गोकुळाष्टमी काल साजरी झाली. आज दहीकाला त्यानिमित्ताने संतकवी सुरदास यानी लिहुन अजरमार केलेल्या गीताला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. "मय्या मोरी मै नही माखन खायौ "
का घेसी आळ मजवरी
मय्या मी का तुझा वैरी
मी न खाई नवनीत
मय्या मी न खाई नवनीत
भल्या पहाटे हाती देसी
लाठी घोंगडी नाजूक हाती
धाडसी वनी गोधनासंगे
तिथे पावा उरतो हाती
सांजेला घरी येई परत
खाई कधी नवनीत
मय्या मी न खाई नवनीत
बालक मी किती ग सानुला
नाजूक हात कसे पोचती
शिंक्यावर मैय्या तू ठेवसी
गवळीबाळे बळेच देती
मुखी घालीती घास
मी न खाई ग नवनीत
मय्या मी न खाई नवनीत
मय्या तुझ्या मनी काय ग
सांगती जन जे विश्वासे तु
त्यांच्या वचनावर विसंबुन
मज जाणसी का परका तु
तुला पाहुनी भोळी जननी
काहीही गवळीणी सांगतात
परी मय्या मी न खाई नवनीत
मय्या मी न खाई नवनीत
असा तुझ्या मनी भेद असता
फुकाचे मी काम का करावे
ही घे लाठी अन घोंगडी
गोधन चरण्या कुणाही द्यावे
मजला हे ना रुचे वागणे
मय्या का खाईन मी नवनीत
मय्या मी न खाई नवनीत
© ® कवी ः प्रसन्न आठवले
१२/०८/२०२०
०३ः३७
दहीहंडी दिनानिमित्त
Comments
Post a Comment