श्रीराम व श्रीकृष्ण संवाद भाग १ (काल्पनिक)
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
हा लेख आणि यातील संवाद पूर्णतया काल्पनिक आहे. पुराणात वा इतिहासात याचा शोध घेऊ नये.
यामध्ये कल्पना अशी केली आहे की श्रीराम-जानकीदेवी हे श्रीकृष्ण-रुक्मिणीदेवी हे, कर्मधर्म संयोगाने कैलासावर श्रीमहादेव-देवी पार्वती यांना,भेटण्यास जात आहेत. वास्तविक रुपात, त्यांनी मानवी देह त्याग केला असला तरीही, चैतन्य रुपात ते तत्वरूप चिरंतन आहेत. म्हणूनच त्याच रुपात ते सर्वदूर वावर करू शकतात. याच आधाराने हा लेख लिहिला आहे.
परमात्मा श्रीकृष्ण व माता रुक्मिणी हे माता जानकी आणि प्रभू श्रीराम याना प्रणाम करतात.
श्रीकृष्ण व रुक्मिणी : प्रणाम तुम्हा उभयतांना.
श्रीराम व जानकी : प्रणाम आमचा सुद्धा.
श्रीकृष्ण : माझ्या अनुमानानुसार आपली प्रथम भेट आहे.
श्रीराम : हो प्रथम भेट आहे.
श्रीकृष्ण : महादेवाच्या भेटीस्तव आला आहात अस दिसतंय.
श्रीराम : हो आपल्या प्रमाणेच.
श्रीकृष्ण: दीर्घकाळापासून काही प्रश्न होते मनात, आपली अनुमती असेल तर वदावे असे म्हणतो.
श्रीराम : अवश्य. किंबहुना आपल्या भेटीचा तोच उद्देश असू शकेल, विधात्याच्या इच्छेनुसार आणि नियतीच्या आदेशा नुसार.
श्रीकृष्ण : कर्महीन जग चालत नाही, तद्वत प्रत्येक गोष्ट ही कर्मानुसार होत असते. म्हणून या भेटीचे प्रयोजन सुद्धा कोणत्या ना कोणत्या कर्मफलानुसार सुनिश्चित केले होते. शेवटी नियती तरी काय आहे.कर्मसंचय फलादेश, प्राक्तन या स्वरूपात, कधी समोर येईल सांगणे कठीण आहे. म्हणजे त्याचा भोगावयाचा क्रमसुद्धा कर्मानेच निश्चित केलेला असतो.
श्रीराम : जे रामजन्मांत, आम्हाला भोगावे लागले, त्याच प्राक्तनाने पुढील जन्मी म्हणजे श्रीकृष्ण जन्मात, आपण अनेक सुखोपभोग घेतले, राजवैभव पेललेत, अनेक गोष्टी स्वहस्ते, तर अनेक परहस्ते, घडवल्यात आणि सरतेशेवटी महाभारत युद्ध देखील न लढता नेतृत्त्वित केलेत. खर आहे ना
श्रीकृष्ण : आपण जसे मर्यादा पुरुषोत्तम आहात. परंतु ज्ञानाचा अमर्याद सागर आहात.त्याच ज्ञानाचा, बहु श्रुततेचा उपयोग या जन्मी आम्हास झाला हे नक्कीच. कारण आमचा प्रशिक्षण कालावधी हा फक्त सांदीपनी गुरुजींच्या आश्रमातील बहात्तर दिवसांचा. पण आपण तर, गुरुदेव श्रीवसिष्ठ, गुरुदेव श्रीविश्वामित्र यांसारख्यां कडे आपले उपजत ज्ञान,अधिक सुवर्णमयी करून, त्यास तेजोमयी करून घेतलेत. नव्हे तशी संधी आपल्याला राजघराण्यातील असल्यामुळे प्राप्त झाली. अश्या कोणत्याही गोष्टी आम्हास मिळाल्या नाहीत.
श्रीराम : तरी देखील आपण जगजेत्ते झालात. किंबहुना आम्ही जितके दुष्ट संहारिले, त्याहून कैक अधिक दुष्ट आपण यमसदनी धाडलेत. त्यायोगे आपण आम्हाहून अधिक सामर्थ्यशाली आणि बलशाली आहात.
श्रीकृष्ण : नव्हे सिद्ध झालो इतकंच. आपण बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कलांचे श्रेष्ठ धनी झालात.
श्रीराम : आपण तर सोळा विद्या आणि चौसष्ठ कलांना आधीन केलय.
श्रीकृष्ण : आपण स्वयं हे जाणता की त्यातील बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कला आपणाकडून प्रारब्धवश प्राप्त झाल्या.
क्रमशः
ही लेखमाला कॉपी राईट रजिस्टर्ड आहे, त्यामुळे नावासकट प्रसारित करावी.
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०९/२०२३
Comments
Post a Comment