Skip to main content

गीत विश्लेषण - जलते है जिसके लिये

 गीत विश्लेषण - जलते है जिसके लिये 

जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये
ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये
जलते हैं जिसके लिये

दर्द बनके जो मेरे दिल में रहा ढल ना सका
जादू बनके तेरी आँखों में रुका चल ना सका
आज लाया हूँ वही गीत मैं तेरे लिये
जलते हैं जिसके लिये 


दिल में रख लेना इसे हाथों से ये छूटे न कहीं
गीत नाज़ुक है मेरा शीशे से भी टूटे न कहीं
गुनगुनाऊंगा यही गीत मैं तेरे लिये
जलते हैं जिसके लिये

जब तलक ना ये तेरे रस के भरे होंठों से मिले
यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले
गाये जाऊंगा यही गीत मैं तेरे लिये
जलते हैं जिसके लिये

चित्रपट : सुजाता (१९५९)
निर्माता निर्देशक : बिमल रॉय 
गीत : मजरूह सुलतानपुरी 
संगीत : एस डी बर्मन 
गायक: तलत मेहमूद 

परिणिता, दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, यहुदी, बंदिनी या महान आणि यादगार चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांचाच सुजाता हा सामाजिक संदेश देणारा आणि अस्पृश्यता या विषयाला मार्मिकपणे मांडून कोणत्याही तिखट भाष्याशिवाय फक्त दृश्यातून हृदयापर्यंत पोचवणारा सहजसुंदर चित्रपट. मुळात बिमल रॉय हे सामाजिक जाणिवा जागृत असलेले आणि आपल्या आसपास समाजात दिसणाऱ्या आणि मनाला वेदना देणाऱ्या समस्या अर्थात मुख्यतः सामाजिक चित्रपट देणारे दिग्दर्शक. 

सुजाता चित्रपट एका प्रेमकथेच्या माध्यमातून अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या सुजाताच्या उपजत जाणिवा, त्या जाणिवांचे अंतरंग, तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या सध्या इच्छा आणि त्या इच्छा मारणारं सभोवतालचं वातावरण. मुळात उपेंद्र चौधरी यांच्या घरात एक आश्रित म्हणून अगदी पाळण्यात असल्यापासून वाढलेली सतत तुटक वागणूक मिळालेली आणि एक माणूस म्हणून यात आपला काय दोष आहे हे न उमगलेले सुजाता कोणत्याही भावना वा या वागणुकीचे कोणतेही विपरीत परिणाम न होऊ देता आहे ते स्वीकारून आतल्या आत झुरत असलेली. भावना दाबून आहे त्यात आणि मिळेल त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करणारी साधी सरळ सोज्वळ मुलगी. सुजाता झालेल्या नूतन या अत्यंत संयत सूक्ष्मातील सूक्ष्म भाव तरलपणे, पण संयतपणे आपल्या चेहऱ्यावर दाखवण्यात वाकबगार असलेल्या कुशल अभिनेत्रीने या भूमिकेचे सर्व पदर, कोन , पापुद्रे, तरलपणे, पूर्ण ताकदीने, उलगडून दाखवले आहेत.  त्या विरुद्ध व्यक्तित्व असलेली चौधरींची मुलगी रमा काहीशी उथळ, स्पष्ट अर्थातच सुजाताच्या कोणत्याही दुःखाचा भावनांचा तिळमात्र स्पर्श न जाणवलेली पण सुजाताबद्दल सहानुभूती असलेली मुलगी. 

अधीर अर्थात सुनील दत्त एक उत्तम अभिनेता. सुजाताबद्दल सहानुभूती आणि तिला दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल राग असणारा उपेंद्र चौधरी यांच्या स्नेह्यांचा मुलगा. उच्चशिक्षित आणि नवीन विचारांचा असल्यामुळे, सुजाताच्या अस्पृश्य असण्याचा त्याला काही फरक पडत नसतो. पण आधी असलेली हा सहानुभूती प्रेमात परिवर्तित होते. जे त्याला जाणवतं . ज्या क्षणी त्याला हे जाणवत तो क्षण वा ते भाव ती वेळ या गीतातून अधीरने व्यक्त केली आहे. सुजाताशी गप्पा मारत असताना त्याला फक्त एका गीताची धून सुचते. परंतु शब्द सुचत नाहीत. सुजाताला तो सांगतो कि, शब्द सुचले कि तो तिला गाणं नक्कीच ऐकवेल. तो घरी पोचतो आणि त्याला शब्द सुचतात तो सुजाताच्या घरी फोन करतो. कर्मधर्मसंयोगाने सुजाताच फोन उचलते. तिचा आवाज ऐकून आधीर हे गीत सुरु करतो. 

परंतु अधिरला भेटून घरी येऊन गाणं ऐकण्याच्या दरम्यानच्या काळात एक गोष्ट घडते. उपेंद्र बाबू आणि त्यांची पत्नी अर्थात सुलोचनाजी यांच्यातील चर्चा सुजाता ऐकते. ज्यात ते त्यांची मुलगी रत्ना आणि अधीर यांच्या विवाहाची चर्चा करत असतात. सुजाताला ते वाक्य जमिनीवर आणतं. खरंतर तीही अधिरच्या प्रेमात मग्न व्हायला लागलेली असते. तिला अधीर मनापासून आवडलेला असतो. कदाचित त्याने विचारल्यावर ती हो म्हणण्याच्या मनःस्थितीप्रत आलेली असते. परंतु ज्याच्या घरी ती आश्रित म्हणून वाढलेली असते त्या पतीपत्नींची चर्चा ऐकून क्षणात तिची सर्व स्वप्न धुळीला मिळतात. या सीनमध्ये नूतनने जो मुद्राभिनय करून आपलं स्वप्न धुळीला मिळाल्याचं ज्या सक्षमतेने दाखवून पुन्हा एक आश्रीतम्हणून तो निर्णय स्वीकारण्याचा , एका क्षणात, घेतलेला निर्णय आणि तो तितक्याच ताकदीने चेहऱ्यावर दाखवला आहे. 

याच भावनेत ती जिना चढून वर येते आणि अधिरचा फोन येतो. तो तिला सांगतो कि मला शब्दसुद्धा सापडले आहेत आणि तिचा प्रतिसाद न ऐकून घेताच तो आपले शब्द गीताच्या माध्यमातून सांगायला सुरवात करतो. इथेच सुंदर सुरुवातीवर बांधलेलं हे गीत सुरु होतं . पियानोच्या सुंदर सुरावटीवर हे गीत सुरु होतं. पियानो हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम वा प्रतीक आहे. काही काही वाद्य त्या त्या भावभावना सहजपणे आणि सजगपणे विनासायास रसिकांच्या कानातून हृदयात पोचवतात. म्हणूनच ओ पी नय्यर यांनी बहारे फिर भी आयेगी मध्ये आपके हसून रुख या गाण्यात धर्मेद्रसाठी आणि आर डी बर्मन यांनी काटिपतंग मध्ये प्यार दिवाना होता है मध्ये किशोरकुमार यांच्या आवाजात राजेश खन्नासाठी प्रेमाची कबुली देताना याच वाद्याचा वापर केला आहे. त्याच वाड्याच्या एका सुरावटीने हे गीत सुरु होतं . 

नायक आणि नायिका दोन भिन्न मोड मध्ये असलेल्या अत्यंत दुर्मिळ गाण्यांपैकी हे एक गीत. आपल्यासमोर अधीर आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करतोय, जे आपल्यालाही मान्य आहे परंतु आता बदललेल्या  परिस्थितीत आपण त्याचा स्वीकार करायला असमर्थ आहोत. या भावनेत रडू कोसळलेल्या सुजाता अर्थात नूतन यांनी जो अविस्मरणीय अभिनय केलाय त्याचं वर्णन खरंतर माझ्या शब्दाबाहेर आहे. समोरून शब्दाशब्दात प्रेमाची होणारी बरसात, जो खरंतर आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण परंतु समोर एका हाताने नियतीने दिलेलं  नायकरूपी पक्वान्नांचं ताट,  नियतीनेच दुसऱ्या हाताने त्याच क्षणी वा एकच क्षण आधी हिसकावून घेतलं आहे आणि ते स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय, आपल्या जन्माच्या सत्यस्थितीमुळे, आपल्या समोर शिल्लक नाही. किंबहुना तो विषाचा प्याला सहज स्वीकारणं हे आपलं इतिकर्तव्य आहे हे मनोमन मान्य करून प्रेमाच्या प्रत्येक शब्दावर अश्रुंचे असंख्य लोट  वाहण्याचा अजब मार्ग समोर शिल्लक दिसतोय. 

हे प्रेम खरंतर फक्त आणि फक्त माझ्यासाठीच आहे, नव्हे माझाच त्यावर हक्क आहे. परंतु ज्यांनी मला पाळण्यात असल्यापासून आश्रित म्हणून सांभाळलं. जातीपातीच्या जनरिती असतानासुद्धा घरात स्थान दिलं , त्यांना या क्षणी मी काहीतरी देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पदरात दैवाने दिलेलं प्रेमाचं दान मला स्वीकारता येणार नाही. किंवा हे माझ्यासाठी नसावं, म्हणूनच नियतीने ते काढून घेण्याची व्यवस्था, ते मिळण्याआधीच केली. आता मला ते अस्वीकार करण्याचं माझं कर्तव्य पार पडायचं आहे. 

या भावनेत त्या गीताच्या प्रत्येक शब्दातील सच्चाई जाणवून आपण त्यासाठी नाही ,किंवा ते आपल्यासाठी नाही या द्विधा मनःस्थितीत असलेल्या सुजाताची तगमग, भाव, प्रेमाची समोर दिसणारी वाट त्यावर आपली वाट पाहत असलेला अधीर , त्याच्या मनाची अधीरता, आपली मनोमन त्याला असलेली स्वीकृती पण प्राप्त परिस्थितीत द्यावी लागणारी अस्वीकृती या चक्रव्युहात उभी असलेली सुजाता  आपला दिव्य अभिनयाने प्रत्येक फ्रेम मध्ये ताकदीने मांडून गाणं आणि त्या विरुद्धची आपली स्थिती हे दर्शकांपर्यंत अत्युत्तमरित्या पोचोवणारी ताकदीची अभिनेत्री नूतन यावर खरंतर कादंबरी होईल इतके शब्द बाहेर येऊ इच्छित आहेत. 

त्या क्षणाची स्थिती, जीवनाच्या त्या टप्प्यावर सुजाताची होणारी घालमेल, अपरिहार्य निर्णय आणि अस्वीकृत करावं लागणारं नायकाचं निस्सीम प्रेम इतक्या तरलपणे संयतपणे दिसत असताना ते खरंतर शब्दात मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष पडद्यावर फ्रेम बाय फ्रेम बघणं हा मनाला मिळणार आनंद आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील दत्त यांचं समोरचं आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्याच्या वेळची मनःस्थिती आणि त्याचे चेहऱ्यावरील पडसाद  तितकेच ताकदीचे आणि अप्रतिम आहेत. खरंतर संपूर्ण गाणं नूतन यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः खाऊन टाकलेलं असताना नायकाने आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्याचे भाव चेहऱ्यावर तितक्याच उत्तमरीत्या दाखवणं हे खूप कठीण काम होतं. आणि सुनील दत्त यांच्या जागी दुसरा एखादा अभिनय असता तर हे तितकं अप्रतिमरीत्या जमलंदेखील नसतं. पण सुनील दत्त देखील लाजवाब. 

खरंतर समोर ललिता पवार आणि सुलोचना या नसत्या तर सुजाता हा नूतन याना एकट्याने जिंकायचा किल्ला होता आणि त्यांनी तो तसा एकाहाती जिंकलादेखील पण ललिता पवार सुलोचना आणि सुनील दत्त यांच्या लाजवाब अदाकारीने नूतन यांच्यातील अभिनेत्रीला आव्हान दिलं ज्यामुळे नूतनजींचं काम अजून उठून दिसलं. म्हणूनच एका सुंदर गीतासाठी, नूतनजींच्या अप्रतिम संयत आणि परिणामकारक अभिनयासाठी आणि सुनील दत्त यांच्या ताकदवान अभिनयासाठी हे गाणं आणि यांच्याच उत्तम अभिनय कौशल्यासाठी हा चित्रपट यू टयूब वर जरूर बघा. निदान हे गाणं तरी पुन्हा एकदा बघा. 

जलते है जिसके लिये, 'तेरी आँखोके दिये ढुंढ लाया हूं वही गीत मै टतेरेलीये !!!!! हं हं हं   हंहं   हंहं ...... 


प्रसन्न आठवले 
३१/०८/२०२०
०६:५३
  






































Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...