भारतीय प्रजासत्ताकाचे महत्व
सहस्त्रावधी वर्षापासून अस्तित्वात असलेल्या भारतवर्ष या भूमीला १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं असं का म्हणायचं त्याचा उहापोह खालील मुद्द्यांवर केला आहे.
१. अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश अश्या विशालकाय प्रदेशाला भारतवर्ष हे नामाभिधान कुरुवंशातील राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र आणि सर्वश्रेष्ठ राजा भरत यांच्या नावावरून मिळाले असं इतिहासात आपण वाचलं असेल. त्याच महत्वाच कारण असं कि या भरत राजाने संपूर्ण भूप्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. आणि असा तो बहुदा पहिलाच सम्राट असावा. म्हणूनच त्याच्या नावाने तो संपूर्ण भूभाग म्हणजेच अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश भारतवर्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
२. त्यानंतर मौर्य सम्राटांनी यातील बऱ्याच भूप्रदेशावर अधिपत्य गाजवल. त्यानंतर अशाप्रकारचा पराक्रम मोंगल सम्राटांनी करून दाखवला. पण तरीही संपूर्ण प्रदेशावर अधिपत्य बराच काळ गाजवणे फार थोड्या सम्राटांना जमले.
३. हे अर्वाचीन काळात फक्त ब्रिटिशाना जमलं. ब्रिटिशांचे हे जणू उपकार म्हणावे लागतील , कि त्यांनी हा संपूर्ण भूप्रदेश एका अधिपत्याखाली आणला. त्याचप्रमाणे एकप्रकारे या भूभागाला एकसंध शासन व्यवस्था सुद्धा प्राप्त करून दिली. एक सूत्र शासन पद्धतीचा , एक सूत्र अर्थव्यवस्थेचा, एकसूत्र दळणवळणाचा , एकसूत्री कार्यपद्धतीचा , एकसूत्री अंमल हि ब्रिटिशांची मोठी देणं आहे.
४. म्हणून जेंव्हा या देशाला एक देश अस खऱ्या अर्थाने (meaning ) आणि अर्थाने (monetary system ) संबोधलं जाण प्राप्त झालं वा संभव झालं तेही ब्रिटिश अम्मलात. देश ब्रिटिशांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न झाले अथवा सुरु झाले तेही याच शासनव्यवस्थेमुळे. एका अर्थाने बघितलं तर अगदी पेशव्यानी अटकेपर्यंत झेंडे लावले तरीही जिंकलेल्या भूप्रदेशाला एका छत्राखाली आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी, तसेच त्याआधीच्या कोणत्याही राजाने वा सम्राटाने कधी केल्याचे दिसत नाही.
५. हा संपूर्ण प्रदेश जो आज भारतभूमी म्हणून ओळखला जातो त्याला आपले राष्ट्र हि संकल्पना फार पूर्वीपासून लोकभावनेत निश्चित होती या बाबत दुमत असण्याच कांरण नाही. पण तरीही या विस्तीर्ण प्रदेशाला, विविध संस्कृतीत विभागल्या गेलेल्या लोकांना कुणीही एका अंमलाखाली आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. पण त्याला एक प्रकारे एकराष्ट्र हि संकल्पना मूर्त स्वरूपात आणली तीही ब्रिटीशानीच.
६. ब्रिटिश हे प्रथम शासक होते ज्यांच्या विरुद्ध संपूर्ण देशाने (including पाकिस्तान) एकसूत्र पद्धतीने , एकदिलाने, एकाच धोरणाने, संघटितपणे,एकाच ध्येयाने, काही विशिष्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्र स्वतंत्र व्हावे म्हणून प्रथमच प्रयत्न केले.
उदा. मराठी लोकांनी महाराष्ट्र, द्रविड लोकांनी दक्षिण भारत, उत्तर भारतातील लोकांनी उत्तर भारत स्वतंत्र व्हावा असे प्रयत्न केले नाहीत .
७. याच अजून एक वैशिष्ट्य हे कि या आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही राजाने वा सम्राटाने न करता सर्वसामान्यातून निर्माण झालेल्या नेतृत्वाने , सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून, त्यांना यात सामील करून व कोणत्याही सैन्याशिवाय लढून मिळवले. यात हिंसक आणि अहिंसक दोन्ही मार्गांचा वापर झाला. दोन्हीही आपापल्या जागी सुयोग्यच होते. दोन्ही मार्गांचे उद्धेश्य एकच होते. भारताच स्वातंत्र्य, हा देश स्वतंत्र करण. आतापर्यंतच्या कोणत्याही लढ्यात सैन्य सोडून सर्वसामान्य जनता कधीही उतरली नाही वा उतरू शकली नाही. एका अर्थाने ब्रिटिशांची खूप मोठी देणं या देशाला मिळाली.
७. दुसरी देणगी ब्रिटीशानी दिली ती म्हणजे, संपूर्ण देशाला एक सैन्य व्यवस्था. जी आजपर्यंत कोणत्याही राजवटीने दिली नाही. अनेक अर्थाने याचे खूप मोठे परिणाम एकसंध देश घडण्यात आहे. इतर काही गोष्टी ज्या या देशाला एकसूत्र व्यवस्थेत बांधू शकल्या त्या म्हणजे :
- एक दळणवळण व्यवस्था जसे रेल्वे, पोस्ट.
- एक अर्थव्यस्था जस एक चलन, एक केंद्रीय बँक वा त्याद्वारे संचालित / प्रबंधित इतर बँका , सुटसुटीत कर पद्धती, एक अर्थसंकल्प , सुनियोजीत शासन व्यवस्था , सुसूत्र व सुयोग्य कायदे पद्धती आणि कायदे करण्याची सुनियोजित पद्धत.वेगवेगळ्या व्यवस्थेसाठी वेगवेगळे कायदे.
- खूप मोठी देणंगी म्हणजे लोकशाही शासन प्रणाली , एक घटना (हि जरी आपण नंतर आपल्या पद्धतीने तयार करून स्वीकारली तरीही याच मूळ हे ब्रिटिश व्यवस्थेत आणि त्यांच्या देशाच्या लोकशाही शासन पद्धतीत आहे.
- एकसूत्रीय शिक्षण पद्धती जी आता या देशाचा खूप मोठा पाया आहे. शासकीय नोकरदार व सचिव पातळीवरील अधिकारी , जिल्हाधिकारी तयार करण्याची सुनियोजित पद्धत.
८. एका अर्थाने एक देश हि प्राचीन कालीन संकल्पना ब्रिटिश राजवटीने खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवून सर्व सूत्र, शासन पद्धती, कायदे, कायदे करण्याची व्यवस्था आणि मुख्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य निर्माण करण्यासाठीचा पूर्ण व भक्कम पाया रचून दिला.
आणि म्हणून सुरवातीला म्हटल्या प्रमाणे १९४७ साली १५ ऑगस्ट या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने एक देश म्हणून जन्माला आला. त्याच प्रमाणे सदर देशाची घटना म्हणजेच आपली राज्यघटना (या देशाची आधुनिक गीता म्हणूया ) हि आज म्हणजेच २६ जानेवारीला , १९५० साली आपण अधिकृत रित्या स्वीकारली. म्हणून आजच्या दिवशीच महत्व जरी आज औपचारिक राहील असेल तरीही, जर वरील सर्व मुद्दे लक्षात घेतले तर ते जास्त अधोरेखित होत.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. आणि येथील लोकशाही अमर राहो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना.
जय हिंद !!!!!!!!!! वंदे मातरम् !!!!!!!!!!!!!!
लेखन व संकल्पना : प्रसन्न आठवले
२६ जानेवारी, २०१८
Comments
Post a Comment