जन्म आणि नामस्मरण लेख १
©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले
मानवी देहात जन्म घेतल्यावर, नामस्मरण का करायचं या मुख्य गाभ्याला धरून लिहिण्यात येणारी ही मालिका आहे. याची मुख्य पाच कारणे आहेत. प्रत्येक कारण विस्ताराने बघून नंतर पुढच्या कारणाकडे आपण वळणार आहोत.
१. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून :
प्रत्येक माणसात, नव्हे प्रत्येक प्राण्यात, अनेक प्रकारचे दोष असतात. वर्तणुकीचे दोष, स्वभावाचे दोष, चारित्र्याचे दोष, समूहात वावरताना अडसर निर्माण करणारे दोष, मनातील संचितातील दोष, देहबाह्य संस्कारांचे दोष, बाल्यावस्थेत जोपासले गेलेले दोष, आयुष्यात प्रत्येक क्षण घडत जाणाऱ्या घटनांचे दोष इत्यादी अनेक प्रकारचे दोष प्रत्येक माणसात असतात.
दोषांची निश्चित व्याख्या करणं अवघड आहे. पण प्रत्यक्ष दोष म्हणजे आपण वागताना ज्या चुका होतात आणि ज्या चुकांनी स्वतःला आणि दुसऱ्याला हानी पोचते वा पोचू शकते, त्याला दोष म्हणता येईल. किंवा वागण्या तील त्रुटी, कमतरता, अती पणा याला दोष म्हणता येईल.
यात स्वतःला आणि दुसऱ्याला हे मुद्दाम लिहिलं आहे. कारण दुसऱ्याला आपल्या वागणुकीतून अवगुणानी हानी पोचते किंवा पोचू शकते, ते दोष आहेतच. पण अनेकदा आपल्या अवगुणांनी, पशुत्वाने आपण स्वतःला सुद्धा अनेक प्रकारच्या हानीत वा संकटात लोटतो. यामधे व्यसनं, क्रोध इत्यादी अनेक अवगुण असतात, ज्यामुळे आपण आपल्याला देण्यात आलेलं, हे जीवन हानिकारक रित्या, लाभापासून अनेक पट दूर लोटतो.
म्हणजे एखाद्या क्रोधामुळे आपल्या आयुष्यात आजपर्यंत आपण स्वतःवर, अर्थात स्वभावावर, देहावर, मनावर आत्म्यावर केलेले संस्कार, स्वतःच्याच हानिकारक कर्माने, पुसून टाकतो. तेसुद्धा कदाचित एखाद्या क्षणात. त्यामुळे परिणामस्वरूप, मूळ आत्मशुद्धी व आत्मोंनत्ती या उद्देशापासून किंचित किंवा अनेक योजने माणूस दूर जातो.
उदाहरणार्थ : आपण आपल्या स्वभावातील क्रोध, मद, मत्सर, अती उत्तेजना या सारख्या स्वभाव व वागणूक यातील दोषांमुळे, स्वतःच्या मनाला आणि अनेकांच्या मनाला दुखावतो किंवा दुखावू शकतो. प्रत्येक मन व आत्मा, दुखावले गेल्यावर, मनात नक्कीच काहीतरी भाष्य करतच करतं. याला अपवाद संत वृत्तीचे लोक. पण अश्या वागणुकीमुळे, त्याचा दोष प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याकडे येतात. त्यांचं परिमार्जन करण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही.
किंबहुना हे काही चुकीचं आहे, असा विचारसुद्धा आपल्या मनाला शिवत नाही. म्हणजे अशी कित्येक मलयुक्त कर्मबीजं, आत्मा संस्कार रुपात वागवतो, पुढे नेतो आणि त्या किंवा भलत्याच देहाला, त्याचे परिणाम स्वरूप फल, भोगायला लावतो. देहातून त्याज्य असणारे अनेक घटक आपण देहाच्या दहा द्वारातून बाहेर टाकतो. यात काही बिघाड झाल्यास किंवा अती सेवन झाल्यास अतिरिक्त त्याज्य घटकांचं उत्सर्जन अतिरिक्त प्रमाणात होतं.
जेणेकरून, देहाची शुद्धता राखली जाते. पण आपण कधी हा विचार करतच नाही की, मनातील त्याज्य घटकांची विल्हेवाट आपण लावली पाहिजे. याचा विचार सुद्धा मनात येत नाही. किंवा अशी काही क्रिया, प्रक्रिया असते किंवा असावी, असा विचार सुद्धा मनाला शिवत नाही.
मुळात ज्ञान व विज्ञान दोन्ही जाणत की मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे. जर ते इंद्रिय आहे तर, देहातील इतर इंद्रियात त्याज्य घटकांची निर्मिती होतेच आणि होणारच. मग देहाप्रमाणे,मनात निर्माण होणारी,त्याज्य घटकांची विल्हेवाट लावायला नको का.
विधाता, ज्याने एका परिपूर्ण मानवी देहाची निर्मिती करून, त्यामध्ये कोणतीही अपूर्णता ठेवलेली नाही. अगदी नराचा नारायण, करण्याची अद्वितीय आणि अफाट क्षमता याचं देहात, ईश्वराने निर्माण केलेली आहे. ते फक्त आणि फक्त मनाच्या सहाय्याने साध्य होऊ शकतं. म्हणूनच निश्चितच, मनातील मैला, त्याज्य घटक उत्सर्जित करण्यासाठी, अशी काही व्यवस्था निर्माण झालेली असेल. कारण ईश्वर हा पूर्णस्वरुप, परम आत्मा आहे आणि मानवी देहाला, याचं परिपूर्णतेच वरदान त्याच ईश्वराने, प्रदान केलेलं आहे.
मुळात मनरुप इंद्रियाला इतर इंद्रियांप्रमाणे, भूक, भय, निद्रा आणि मैथुन, ही चार वैशिष्ट्य बसतात का. तर नक्कीच या चारही मूळ बीजांची प्राप्ती मनाला, मानवी देह निर्मिती पश्चात झालेली असतेच असते. परंतु देह समाप्ती पश्चात सुद्धा ही भूक भय निद्रा व मैथुन मनाला ग्रासतात आत्म्यासह हे सर्व घटक पुढील प्रवासाला निघतात आणि त्याचपोटी ते मनरुप चिरंजीव इंद्रिय, अनेक देहातून हे भूक, भय,निद्रा व मैथुन, शमवण्या साठीच, पुन्हा पुन्हा नवनवीन देह धारणा करून, आपल्या गुण दोष पाशात, मूळ आत्म्याला बद्ध करतं. वास्तविक ईश्वराने, प्राण्यांच्या या चार गुणधर्माप्रमाणे, एक विकसित मेंदू आणि त्याला जोडून विचार, हे पाचव सर्वात प्रगत आणि प्रगल्भ धन फक्त आणि फक्त माणसाला दिले आहे.
क्रमशः
©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले
०५/०९/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment