव जगवलाय मी.
माझ्या आयुष्यात मी खर तर काहीच करू शकलो नाही. संपूर्ण लहानपण हे फक्त खेळात व्यर्थ घालवलं. ज्या वयात भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, स्वतः माऊली ज्ञानराजा , नामदेव महाराज, सोपानकाका आणि मुक्ताई यांनी तुझ्या भक्तीची वेल या जगतात लावून त्या अमृतवेलीला गगनात नेऊन ठेवलं. किती महान आत्मे होते हे सर्व. ज्यांनी स्वउद्धारा बरोबरच लाखो जनांना आत्मउद्धाराचा सर्वात सोप्पा मार्ग स्वतः त्यावर चालून तयार करून दिला. नव्हे या सर्व संतांनी
स्वतः जनतेला कडे खांद्यावर घेऊन आपण पायी वाट चालून पंढरीच्या देवळापर्यंत आणून सोडलं.
आणि मी कर्मदारिद्री यातून काहीही बोध न घेता बालपण वाया घालवलं. व्यर्थ काळ घालवला.
क्रमशः
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०१/२०१९
Comments
Post a Comment