श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
आज कैलासावर स्वये श्रीनारायण आपल्या दोन भिन्न प्रकृती रुपात आणि त्या रूपातील आपल्या अर्धांगीसह आले आहेत म्हणजे नक्कीच काही प्रयोजन वा कोणत्या तरी कार्याचे नियोजन करून अथवा करण्यास आले असावेत असा कयास करूनच श्रीमहादेवानी पृच्छा केली
" आज कैलास पर्वती आपण मूळ स्वरूप त्यागून या रुपात प्रकट झालात. काही प्रयोजन आहे का ? "
श्रीराम : आपल्या दर्शनाची वेडी आस आम्हाला आपल्या प्रत घेऊन आली. अनेक वर्षे झाली आपली फक्त समाधी अवस्थेत ध्यानयोगातच भेट होत आहे. म्हणून विचार आला की प्रत्यक्ष रुपात, आपले दर्शन घ्यावे. त्याच उद्देशाने आज उपस्थित झालो. येऊन पहातो तर काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण तेसुद्धा, देवी रुक्मिणीसह, समोर पहावयास मिळाले. दर्शन तर झालेच, पण काही सद्विचार ऐकण्याचे भाग्य आणि योग जुळून आला.
श्रीकृष्ण : प्रभू आपण अगदी मनकवडे आहात, अर्थात आहातच म्हणा. भक्तांच्या मनातील भाव भक्तांनी न वदता, आपण जाणता. यात गुंजभरदेखील मिथ्या वचन नाही. काय कैलासनाथ.
श्रीशंकर : अर्थात आम्ही पूर्ण सहमत आहोत. प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात भक्तवत्सल , भक्तप्रतिपालक , तारणहार आहेत. तशीच त्यांची किर्त आहे. या ब्रिदाचे त्यांनी सदैव रक्षण केले आहे. श्रीकृष्ण चरित्रातून श्री विष्णूंनी दाखवून दिलं आहे की,जसं समोरचं मानव स्वरूप असे, त्याच्याशी त्यानुसारच प्रतिक्रियात्मक वदावे, वा कृतीशील व्हावे. पण करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम.
श्रीकृष्ण : पूर्ण सत्य वदलात, श्रीमहादेव. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह वा पूर्वमत कोणत्याही शत्रूबद्दलदेखील न करून घेता. ती व्यक्ती वा त्या देहा तील, उन्मत्त शक्ती समोर आल्यावर, शक्यतो शस्त्रवापर न करता दयार्द्र बुद्धीने, त्या शत्रूचा विनाश टळावा, याकडे प्रभूंचा कल असे. अगदी प्रत्यक्ष पाखंडी, धूर्त व महाउदंड रावण देखील समोर आल्यावर, आपण त्या रावणास शेवटची संधी देऊन म्हटले होते की, सीतेस सोडून दे, आम्ही तुझे प्राण घेण्यास उत्सुक नाही. माझ्या जानकीस तू माझ्या स्वाधीन कर आम्ही युद्ध न करता तुझा जीवदानं देऊ, जानकीस घेऊन, येथून प्रस्थान करते होतो.
श्रीशंकर : आम्हाला यात त्यांच्या अनेक गुणांचा बोध होतो.
श्रीकृष्ण : अर्थात ?
श्रीशंकर : एक जीवाच्या मूळ स्वरूपातील सद्गुणांवर पूर्ण विश्वास, ते सद्गुण कोणत्याही क्षणी प्रकट होऊ शकतात, हा दुर्दम्य आशावाद, प्रत्येक जीवाला असलेल्या जगण्याच्या अधिकारावर श्रद्धा, त्याच्या शक्तीच्या असलेल्या आदमासा पेक्षा,स्वतःच्या शक्ती व स्फूर्तीवर असलेला दृढ विश्वास अश्या अनेक गुणांचा समुच्चय व यांनी भरलेलं आणि भारलेलं आयुष्य म्हणजे प्रभू श्रीराम यांचं जीवन.
श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड, त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट, न ठरवता करून दाखवली ती म्हणजे
क्रमशः
ही लेखमाला कॉपी राईट रजिस्टर्ड आहे, त्यामुळे नावासकट प्रसारित करावी.
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०९/२०२३
Comments
Post a Comment