Skip to main content

वेड्यांचा देश - भारत अर्थात हिंदुस्थान

वेड्यांचा देश - भारत अर्थात हिंदुस्थान 

हा देश खरंच वेड्या लोकांचा देश आहे. सत्तेसाठी वेडे होऊन स्वकीयांचा , स्वधर्मियांचा व स्वदेशाचा गळा घोटणार वेडे या देशाने जसे बघितलेत तसेच या देशाने स्वकीयांसाठी, स्वधर्मियांसाठी आणि स्वदेशासाठी घरादारावर नांगर फिरवणारी कुटुंबाच्या कुटुंबं पाहिलीत. किंबहुना या देशात ज्या काही गोष्टी घडल्या , घडतात आणि घडतील त्या फक्त आणि फक्त वेड्यानीच घडवल्यात. बाकी सगळे  सामान्य जीव. काही प्रातिनिधिक उदाहरणं मांडतो. 

आपण वानर आहोत हे ज्ञात असूनसुद्धा त्रिलोकविजयी रावणाच्या बलाढ्य राक्षस सैन्याशी युद्ध करून हजारो वर्ष जीवित असलेल्या आणि मृत्यूला दावणीला बांधलेल्या रावणाला यमसदनी पाठवण्याची जिद्द बाळगून असलेले आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या शब्दावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे हनुमंत ,सुग्रीव, अंगद, नल नील यासह अगणित वानरवीर आणि यक्षराज जांबुवंत हे देखील याच वेडेपणाच्या व्याख्येतील वेडे.  

कोणत्याही परिस्थितीत सखा अर्जुन याचं रक्षण करण्याचा आपला धर्म पाळण्याचा आणि त्यासाठी कराव्या लागतील तितक्या युक्त्या प्रयुक्त्या करून मार्ग काढून न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी महाभारताचं युद्ध अंगावर घेऊन त्यानिमित्ताने सर्व अधमी एकत्र आणून त्यांचा समूळ नाश करवून, प्रुथ्वीवरील भार हलका करुन,  आपले इच्छित साध्य करण्याचा मित्रप्रेमाचा वेडेपणा करणारा यदुवीर श्रीकृष्ण. 

आपल्या अपमानाचा बदला घेऊन प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करून, नंदाचं साम्राज्य धुळीला मिळवून मौर्य साम्राज्य प्रस्थापित करून इराण ते ब्रम्हदेश अखंड भारत एक करवून घेणारे आणि स्वतः सत्तेचा लाभ न घेता न्यायसंगत राज्य या देशाला देण्याचा वेडेपणा करणारे आर्य चाणक्य. 

हिंदवी स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवराय यांचे अमूल्य प्राण वाचावेत म्हणून फक्त ३०० मावळ्यांसह जवळजवळ दोन हजारांच्या फौजेचा यशस्वी मुकाबला करून महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत काळाचा काळ यम याला देखील वाट पाहायला लावू शकणारे वेडे वीर बाजीप्रभू देशपांडे. 

आपल्या मुलाचा विवाहसोहळा ज्याचं आमंत्रण घेऊन शिवरायांकडे गेलेला तानाजी मालुसरे आधी लगीन कोंढाण्याचे अशी रणगर्जना करून ती खरी करून दाखवण्याचा वेडेपणा करू शकतो आणि कसलेल्या उदयभानला पराभवाच्या उंबऱ्यावर नेऊन प्राण सोडतो. त्याचवेळी आपला पुत्र तानाजी धारातीर्थी पडला हे समोर दिसत असून ८०व्या वर्षी दोन्ही हातात तलवारी घेऊन शत्रूवर तुटून पडणारे शेलारमामा आणि बंधू तानाजी पडल्यानंतर परतीचे दोर कापून टाकणारा सूर्याजी , यांच्या वेडेपणाला काय म्हणणार. 

महाराजांचं राज्यविस्ताराचं स्वप्न पूर्ण करायचं या एकाच वेडापायी २० वर्षात ३२ यशस्वी लढाया करून मराठी सत्ता नर्मदेपार नेणारे बाजीराव पेशवे 

ब्रिटीश राजवटीला उलथून लावण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने तुरुंगात डांबले गेलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके अंगावरील पोलादी  बेड्यांच्या वजनासह व तुरुंगाच्या वीस मण लोखंडी दरवाजासह पलायन करण्याचा पराक्रम करू शकतात. काय म्हणावं या वेडेपणाला. 

स्वतंत्र भारताचं स्वप्न या देशाला दाखवणारे पहिले नेते, जहाल नेत्यांचे प्रेरणास्थान, सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंति सुरु करणारे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हे निर्भिड्पणे मांडणारे पत्रकार संपादक आणि स्वतंत्र्याच्या वेडापायी मंडालेत सहा वर्ष तुरुंगवास भोगणारे आणि तो भोगत असताना कोठडित गीतारहस्य हा कर्मयोगाला वाहिलेला ग्रंथ लिहिणारे, ज्येष्ठ गणितज्ञ लोकमान्य तथा बाळ गंगाधर टिळक. 

आपल्या घरात तीन तरुण पत्नी असताना पुण्यातील प्लेगच्या साथीत धर्मभ्रष्ट कृत्य करण्याचा आदेश देणारा रँड याचा वध करुन फासाचा दोर आपणहून जवळ करणारे चापेकर बंधू. 

मातृभूमीच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडून टाकण्यासाठी, इंग्लंडमध्ये राहून आपली बॅरिस्टर हि पदवी पणाला लावून, क्रांतिकारकांची संघटना उभारणारे, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, इंग्लंडमधून भारतात परत आणताना फ्रान्सच्या मार्सेली बंदरात बोटीतून उडी मारून किनारा गाठणारे, न्यायालयात ५०  काळ्यापाण्याची  शिक्षा सुनावली गेल्या नंतर इतकी वर्ष आपलं सरकारतरी टिकेल का हे आत्मविश्वासपूर्ण उद्गार काढणारे, अंदमानच्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेले, ती भोगत असतानासुद्धा काळकोठडीत २००० कविता लिहू शकणारे, कवी, गीतकार, लेखक साहित्यिक, राजकारणी, समाजकारणी, समाजसुधारक, मराठी भाषेला ७०० ते ८०० प्रतिशब्द देणारे प्रत्यक्ष सूर्याचं तेज, ओज, वीर्य आणि शक्ती घेऊन जन्म घेतलेले आणि मातृभूमीसाठी सर्व समर्पण करूनसुद्धा त्या बदल्यात काहीही अपेक्षा न ठेवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय म्हणावं यांच्या मातृभुप्रेमाच्या वेडाला. 

ज्या पक्षासाठी कार्य केलं, ज्या पक्षातील सदस्यांनी अधिकृतपणे अध्यक्षपद दिलं त्या पक्षातील २ व्यक्तींच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी तेच अध्यक्षपद सोडून आपलं घर व जन्मभूमी त्यागून, मातृभूमीच्या प्रेमाखातर बाकी कशाचाही विचार न करता देशाबाहेरून देशासाठी सैन्य जमवाजमव करून ब्रिटिश सेनेविरुद्ध युद्ध करणारे आणि स्वातंत्र्यानंतर विजनवासातील जीवन नशिबी आलेले अनेक दुर्दैवी नेत्यांपैकी एक असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस काय म्हणावं यांच्या या वेड्या त्यागाला. 

सर्व क्रांतिवीर ज्यांनी फक्त मातृभूमीच्या प्रेमाखातर हौतात्म्य पत्करलं, घरादारावर नांगर फिरवला, घरच्यांची काहीही पर्वा केली नाही, ज्यांच्या घरच्यांना कोणतीही बिदागी मिळाली नाही, किंबहुना त्यांच्या घरच्यानी सर्व हालअपेष्टा, अवहेलना अपमान दारिद्र्यपूर्ण जिणं भोगून देशाच्या सेवेतील आपल्या घरातील व्यक्तीला साथ दिली तेही याच वेडेपणाचे व्याख्येत येतात. 

अशी असंख्य उदाहरणं आहेत. मी वर दिलेली प्रातिनिधिक आहेत. त्यामुळे काही राहिली असल्यास दिलगीर आहे. 

पण अश्या असंख्य प्राचीन, अर्वाचीन, कालच्या आजच्या व उद्या जन्म घेणाऱ्या वीरांमुळे हि भूमी अविरत सुरक्षित होती , आहे आणि राहील. 

परंतु इतिहासातील पानं आपल्या रक्ताने लिहून नाव अजरामर केलेल्या ज्ञात, व अज्ञात  अनामिक वीरांना आजचा हा दिवस नक्कीच समर्पित करावा लागेल. निदान त्यानिमित्ताने आपण त्यांचं स्मरण करून त्यांना सादर वंदन करूया. 

कारण या देशाचा अलौकिक व उज्वल इतिहास याच असंख्य वेड्यानी लिहिला आहे. बाकी आपण सर्व सामान्य जीव आहोत. कारण असा जन्म मिळायलासुद्धा भाग्य लागतं . 

त्या सर्वांना विनम्र अभिवादन आणि शत शत प्रणाम !!!!

जय हिंद !!! 
वंदे मातरम् !!!
भारत माता कि जय !!!

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१५/०८/२०२०


























Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...