श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
श्रीकृष्ण : परंतु आपल्यामध्ये काही साम्य स्थळं सुद्धा आहेत.
श्रीराम : अर्थात
श्रीकृष्ण : आपण दोघांनीही एका स्त्री खल प्रवृत्तीला संपवलय. जस आपण त्राटीका आणि आम्ही पुतना, आम्ही कर्णाला तो युद्ध थांबवून रथातून खाली उतरला असताना वधावयास लावले आणि आपण मित्रकर्तव्या स्तव वालीवध केलात. दोन्हीमध्ये उद्देश एकच खल प्रवृत्ती नष्ट करणे आणि जर ती त्या व्यक्तींबरोबर संपणार असेल व त्यासाठी कोणत्या ही मार्गाचा वापर गरजेचा असेल तर, तो न्याय नीतिसंमत आहे. उद्देश मात्र खल नव्हे तर खलप्रवृत्ती नष्ट होण गरजेच आहे.
श्रीराम : आम्ही असं मानतो की, जे घडावं हे नियती विहित आहे, ते फक्त घडवण्याचं कार्य करण्याचं स्वातंत्र्य मानवी देहात असतं. हे अर्थात आमचं जीवना बद्दलच तत्वज्ञान आणि श्रद्धा.
श्रीकृष्ण : अर्थातच म्हणूनच मानवी जन्मात मुख्य कर्म हे सज्जन रक्षण आणि खल निर्दालन हेच असावं, विशेषतः तुम्ही सत्ताधारी असताना. पण सर्वसामान्य जीवास मात्र निज कर्तव्य आणि या देही आल्याचं सार्थ कर्म कृतीत आणून मिळालेला जन्म संचित कमी करून, जमेल तितका पुण्यसंचय करावा, ज्यायोगे ह्या पुढील जन्म, एकतर मिळू नये वा मिळाल्यास ते संचित संपवून प्रारब्धाचे भोग कमी होऊन भक्तियोग , ज्ञानयोग, कर्मयोग यातील एकतरी योग साध्य होईल हे साधावं.
श्रीराम : याचसाठी हे ज्ञान आपण गीतरुपात अर्जुनाच्या माध्यमातून जगापुढे मांडलत.
श्रीकृष्ण : आपण तेच भोगरूपात कर्तव्य करत मानवाने कसे जगावं हे आदर्शवत दाखवून दिलंत. याचसाठी आपण धन्य आहात.
श्रीराम : अर्थात जिथे आदर्श उपयोगात येत नाहीत, तिथे आदर्शाचं अवडंबर न करता, जगाच्या कल्याणास्तव काही गोष्टी स्वतः घडवणं वा घडवून घेणं, किती गरजेचं आहे, विशेषतः ज्यावेळी आदर्श पायदळी तुडवले जात असतात तिथे ते पायदळी तुडवणाऱ्याना क्षमा न करता दंडीत कसं करावं, हे आपण दाखवून दिलंत. यासाठी आपण कालौघात श्रेष्ठच आहात.
रुक्मिणी : आपण आम्हास मात्र एक श्रोता म्हणून आणले आहे की काही इतर उद्देशाने आणले आहे.
हसून श्रीकृष्ण म्हणाले
श्रीकृष्ण : श्रीराम याबाबत आपण भाग्यवान आहात, एकच पत्नी आणि तीदेखील फक्त होकार व नकार यास्तव. आमच्याकडे आठ आणि त्याही हक्काबाबत जागरूक असणाऱ्या.
यावर चारही जण मोकळेपणाने हसले. इतक्यात भगवान शंकर हे, पार्वती सह येऊन उपस्थित राहिले. त्यांनी, उशीर झाल्याबद्दल क्षमा याचना करून, सर्वांना आत येऊन स्थानग्रहण करण्यास सांगितले. त्याकारणे सर्वजण आतल्या मार्गाकडे निघून गेले.
ही लेखमाला कॉपी राईट रजिस्टर्ड आहे, त्यामुळे नावासकट प्रसारित करावी.
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०९/२०२३
Comments
Post a Comment